बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना पाणीपुरवठा ज्या ७ तलावांमधून केला जातो, त्यापैकी मोडक-सागर हा चौथा तलाव काल, गुरूवारी रात्री १०.५२ वाजता ओसंडून वाहू लागला. मुंबईला पिण्याच्या पाण्याचा पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांपैकी मोडक-सागर हा तलाव भरुन ओसंडून वाहू लागणारा यंदाच्या पावसाळ्यातील चौथा तलाव ठरला आहे. या तलावाची कमाल पाणी साठवण क्षमता १२,८९२.५ कोटी लीटर (१,२८,९२५ दशलक्ष लीटर) इतकी आहे, अशी माहिती पालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे देण्यात आली.
मोडक-सागर तलाव गेल्या वर्षी म्हणजेच सन २०२२ मध्ये १३ जुलै रोजी दुपारी ०१.०४ वाजता ओसंडून वाहू लागला होता. त्यापूर्वी म्हणजेच सन २०२१ मध्ये २२ जुलै रोजी मध्यरात्री ०३.२४ वाजता, वर्ष २०२० मध्ये १८ ऑगस्ट रोजी रात्री ०९.२४ वाजता, वर्ष २०१९ मध्ये २६ जुलै रोजी भरुन वाहू लागला होता. तर त्यापूर्वी सन २०१८ व २०१७ असे दोन्ही वर्ष हा तलाव १५ जुलै रोजी आणि सन २०१६ मध्ये ०१ ऑगस्ट रोजी पूर्ण भरुन वाहू लागला होता.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ धरणांची एकूण पाणी साठवण क्षमता सुमारे १,४४,७३६.३ कोटी लीटर (१४,४७,३६३ दशलक्ष लीटर) इतकी आहे. सर्व तलावांमध्ये आज पहाटे ६.०० वाजता करण्यात आलेल्या मोजणीनुसार सर्व सातही तलावांमध्ये ९८,५१३ कोटी लीटर (९,८५,१३० दशलक्ष लीटर) इतका म्हणजेच ६८.०६ टक्के एवढा पाणीसाठा आहे. यंदाच्या पावसाळयात तुळशी तलाव भरून वाहू लागलेला पहिला तलाव ठरला आहे. विहार तलाव आणि तानसा तलाव बुधवारी भरून वाहू लागले आहेत.

