अनेकजण मला विचारतात की इतर कितीतरी, विशेषतः देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना येडे समजत होते किंवा कमी लेखत असताना, तुम्ही मात्र अगदी सुरुवातीलाच कसे ठामपणे सांगितले, लिहिले होते की, या दोघांनाही इतर कोणीही प्रसंगी शरद पवार यांनीदेखील कमी लेखू नये. त्यांना अंडरएस्टीमेट करू नये. त्यावर मी, जे हा प्रश्न विचारतात त्यांना एवढेच सांगत असतो की तुम्ही जेव्हा एखाद्याच्या दोषांवर काँसंट्रेट होत असता मी मात्र तेव्हा त्यांचे नेमके गुण पारखत असतो की त्यांच्यातल्या नेमक्या कोणत्या गुणांमुळे ते एवढ्या लहान वयात थेट बलाढ्य शरद पवार यांच्या रांगेत येऊन बसले आहेत आणि हेच या दोघांनाही सांगत आलो आहे की प्लिज शरद पवार यांना अजिबात कमी लेखू नका. याउलट विलासराव देशमुख यांच्यासारखी पवारांच्या डोळ्यात मोठ्या युक्तीने धूळफेक करून त्यांचे मन जिंकायला सुरुवात करा, जे काम तसे थोडे कठीण आहे, असते. पण जमणारच नाही असे नसते. पण, दोघांनीही माझ्या सांगण्याकडे दुर्लक्ष केलं आणि परिणाम दिसताहेत, शरद पवार राजकीय निवृत्त होण्यापूर्वी हेच करण्यात अधिक रस घेताहेत की त्यांना देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे या दोघांचेही राजकीय नेतृत्त्व व अस्तित्त्व संपवून किंवा कमी करून मोकळे व्हायचे आहे. त्यामुळेच पवारांची ती पहिली फार मोठी चाल यशस्वी ठरली की त्यांनी या दोघांनाही एकमेकांपासून कायमचे दूर केले, दोघांचे आपापसात वितुष्ट आणले..
आता कुंदन डाके नावाचा माझा एकेकाळचा जवळचा मित्र हयात नाही. नुकतेच त्याचे निधन झाले. हाच कुंदन एक दिवस माझ्या नरिमन पॉईंटच्या कार्यालयात आला आणि त्याने माझ्या एका जवळच्या नातेवाईकाचा विषय काढताच मी व विक्रांत त्या नातेवाईकाची फार मोठी स्तुती करून मोकळे झालो. त्या नातेवाईकाने कष्ट करून कसे आजचे मोठे यश मिळविले ते सविस्तर त्याला सांगितल्यावर कुंदन माझा हात हातात घेत म्हणाला की आताच तुमच्या त्या नातेवाईकाला भेटूनच वर येतोय आणि तो नातेवाईक तर तुम्हा दोघांविषयी अत्यंत वाईट सांगत होता. तुम्हावर फार खालच्या भाषेत अनेक किस्से सांगत होता. त्यावर त्याने नेमके आमच्याविषयी तुला काय सांगितले, सांगत असताना तो कोणत्या मुद्द्यांवर रडला हेही त्याला सांगितल्यावर कुंदन अवाक झाला. तुम्ही कसे हो हुबेहूब सारे सांगितले? त्यावर मी त्याला म्हणालो, त्याचे व माझे परिचित या राज्यात, आमच्या नातेवाईकांत, माझ्या मूळ गावात सर्वत्र कॉमन आहेत आणि त्या सर्वांकडे तो या एकाच पद्धतीने आमची बदनामी करत असतो, जे मला आता तोंडपाठ झालेले आहे. आणि माझे पोलिसांसारखे आहे. म्हणजे एखाद्याच्या गुन्हा करण्याच्या पद्धतीचा मी अभ्यास करून ठेवतो. त्यामुळे तो नेमका कसा हे मला एखाद्याविषयी लिहिण्यापूर्वी सारे काही तोंडपाठ असते. एवढेच काय तो एखाद्या

तरुणीस प्रेमात पडताना नेमके कसे बोलतो हेही मी त्याची तक्रार घेऊन एकदा माझ्याकडे आलेल्या पत्रकार महिलेला सांगितले होते. तेव्हा ती पण तुझ्यासारखी आश्चर्यचकित झाली होती. त्या नातेवाईकाला मी वाईट दिसतो म्हणून तो तसे सांगतो. पण मला त्याच्यातले दोष फारसे कधी दिसलेच नाहीत. मग मी खोटेखोटे का म्हणून सांगत सुटावे व त्याची विनाकारण बदनामी करावी? याउलट माझा त्याच्याशी जुळवून घेण्याचा कायम प्रयत्न असतो. हेच सारे सांगतील याचा अर्थ माझे त्याच्याबाबतीत अधिक चुकले असावे म्हणून तो माझ्यापासून दूर गेलाय. त्याच्याकडे एक बोट दाखवतानादेखील मला माझी लाज वाटे. कारण उरलेली बोटे माझी स्वतःकडे अशावेळी असतात, उगाच इतरांना दोष देत बसण्यापेक्षा माझे काय चुकले त्यावर माझे कायम आत्मचिंतन असते. मी कुंदनशी बोलणे संपविले तेव्हा त्याच्या डोळ्यात का अश्रू होते माझ्या ते अद्याप लक्षात आलेले नाही. एकतर जेव्हापासून मला आठवते तेव्हापासून ते आजतागायत माझे आयुष्य अनेक खडतर कठीण प्रसंगांनी गुरफटलेले असते. त्यातल्या प्रत्येक प्रसंगातून बाहेर पडतापडता मला नाकेनऊ येत असताना मी वरून इतरांचे दोष दाखवत सुटणे तसेही चुकीचे आहे. एक मात्र नक्की, मी अनेकांना त्यांच्या चुका तोंडावर सांगून मोकळा होतो. त्यामुळे माझ्याविषयी इतरांचे अनेकदा गैरसमज होतात. त्याने जे मला सांगितले होते की मी तुला संपवून राहीन, ते तो नेटाने करतोय. मी सारे काही माझ्या केलेल्या वाईट कर्मांवर व परमेश्वरावर सोडलेले आहे..
अर्थात वरील दोन्हीही परिच्छेद मला सार्वजनिक बांधकाम खात्याच्या बिग बॉसवरून म्हणजे अनिल गायकवाडवरून आठवले. गायकवाड यांना बांधकाम खाते व पोलिसांनी न्यायालयात खेचले होते. त्यांच्यावर अनेक खोटे आरोप करून ते मोकळे झाले होते, ज्याची फार मोठी किंमत या दहा वर्षांत अनिल गायकवाड यांना घरी, दारी, कार्यालयात, समाजात, अत्र-तत्र सर्वत्र मोजावी लागलेली आहे. पण, अनिल गायकवाड स्वतः कॉन्फिडन्ट होते आणि त्यातून ते नुकतेच निर्दोष बाहेर पडले. न्यायालयाने त्यांची निरपराध, निर्दोष म्हणून आरोपातून सुटका केली. ज्याची फार मोठी किंमत अनिल यांना आपल्या आयुष्यात मोजावी लागल्याने मी त्यांना एवढेच म्हणालो की, ज्या-ज्या अधिकाऱ्यांनी तुम्हाला विनाकारण गोवले त्यांच्यावर तुम्ही एका बौद्धधर्मीय अधिकाऱ्याला विनाकारण गोवल्याबद्दल, बदनामीचा खटला दाखल करून तुरुंगात खडी फोडायला पाठवा. त्यावर ते एवढेच म्हणाले की, कुत्रे आपल्याला चावले म्हणजे आपणही त्याला चावायचे नसते. दुर्लक्ष करूया. कारण, समृद्धी महामार्गाची सरकारने माझ्यावर टाकलेली जबाबदारी मला अद्याप पार पाडायची आहे. पण एक अत्यंत आनंदाची बातमी अशी की, सध्या अनिल गायकवाड यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या सचिवपदाचा जो चार्ज आहे, पुढल्या काहीच दिवसात त्यांना नक्की बांधकाम खात्याचे सचिव म्हणून ऑफिशियल जाहीर करण्यात येईल. उद्धवजींना विनंती की, त्यांनी समृद्धीप्रमाणे त्यांच्याकडे राज्यातल्या पार दुर्दशा करून ठेवलेल्या रस्त्यांचीही जबादारी द्यावी म्हणजे ही पंचवार्षिक योजना संपण्यापूर्वी या राज्यातले चकाचक रस्ते गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली जनतेला शंभर टक्के बघायला मिळतील. मित्रांनो, नवी दिल्लीतील नवे महाराष्ट्र सदन आणि मुंबईतल्या कालिना लायब्ररी बांधकामात घोटाळा झाल्याचे ते प्रकरण छगन भुजबळ सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री असताना खूप, खूप गाजल्याचे तुम्हाला आठवत असेलच. आणि याच प्रकरणांमध्ये अनिल गायकवाड यांचा बादरायण संबंध लावून पोलिसांनी अडकविले होते. या दोन्ही प्रकरणात मुंबईच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाने गायकवाड यांची नुकतीच निर्दोष मुक्तता केली आहे. त्यावरूनच त्यांच्यावर केवळ खोटे गुन्हे नोंदविण्यात आल्याचे आता सिद्ध झाले आहे. पण, मनातले सांगतो. ज्या-ज्या मंडळींनी, अधिकाऱ्यांनी केवळ आकसापोटी गायकवाड यांना नको त्या विषयात गोवले, खरोखरी कोणीतरी या अधिकाऱ्यांवर बदनामीचा खटला दाखल करणे, निदान मला तरी गरजेचे वाटते. अनिल गायकवाड या खटल्यादरम्यान ज्या विविध संकटांना सतत सामोरे गेले, त्याचे म्हणाल तर मी एक साक्षीदार असल्याने मला हे असे वाटते. त्यांनी हिशेब चुकता करायलाच हवा. जो इतरांना सतत सहकार्य करण्यात आघाडीवर असतो, देव त्याच्या नक्की पाठीशी असतो. अभियंता अनिल गायकवाड यांना त्यांच्या पुढील शासकीय व राजकीय वाटचालीस शुभेच्छा!

