सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर नैतिकतेच्या गप्पा मारणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याबरोबर असलेल्या 14-15 आमदारांना उद्याच्या उद्या राजीनामा देण्यास सांगावे, असे आव्हान शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी काल एका पत्रकार परिषदेत दिले.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर कालपासून उद्धव ठाकरे तसेच त्यांच्या गटाचे खासदार संजय राऊत नैतिकतेची भाषा करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राजीनामा मागत आहेत. विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपा एकत्र लढली होती. त्यावेळेला शिवसेनेच्या उमेदवारांना भारतीय जनता पार्टीची मतेही पडली होती. त्यामुळे नैतिकता दाखवायची असेल तर भाजपाच्या मतांचा मदतीने निवडून आलेल्या या चौदा-पंधरा आमदारांनी आपल्या पदाचा आधी राजीनामा द्यावा आणि मग नैतिकतेच्या गोष्टी लोकांना सांगाव्या असेही ते म्हणाले.
सर्वोच्च न्यायालयाने ठाकरे गटाने मांडलेल्या आठ विविध याचिकांपैकी सहा याचिका फेटाळलेल्या आहेत. राजकीय पक्ष निश्चित करण्यासाठी तसेच अपात्रतेच्या मुद्द्यावर निर्णय घेण्याचे अधिकार अध्यक्षांकडे असल्याचा निर्णय न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे चवताळलेल्या ठाकरे गटाने आता अध्यक्ष घटनाबाह्य आहेत, अशी भाषा बोलायला सुरुवात केली आहे. आपल्यासोबत असलेले आमदार आणि तसेच कार्यकर्ते टिकवण्यासाठी, त्यांची दिशाभूल करण्यासाठी आता यांनीही आवई उठवली आहे. सर्वोच्च न्यायालयाने सध्याचे सरकार घटनाबाह्य नसून कायदेशीर आहे असेही स्पष्ट केलेले आहे. याआधी हे सरकार तीन महिन्यांत कोसळेल असे सांगत कार्यकर्त्यांना थोपवून धरण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांनी केला होता. ते आता साध्य होत नाही, हे सरकार टिकणार आहे हे लक्षात आल्यानंतर आता त्यांनी नैतिकतेच्या गप्पा मारून आपली बाजू कशी योग्य होती, हे सांगण्याचा प्रयत्न चालवला आहे असेही शिंदे यांनी सांगितले. नेहमी दुटप्पी भूमिका घेणारे उद्धव ठाकरे कालपासून नैतिकतेचे धडे देत आहेत. आपल्याला नैतिकतेच्या आधारावर मुख्यमंत्रीपद नको म्हणून सांगणारे ठाकरे यांनी न्यायालयाकडे आपल्याला परत मुख्यमंत्रीपदी नेमावे म्हणून याचिका दाखल केली होती. सर्वसामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री करायचे असे सांगून स्वतः मुख्यमंत्री झाले. बारसू येथे रिफायनरी करायची असं पत्र स्वतः दिले आणि आंदोलनही स्वतःच करत आहेत. हा सगळा सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न आहे. आजही त्यांचे कार्यकर्ते तसेच आमदार आमच्या संपर्कात आहेत. राष्ट्रवादी तसेच काँग्रेसचेही काही आमदार आमच्या संपर्कात आहेत, असे उदय सामंत यांनी यावेळी सांगितले. खासदार राहुल शेवाळे, संजय शिरसाट आदी नेतेही या पत्रकार परिषदेला उपस्थित होते.

