राज्यात दुधाला किमान भाव मिळावा, दूधाच्या खरेदीदरात कपात होऊन दूध उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान होऊ नये, या उद्देशाने गायीच्या दुधाला प्रतिलिटर किमान ३४ रूपये भाव देण्याचा निर्णय शासनाने घेतल्याची माहिती दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
राज्यातील दूधदर प्रश्नाबाबत विविध दूध उत्पादक शेतकरी संघटना व पशुखाद्य उत्पादक प्रतिनिधींसोबत पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक पार पडली होती. त्यानुसार सहकारी आणि खाजगी दूध संघांचा परिचालन खर्च, तसेच दूध उत्पादक शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च विचारात घेऊन, शेतकऱ्यांच्या दूधाला रास्त भाव मिळावा, या अनुषंगाने दूधदर निश्चित करण्यासाठी शासन निर्णयान्वये समिती गठीत करण्यात आली होती. सहकारी व खाजगी दुग्ध क्षेत्रातील प्रमुख प्रतिनिधी यांचा सदस्य म्हणून समावेश असलेल्या सदर समितीने शासनास केलेल्या शिफारशीनुसार राज्यात गायीच्या दूधासाठी (३.५/८.५) गुणप्रतिकरीता किमान खरेदीदरास मान्यता देतानाच सदरचे दर विनाकपात दूध उत्पादक शेतकरी यांना अदा करणे अभिप्रेत राहील, असा निर्णय शासनाने घेतल्याचे त्यांनी सांगितले.
दूधाला रास्त भाव मिळावा यासोबतच देशातील स्थानिक व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा आढावा घेऊन समितीने दर ३ महिन्यांनी किमान दूध खरेदीदर निश्चितीबाबत शासनास शिफारस करण्यात यावी. विशिष्ट अपवादात्मक परिस्थिती निर्माण झाल्यास, शासनाकडून प्राप्त निर्देशानुसार ३ महिन्यापूर्वीही समितीने दूधदराबाबत शासनास शिफारस करावी, किमान दूधदराची अंमलबजावणीबाबत जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी यांनी दुग्धव्यवसाय विकास आयुक्त यांच्यामार्फत शासनास दरमहा अहवाल सादर करावा, असे निर्देश समितीला देण्यात आल्याची माहितीही विखे पाटील यांनी दिली आहे.

