मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षाच्या (१८९८ – २०२३) सांगतेनिमित्त मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय संचालित इतिहास संशोधन मंडळाने येत्या ३० जुलैला एक दिवसीय चर्चासत्राचे आयोजन केले आहे. हे चर्चासत्र शारदा मंगल कार्यालय, तिसरा मजला, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, दादर (पूर्व), मुंबई येथे आयोजित करण्यात आले आहे.
चर्चासत्राचा विषय ‘संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि समकालीन महाराष्ट्र’ हा असून उद्घाटन सत्राचे अध्यक्ष डॉ. भालचंद्र मुणगेकर आणि प्रमुख वक्त्या इतिहास अभ्यासक डॉ. प्राची देशपांडे आहेत. त्या ‘महाराष्ट्राचा इतिहास आणि वर्तमान : आंतरसंबंध’ या विषयावर आपले विचार मांडतील. महाराष्ट्रातील शेती, पर्यावरण, शिक्षण, उद्योग, रोजगार, प्रादेशिकता व संघराज्य व्यवस्था, भाषाधोरण या विषयांवर त्या-त्या क्षेत्रातले अभ्यासक आपले सखोल विचार यावेळी मांडणार आहेत.
‘शेती आणि पर्यावरण’, या विषयावरील पहिल्या सत्रात सोमिनाथ घोळवे आणि परिणिता दांडेकर भूमिका मांडतील. या सत्रात डॉ. जास्वंदी वांबूरकर आणि साईली पलांडे-दातार या चर्चक असतील. दुसऱ्या सत्रात डॉ. शरद जावडेकर महाराष्ट्राच्या शिक्षणावर, तर डॉ. नीरज हातेकर उद्योग आणि रोजगारावर आपले विचार मांडतील. या सत्राचे चर्चक अनुक्रमे डॉ. अवनीश पाटील आणि डॉ. नारायण भोसले असतील. तिसऱ्या सत्रात ‘प्रादेशिकता व संघराज्य व्यवस्था’ या विषयावर डॉ. भालचंद्र मुणगेकर, तर ‘महाराष्ट्राचे भाषा धोरण’ या विषयावर डॉ. प्रकाश परब आपली मते मांडतील. डॉ. श्रद्धा कुंभोजकर व डॉ. नितीन रिंढे या सत्राचे चर्चक असतील.
हे चर्चासत्र निःशुल्क असून सहभागींना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. अभ्यासक, शिक्षक, विद्यार्थी यांनी या अभ्यासपूर्ण चर्चेत सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजक रवींद्र गावडे (प्रमुख कार्यवाह, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय), डॉ. जयसिंगराव पवार (अध्यक्ष, इतिहास संशोधन मंडळ), डॉ. दीपक पवार (संचालक, इतिहास संशोधन मंडळ) यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ९८२०४३७६६५ या क्रमांकावर संपर्क साधावा.

