आज अनेकांनी वेगळी भूमिका घेतली. त्याबद्दल माझं काही मत नाही. पण पक्षाच्या ज्या कार्यकर्त्यांनी निवडून दिलं त्यांना विश्वासात न घेता वेगळी भूमिका घेतली गेली. असं असलं तरी काही केलं तर पक्ष आणि चिन्ह जाणार नाही, ते जाऊ दिलं जाणार नाही, अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला.
यशवंतराव चव्हाण केंद्रात पार पडलेल्या समर्थकांच्या एका मेळाव्यात ते बोलत होते. जे माझा फोटो लावतात, त्यांना माहिती आहे की त्यांचं नाणं चालणार नाही. मला पांडूरंग म्हणायचं आणि आमच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं, असं सांगायचं असा कार्यक्रम काहींनी सुरू केल्याचं ते म्हणाले.
आज राष्ट्रवादीच्या स्थापनेला २४ वर्षे पूर्ण झाली. या काळात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात राष्ट्रवादीची फळी तयार केली. यामध्ये अनेकजण आमदार, खासदार आणि मंत्री झाले. राष्ट्रवादीने अनेक नवीन नेते तयार केले. या नेत्यांना तयार करताना त्यांना महाराष्ट्राचा चेहरा बनवायचा होता. राज्यातल्या शेवटच्या माणसापर्यंत कसं पोहोचायचं हा विचार होता. आज आपल्यासमोर संकटे आहेत. ज्यांचे विचार देशाच्या हिताचे नाहीत त्यांच्या हातात आज देशाची सूत्रे आहेत. लोकशाहीमध्ये विरोधी असो वा सहकारी असोत, त्यांच्यात सुसंवाद असावा लागतो. जो काही निर्णय घेतला जातो त्यावर सर्वसमान्यांची प्रतिक्रिया काय आहे हे जाणून घ्यावं लागतं. आज देशामध्ये हा संवाद नाही, असेही पवार यांनी सांगितले.
देशातील विरोधक एकत्र येत असताना ज्यांच्या हातात सत्ता आहे ते अस्वस्थ होताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी पंतप्रधानांनी सांगितलं की राष्ट्रवादीने ७० हजार कोटी रुपयांचा घोटाळा केला. राष्ट्रवादीला भ्रष्टाचारी म्हटलं, मग दोन दिवसांपूर्वी झालेल्या शपथविधीत राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना कशी शपथ दिली असा सवाल त्यांनी केला. विरोधकांना एकत्रित करण्याचं काम सुरू आहे, त्यामुळे पंतप्रधान अस्वस्थ झाल्याचंही त्यांनी सांगितले.

