भारतीय जनता पक्ष जाती-जातीत, धर्मा-धर्मात वाद घडवून सामाजिक शांतता भंग करत आहे तसेच संघ परिवाराचे लोकही धर्मा-धर्मात वाद लावून दंगे घडवतात आणि त्यात सामान्य जनता मात्र भरडली जात आहे. भारतीय जनता पक्ष म्हणजे भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार म्हणजे भाजपा असे समीकरण आहे. कर्नाटकात ४० टक्के कमिशन दिल्याशिवाय कोणतेच काम होत नव्हते. कर्नाटकच्या जनतेने भ्रष्टाचारी भाजपाला घरी बसवले, महाराष्ट्रातही शिंदे-फडणवीस सरकार अत्यंत भ्रष्ट आहे, हे भ्रष्ट सरकारही उखडून टाका व काँग्रेसची सत्ता आणा, असे आवाहन कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केले.
सांगली येथील कल्पद्रुम क्रीडांगण मैदानावर महानिर्धार २०२४ शेतकरी संवाद व कार्यकर्ता मेळावा झाला. या मेळाव्यात सिद्धरामय्या बोलत होते. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिशा दिली. डॉ. बाबासाहेबांचे संविधान नसते तर दीनदलित, शोषित, वंचित वर्ग मुख्य प्रवाहात आला नसता, त्याला समान हक्क मिळाले नसते. जातीयवादी भाजपा सरकार मात्र घटनाच बदलण्याची भाषा करत आहे. गोळवलकर, सावरकर यांनी संविधान अस्तित्त्वात आल्यापासूनच विरोध केला आहे आणि आताही या विचाराचे लोक संविधानाला विरोधच करत आहेत. संविधान राहिले तरच आपले अस्तित्त्व राहिल म्हणून संविधानाच्या रक्षणासाठी कोणताही त्याग व बलिदान देण्याची तयारी ठेवा, असे वाहनही त्यांनी केले.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने २२४ पैकी १३६ जागांवर विजयी मिळवला. कर्नाटकात भाजपा जनतेच्या आशिर्वादाने सत्तेत येत नाही, ते ऑपरेशन कमळ करुन आमदार विकत घेऊन सत्तेत आले होते. कोट्यवधी रुपयांचे आमिष दाखवून भाजपा सत्ता स्थापन करते. काँग्रेसने कर्नाटकात भाजपाचा भ्रष्टाचार घराघरात पोहोचवला व भाजपामुक्त कर्नाटक केले. सरकार स्थापन होताच जनतेल्या दिलेल्या ५ आश्वासनांवर २४ तासात निर्णय घेतला, असेही सिद्धरामय्या म्हणाले.
यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, भाजपा आपल्या देवीदेवतांचा वापर फक्त निवडणुकीत मते मागण्यासाठी करत असतो आणि निवडणुका होताच याच देवांचा अपमान करतो. कर्नाटकात भाजपाला भगवान श्रीराम व बजरंगबली यांनीच जागा दाखवून दिली. आता आदिपुरुष चित्रपटात भगवान श्रीराम व हनुमानाचा अपमान केला आहे. पंढरपुरात जागोजागी पोस्टर लावले आहेत, त्यातही पांडुरगांचा अपमान केला आहे. हे सरकार आपल्या दैवतांचा अपमान करत आहे, जनतेचा अपमान करत आहे.

विधिमंडळ काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यावेळी म्हणाले की, कर्नाटकात काँग्रेसने मोठा विजय मिळवला. राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाखाली भारत जोडो यात्रा झाली. त्याचाही परिणाम कर्नाटकाच्या विजयात दिसून येतो. महाराष्ट्रात असलेले भाजपाचे सरकार काहीही काम करत नाही. फक्त घोषणाबाजी, इव्हेंटबाजी, जाहिरातबाजीतून खोटेनाटे दावे केले जात आहेत. या खोटारड्या शिंदे-फडणवीस सरकारला आगामी निवडणुकीत धडा शिकवू.
सांगलीतील या मेळाव्याला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील, कर्नाटकचे मंत्री एम. बी. पाटील, मधुकरराव चव्हाण, बस्वराज पाटील, प्रणिती शिंदे, डॉ. विश्वजीत कदम आदी नेते उपस्थित होते.

