कोणत्याही परिस्थितीत एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलल्या जाणार नाहीत, हे राज्य सरकारचे आश्वासन मोडित काढताना सरकारने या परीक्षा घेण्याची पुरेशी तयारीच केली नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज अप्रत्यक्ष कबूल केले.
येत्या रविवारी होणारी एमपीएससीची परीक्षा अवघे तीन दिवस असताना पुढे ढकलल्याने राज्यभर परीक्षार्थी विद्यार्थ्यांचा एकच आक्रोश व उद्रेक झाला. गुरूवारी दिवसभर राज्यभर ठिकठिकाणी विद्यार्थ्यांनी निदर्शने, ठिय्या आंदोलन केल्यानंतर विरोधी पक्ष भारतीय जनता पार्टीसह काँग्रेसच्या नेत्यांनीही या परीक्षा पुढे ढकलल्या जाऊ नये याचा आग्रह धरला होता. त्यानंतर रात्री मुख्यमंत्री ठाकरे यांनी समाजमाध्यमाद्वारे जनतेशी संवाद साधताना या परीक्षा घेण्यासाठी कर्मचारीवर्गाची सोयच झाली नसल्याचे मान्य केले.
दिवाळीआधी परीक्षा पुढे ढकलताना आपण त्या कोणत्याही परिस्थितीत पुन्हा पुढे ढकलल्या जाणार नाहीत, असे आश्वासन दिले. परीक्षा घेताना शासकीय कर्मचाऱ्यांची गरज लागते. विद्यार्थ्यांना बसवण्याची सोय करणे, त्यांना पेपर देणे, पेपर गोळा करणे, त्यांचे गठ्ठे बांधणे या साऱ्या कामांना कर्मचारी लागतात. विद्यार्थ्यांबरोबर वावरणाऱ्या साऱ्या कर्मचाऱ्यांची चाचणी झाली पाहिजे. ते यात निगेटिव्ह आले पाहिजेत. त्यातल्या जास्तीतजास्त लोकांचे लसीकरण झालेले असले पाहिजे. विद्यार्थ्यांवर कोणत्याही प्रकारचे दडपण असता कामा नये, यासाठी या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
या परीक्षांची नवीन तारीख उद्याच जाहीर केली जाईल आणि ती येत्या आठ दिवसांतच असेल अशा सूचना आपण आयोगाला दिल्या आहेत. वयोमर्यादेची कोणतीही अडचण विद्यार्थ्यांना येणार नाही. या गैरसोयीबद्दल आपण दिलगिरी व्यक्त करतो. विद्यार्थ्यांनी संयम बाळगावा. कोणी भडकवतो म्हणून त्यांची राजकीय बंदूक आपल्या खांद्यावर घेऊ नये, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
कोरोना पुन्हा जोर धरत आहे. तो रोखण्यासाठी सर्व शासकीय कर्मचारी गुंतले आहेत. कोणाला बाधा झाली आहे, त्याची चाचणी झाली का, त्यांना विलगीकरण कक्षात ठेवले का, त्यांच्या संपर्कात कोण आले होते, आदी माहिती घेण्यात सारे व्यस्त आहेत, असे ते म्हणाले.

