येत्या काळात देशातल्या स्वातंत्र्यसैनिकांचा इतिहास महाविद्यालयांच्या अभ्यासक्रमात आमण्याच्या दृष्टीने एक समिती गठित केली जाईल, असे आश्वासन मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रविंद्र कुलकर्णी यांनी दिले.
लोकमान्य टिळक जयंती दिनी कुलगुरुंच्या हस्ते कृतज्ञता ध्वजस्तंभावरील ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर लोकमान्य टिळकांच्या समाधी स्थानावर त्यांनी पुष्पार्पण केले. त्याप्रसंगी प्रा. कुलकर्णी बोलत होते. या समारंभाचे आयोजन स्वराज्यभूमी स्मारक समितीने केले व व्यवस्थापन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ड विभागाने केले. स्वराज्यभूमी समितीच्या वतीने प्रकाश सिलम, उज्ज्वला मेहेंदळे, नंदकुमार मादुस्कर, रागिणी रावल, किरण गुरव, गिरीश कुलकर्णी, अविनाश जाधव, बाळासाहेब हेगडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते तर महापालिका ड विभागाच्या वतीने सहाय्यक आयुक्त शरद उघडे, संजय पोळ, रावसाहेब सांगोळकर व सुशील बडेकर आदी उपस्थित होते.
स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य टिळकांचे नाव घेणेसुद्धा राजद्रोहाचा गुन्हा होता. एव्हढी इंग्रजांना लोकमान्य टिळकांची दहशत होती. असे असूनही स्वातंत्र्यसैनिकांनी लोकमान्य टिळकांच्या अंत्यविधीस्थानी लोकमान्य टिळकांचे स्मारक उभारले जावे म्हणून इंग्रजांच्या दंडेलीला न जुमानता तेरा वर्षानंतर १९३३मध्ये गिरगाव चौपाटी येथील पुतळा उभारण्यात यश मिळविले. पण हा चित्तथरारक इतिहास कोकणापासून गडचिरोलीपर्यंतच्या मुलांना का माहित नसावा? इतकेच नव्हे तर विधानसभेत बसणार्या बहुतेक सदस्यांना माहित नसावा, का? याची खंत प्रकाश सिलम आणि उज्ज्वला मेहेंदळे यांनी मुंबई विद्यापिठाचे कुलगुरु प्रा. रविंद्र कुलकर्णी यांच्यापुढे बोलताना व्यक्त केली. तेव्हा कुलगुरुंनी यावर समिती नेमून लवकरात लवकर हा विषय अभ्यासक्रमात घेण्यात येईल, असे आश्वासन दिले आणि स्वराज्यभूमी समिती सदस्यांना यासंबंधात सविस्तर चर्चेसाठी आमंत्रण दिले.

