छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाचे यावर्षी दोन जून या दिवशी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला ३५०वे वर्ष असून ते दिमाखाने साजरे करण्यात येत आहे. यासाठी श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समितीच्यावतीने दुर्गराज रायगड ही संस्थाही तेथे गेल्या अनेक वर्षांपासून हा सोहळा साजरा करीत आहे. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या या राज्याभिषेक सोहळ्यासाठी खास पालखीची मागणी केली आणि ती पालखी राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांनी त्यांना दिली. चांदीच्या पत्र्याने सुशोभित केलेल्या या पालखीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या या राज्याभिषेकदिनी किल्ले रायगडावर नेले जाणार आहे.

त्यापूर्वी मंगळवारी ३० मे २०२३ या दिवशी ही पालखी मुंबईच्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्यासमोर सादर करून शिवरायांचा, संभाजी महाराजांचा, सावरकरांचा जयजयकार केला गेला. त्याठिकाणी पालखीमध्ये छत्रपती शिवरायांची प्रतिमा ठेवून यथासांग पूजा करून छत्रपतींचा जयजयकार करण्यात आला. समितीचे अध्यक्ष सुनील पवार यांनी यावेळी माहिती देताना सांगितले की, आम्ही राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांच्याकडे या पालखीची मागणी केली. गेली अनेक वर्षे संस्थेच्या पुढाकाराने रायगडावर शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा केला जातो. यावेळी या दिवसाचे ३५०वे वर्ष असून त्यानिमित्ताने केलेल्या मागणीला मुनगुंटीवार यांनी मान्य करून ही पालखी तयार करून दिली.

स्वातंत्र्यवीर सावरकर हे शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहणारे भक्तच होते. अशा या स्वातंत्र्यवीरांच्या स्मारकापुढे आम्ही अभिमानाने ही पालखी सादर केली आहे. छत्रपती शिवरायांसाठी असे काम केलेले महाराष्ट्रातील हे पहिलेच सरकार असेल असेही त्यांनी सांगितले. यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे यांनी पालखी आणि त्यातील शिवछत्रपतींच्या प्रतिमेचे पूजन केले तसेच कार्यवाह राजेंद्र वराडकर, सहकार्यवाह स्वप्निल सावरकर यांनी पालखी वाहून नेण्याचा प्रातिनिधीक अभिमानास्पद असा मानही भक्तिभावाने स्वीकारला. स्मारकाचे कर्मचारी, सदस्यही यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पालखीवर छत्र धरून भगवा झेंडा फडकावत अतिशय भक्तिभावाने पालखीचे स्वागत केले गेले. महाराष्ट्र सरकारनेही यासाठी खास पुढाकार घेतला असून त्यासाठी सर्व प्रशासनही तेथे येणाऱ्या शिवाजी महाराजांच्या लाखो मावळ्यांचे स्वागत करण्यास सज्ज झाले आहे. लाखो मावळे यावेळी रायगडावर येतील. मात्र एक लाख लोक येऊ शकतील अशी जागा तेथे नाही. कडाक्याचे उनही आहे तेव्हा राज्यातील विविध गावांमध्ये गुढीपाडव्याप्रमाणे लोकांनी गुढ्या, ध्वज उभारून शिवपाडवाच साजरा करावा असेही आवाहन यावेळी सुनील पवार यांनी केले.

