Homeमुंबई स्पेशलअनेक मान्यवरांनी दिला...

अनेक मान्यवरांनी दिला महाडेश्वरांच्या आठवणींना उजाळा 

मुंबईचे माजी महापौर प्रि. विश्वनाथ महाडेश्वर यांचे गेल्या मंगळवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघाने सर्वपक्षीय शोकसभा रविवारी मुंबईच्या सांताक्रूझ (पूर्व) बिल्लवा भवन येथे आयोजित केली होती. सुमारे अडीच तास चाललेल्या या शोकसभेत सर्वपक्षीय 17 मान्यवरांनी महाडेश्वर यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. यावेळी महाडेश्वर यांची पत्नी, माजी नगरसेविका पूजा महाडेश्वर, मुलगी प्रांजल आणि मुलगा प्रसाद उपस्थित होते. सुरूवातीला ब्रह्मकुमारी सांताक्रूझ केंद्राच्या कमलाबेन दीदी यांनी शांती प्रार्थना म्हटली.

आमदार अनिल परब यांनी महाडेश्वर यांच्या अनेक आठवणींना उजाळा देत त्यांचा जीवनपट उलगडला. सर माझ्या आयुष्यातले अविभाज्य घटक होते. ते माझ्या प्रवासात माझे जवळचे साथीदार होते. प्रत्येक गोष्टीत त्यांची मला साथ होती. पक्षाचे काम करताना ते कधीच तब्येतीचे कारण सांगत नसायचे. महाडेश्वर आणि पालिका एक समीकरण होते. त्यांचा जातीचा दांडगा अभ्यास होता. ओबीसीमध्ये वैश्यवाणी समाजाला स्थान मिळण्यासाठी त्यांनी लढा दिला. विधान परिषदेत पालिकेच्या प्रश्नांवर ते मार्गदर्शन करत असत. मुंबईचे तसेच शिक्षणाचे प्रश्न विचारा असा त्यांचा आग्रह असायचा. त्यांचा अभ्यास, वाचन दांडगे होते. त्यांच्याकडे जबरदस्त माहितीचे स्त्रोत होते. त्यांच्या आकस्मिक निधनाने माहितीचा झरा कायमचा बंद झाला आहे, असे ते म्हणाले.

माजी खासदार हुसेन दलवाई म्हणाले की, इतक्या लवकर आदरांजली वाहण्याची वेळ येईल असे स्वप्नात वाटले नव्हते. मृदू स्वभाव, विनम्र, सतत वाचन करणारे हाडाचे ते शिक्षक होते. गरीब वस्तीत त्यांनी मराठी शाळा काढली. सर्वसामान्य माणसांना आत्मीयता वाटणारे असे ते नेते होते. त्यांच्या जाण्याने या भागाचे व महाराष्ट्राचे नुकसान झाले आहे.

आमदार रमेश कोरगावकर म्हणाले की, राजकीय कार्यातले ते माझे गुरू होते. मला तिसऱ्या वेळा नगरसेवकपद मिळण्यात त्यांचा सिहाचा वाटा होता. समाजात सर्वांना बरोबर घेऊन जाणारे, सभागृहात बोलायला लावणारे, अग्रलेख वाचा असे आग्रह करणारे, सुख-दुःखात ते धावून येणारे, असे लोभस व्यक्तिमत्व म्हणजे विश्वनाथ महाडेश्वर होते.

माजी नगरसेवक सदा परब म्हणाले की, गेली अनेक वर्षे 1992पासून आजपर्यंत त्यांचा माझ्याबरोबरचा प्रवास होता. पुस्तक वाचा, लेख वाचा, पेपर वाचा, अग्रलेख वाचा असा त्यांचा आग्रह होता. ते महापौर असताना अडीच वर्षे त्यांच्या स्पेशल केबिनमध्ये व महापौर बंगल्यात जाण्याची संधी मिळाली. ते महापौर झाले, पण पाय जमिनीवर होते. त्यांचा हसरा चेहरा ही त्यांची मौल्यवान ठेव होती.

माजी नगरसेवक मनोहर चौकर म्हणाले की, शाखाप्रमुख असताना 1992मध्ये दंगलीत त्यांना सहा महिने कारावास झाला होता. त्यांची राजकीय वाटचाल खडतर होती. माजी नगरसेवक रवी भोसले म्हणाले की, त्यांच्या आठवणी आपल्याला प्रेरणा देत राहतील. कुडाळमधून मुंबईत येऊन त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. नामनिर्देशित नगरसेवकांना बोलण्याची सभागृहात संधी मिळाली पाहिजे, असा त्यांचा अट्टाहास होता. सभागृहात मुंबईच्या प्रश्नावर त्यांनी पहाटे 4-5 वाजेपर्यंत सभा घेतल्या. त्यांचे वाचन दांडगे होते. मराठी भाषेसाठी ते आग्रही होते.

माजी नगरसेवक चंद्रकांत पवार म्हणाले की, त्यांच्या मृत्यूपूर्वी काही तास मी आणि त्यांचे भाऊ त्यांच्या घरी त्यांना शेवटचे भेटलेले व्यक्ती होतो. यावेळी अनेक गप्पागोष्टी झाल्या. सुमारे दोन तास आम्ही त्यांच्या घरी होतो. त्यांचे पुस्तकाचे दांडगे वाचन होते. ते दयाळू, प्रेमळ, सुस्वभावी होते. यावेळी महापौरांना त्याच्या कामात मदत करणारे अनिल त्रिवेदी, शिवजी सिंह, माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली, कोल्हापूरचे राजू समेळ, भाजपचे लोकेश मालुसरे, त्यांचे जुने मित्र दशरथ शिंगाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे दिनेश लंगोटे, काँग्रेसचे सुवर्णा, राजुल पटेल आदी मान्यवरांनी प्रि. विश्वनाथ महाडेश्वर यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला.

Continue reading

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्यापासून जर्मनीच्या दौऱ्यावर

इराण आणि अमेरिकेतला संघर्ष तीव्र होत असतानाच तसेच नाटो संघटनेतल्या युरोपीय राष्ट्रांची यावरील भूमिका महत्त्वाची ठरत असतानाच भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्यापासून 23 एप्रिलपर्यंत तीन दिवसांच्या जर्मनीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यादरम्यान, संरक्षण मंत्री त्यांचे जर्मनीतील समकक्ष बोरिस...

समाजमाध्यमांवरच्या 11 हजार संदेशांविरूद्ध निवडणूक आयोगाची कारवाई

देशातली पाच राज्यांमध्ये होत असलेल्या विधानसभेच्या निवडणुका तसेच काही ठिकाणी होत असलेल्या पोटनिवडणुका यासंदर्भात 15 मार्च 2026 रोजी घोषणा झाल्यापासून आतापर्यंत 11 हजारांपेक्षा अधिक समाजमाध्यम संदेश, यूआरएल शोधण्यात आले असून त्यावर केंद्रीय निवडणूक आयोगाने कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये आशय काढून टाकणे, प्रथम माहिती अहवाल नोंदविणे, स्पष्टीकरणे आणि खंडन यांचा समावेश आहे. केंद्रीय...

विलेपार्ल्यात साकारतोय मुंबईतील पहिला शहरी शेतीप्रकल्प

मुंबईतल्या विलेपार्ले विधानसभा क्षेत्राचे भाजपा आमदार पराग अळवणी यांच्या संकल्पनेतून मुंबईतील पहिल्या शहरी शेती प्रकल्पाचे उद्घाटन महापौर रितू तावडे यांच्या उपस्थितीत होणार असून उपमहापौर संजय घडी आणि महापालिका आयुक्त अश्विनी भिडे तसेच महापालिकेतील विविध समिती अध्यक्ष व अधिकारी यावेळी...
Skip to content