महाराष्ट्रातील अत्यंत लोकप्रिय असा पदार्थ म्हणजे पुरणपोळी. महाराष्ट्रात पुरणपोळीला एक वेगळं महत्त्व आहे. आजच्या घाईगडबडीच्या जीवनशैलीत अनेकांना पूर्वीसारखे पुरणपोळ्या करणे जमत नाही. त्यामुळेच नवी मुंबईतील वाशी येथील भास्कर्स पुरणपोळी घर, यांनी तब्बल २५ प्रकारच्या पुरणपोळ्या खवय्यांसाठी उपलब्ध केल्या आहेत. अभिनेत्री भाग्यश्री मोटेच्या हस्ते या पुरणपोळी घरचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले. यावेळी या पुरणपोळी घरचे संस्थापक अध्यक्ष विट्टल शेट्टी, सौरभ चौधरी, भास्कर के आरसह अनेक मान्यवर उपस्थित होते. उद्घाटनानंतर भाग्यश्रीने येथील पुरणपोळ्यांची चवही चाखली आणि त्यांचा आस्वादही घेतला.

यानंतर भाग्यश्री म्हणाली की, माझ्यासारख्या महाराष्ट्रीय लोकांसह सर्वच जणांसाठी पुरणपोळी हा एक आवडता पदार्थ आहे. माझ्याकडून भास्कर पुरणपोळी घरच्या आउटलेटच्या उद्घाटन व्हावे हा माझ्यासाठी गर्वाचा क्षण आहे. मी बीपीजी युनिकॉर्न एलएलपी टीमला शुभेच्छा देते. नवी मुंबईतील सर्वांसाठी हे पुरणपोळी घर म्हणजे अनोखा उपक्रम आहे. सर्वांनी येथे पुरणपोळ्यांचा मनमुराद आनंद लुटावा.

भास्कर पुरणपोळी घरचे विठ्ठल शेट्टी यावेळी म्हणाले की, हा बीपीजी युनिकॉर्न एलएलपीचा उपक्रम आहे, ज्यांना अन्न, संचालन आणि व्यवस्थापन रचना या क्षेत्रात २० ते २५ वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्राच्या पुरणपोळीची मूळ चव, संस्कृती जपण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. २०२१पासून ३ लाख जणांपर्यंत आमची ही सेवा पोहोचली असून खपसखुशीत पुरणपोळ्यांच्या २५पेक्षा अधिक प्रकार आम्ही तयार करतो. कुठलेही रासायनिक पदार्थ न वापरता हे पदार्थ बनविले जातात.

