आषाढी एकादशी निमित्त दरवर्षी पंढरीत महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, व देशाच्या इतर भागातून लाखों वारकरी येत असतात. बहुसंख्य वारकरी पायी चालत पंढरपूरला येत असतात, तसेच वारकऱ्यांमध्ये वृद्ध स्त्री व पुरुष भाविकांची संख्या मोठी असते. त्यामुळे वारकऱ्यांना आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्यास त्यांना तात्काळ आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणेसाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांचे संकल्पनेतून “आरोग्याची वारी पंढरीच्या दारी” हा विशेष उपक्रम हाती घेतला आहे. यात्रेदरम्यान दिनांक २७ ते २९ जून २०२३ या कालावधीत पंढरपुर शहरात भव्य “महाआरोग्य शिबिराचे” आयोजन केलेले आहे. प्रतिवर्षी पंढरपूर यात्रेला सुमारे १५ ते २० लाख लोक येत असतात. वारी सोहळ्यातील कोणीही वारकरी आरोग्य सुविधापासून वंचित राहू नये यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग सर्वार्थाने सज्ज असून, या वर्षी शासनाच्या आरोग्य यंत्रणेबरोबर, खासगी वैद्यकीय व्यावसायिकांना वारी दरम्यान आपले दवाखानेही सुरु ठेवावे असे आवाहन आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी आरोग्य सुविधेचा आढावा घेण्यासाठी नुकत्याच आयोजित उच्चस्तरीय बैठकीदरम्यान केले.

या उपक्रमाअंतर्गत पालखी मार्गावर आरोग्य विभागाने आवश्यक त्या सर्व आरोग्य सुविधा उपलब्ध केलेल्या असून, वारी मार्गावर फिरत्या वैद्यकीय पथकाची सोयही केलेली आहे.



देशाच्या सर्व भागातून आषाढी यात्रेनिमित्त लाखो वारकरी पंढरपूरमध्ये येत असतात. मात्र वारीच्या कालावधीत पंढरपूर परिसरातील व वारी मार्गावरील खासगी वैद्यकीय व्यावसायिक आपले दवाखाने बंद ठेवत असल्याचे आढळून आले आहे. शासकीय यंत्रणा सज्ज असली तरी वारी दरम्यान रुग्णसंख्या वाढल्यास वा साथीची परिस्थिती निर्माण झाल्यास उपलब्ध सरकारी यंत्रणेवर ताण पडण्याची शक्यता आहे.

या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री प्रा तानाजी सावंत यांनी आषाढी वारी मार्ग, पंढरपुर शहर व परिसरातील खासगी दवाखाने व रुग्णालये सुरु ठेवणेबाबत सूचना केल्या आहेत. वैद्यकीय व्यावसायिकांसमवेत बैठक आयोजित करून रुग्णालये व दवाखाने सुरु ठेवण्याच्या सूचना देण्याबाबत त्यांनी जिल्हास्तरीय यंत्रणांना सुचित केले. तसेच याबाबतची जनजागृती करणे, खासगी रुग्णालये व दवाखाने कार्यरत असल्याची खात्री करण्यासाठी धडक पथके पाठवणे याबाबत जिल्हाधिकारी व महानगरपालिका आयुक्त सोलापूर यांना तसेच जिल्हा शल्य चिकित्सक, सोलापूर यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. ठोस कारणाशिवाय दवाखाना व रुग्णालये बंद ठेवल्यास साथरोग अधिनियम १८९७, साथरोग अध्यादेश २०२० (A mendment) तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अन्वये योग्य ती कारवाई करण्याबाबतदेखील सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी वारकऱ्यांच्या सोयीसाठी दवाखाने सुरू ठेवण्याचे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आलेले आहे.

