संसदेच्या चर्चासत्रातील सहभाग… उपस्थिती… विचारलेले प्रश्न आणि मांडलेली खासगी विधेयके… यातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा सर्वोत्कृष्ट खासदारकीच्या मानचिन्हावर मोहोर उमटवली आहे. आपल्या अभ्यासपूर्ण मांडणीने व नेमकेपणामुळे पुन्हा एकदा खासदार सुळे यांनी देशाच्या संसदेत महाराष्ट्राचा आवाज बुलंद करून दाखवला आहे.
देशाचे सर्वोच्च सभागृह समजल्या जाणाऱ्या संसदेतील खासदारांच्या प्रभावी कामगिरीचा आढावा घेणाऱ्या प्रख्यात इ-मॅगेझिनचा एप्रिल महिन्याचा अहवाल नुकताच जाहीर झाला असून या अहवालात संसदेतील नोंदीनुसार खासदार सुप्रिया सुळे अव्वल ठरल्या आहेत. १७व्या लोकसभेच्या या अहवालात २०१९पासून आतापर्यंत देशभरातील खासदारांनी संसदेतील किती चर्चासत्रात भाग घेतला… त्यांनी किती खासगी विधेयके मांडली… प्रश्न किती विचारले आणि त्यांची सभागृहात उपस्थिती किती होती, अशी सर्वांगीण अभ्यासपूर्ण पाहणी करण्यात आली आहे.
या पाहणीमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांनी सर्वाधिक ७११ गुणांक मिळवून देशातील सर्वोत्कृष्ट खासदार होण्याचा मान मिळवला आहे. संसदेच्या आजवरच्या एकूण २२९ चर्चासत्रात सहभागी होत त्यांनी तब्बल ५४६ प्रश्न विचारले आहेत. इतकेच नाही तर त्यांनी या कामगिरीमध्ये १३ खासगी विधेयके मांडत देशातील सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना प्रथमच पटलावर आणत त्यावर कायदा व्हावा, अशा सूचनाही मांडल्या आहेत.
संसदेत खासदार सुळे यांची ९३ टक्के उपस्थिती आहे. याची टक्केवारी पाहता राष्ट्रीय पातळीवर ७९ टक्के तर राज्य पातळीवर ७४ टक्के इतकी होते. चर्चासत्रात सहभागाची टक्केवारी राष्ट्रीय पातळीवर ४१.५ तर राज्य पातळीवर ५१.३, खासगी विधेयके राष्ट्रीय पातळीवर १.२ तर राज्य पातळीवर २.४ इतकी आहे. संसदेत त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची सरासरी राष्ट्रीय पातळीवर १७६ असून राज्य पातळीवर ती तब्बल ३२७ इतकी असल्याचे ई-मॅगेझिनच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
आपल्या मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेचा आवाज देशाच्या सर्वोच्च सभागृहापर्यंत पोहोचवणे, त्यांच्या समस्या पटलावर मांडणे, त्या सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे, स्थानिक पातळीपासून मंत्रालयापर्यंत आणि प्रत्यक्ष भेटीपासून संसदेत आवाज उठवण्यापर्यंत त्याचा पाठपुरावा करणे यासाठी जशा खासदार सुप्रिया सुळे या ओळखल्या जातात, तशाच आपल्या विषयाची मुद्देसूद मांडणी, त्याचा सखोल अभ्यास, नेमकेपणाने बोलणे, संसदेचा पुरेपूर मान राखत योग्य तेच बोलणे, जास्तीतजास्त उपस्थिती, चर्चासत्रात सहभागी होणे इतकेच नाही तर एखाद्या लोकोपयोगी विषयाचा परिपूर्ण अभ्यास करून तो खासगी विधेयकाच्या रूपाने पटलावर मांडण्यातही त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. याच कारणांमुळे पुन्हा एकदा त्यांनी देशातील सर्वोत्कृष्ट खासदार होण्याचा मान मिळवला आहे.

