Homeमुंबई स्पेशलमुंबईत नाल्यात तरंगणारा...

मुंबईत नाल्यात तरंगणारा कचरा ठरते आहे डोकेदुखी!

मुंबईतील अनेक मोठ्या नाल्यांमध्ये नागरिकांनी टाकलेला तरंगणारा कचरा नाल्यातून गाळ काढण्याच्या कामातील सर्वात मोठा अडथळा आहे. अनेक भागात नाल्यातून गाळ काढल्यानंतरही त्यात पुन्हा कचरा टाकण्याचे प्रकार थांबत नाहीत. हा तरंगणारा कचरा नियमितपणे काढावा, असे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी पर्जन्य जलवाहिन्या विभागाला दिले.

पूर्व उपनगरातील नाल्यातून गाळ काढून वाहून नेण्याच्या कामांची वेलरासू यांनी आज पाहणी केली. त्यावेळी त्यांनी ठिकठिकाणी कामांची स्थिती पाहून संबंधितांना आवश्यक ते निर्देश दिले. मुंबईतील नाल्यांमध्ये टाकण्यात येणाऱ्या कचर्‍यामध्ये थर्माकॉल, प्लास्टिक पिशव्या, फर्निचर, रबर, रॅपर्स असा विविध प्रकारचा तरंगता कचरा (फ्लोटिंग मटेरिअल) नागरिकांकडून टाकण्यात येतो. त्यामुळे घनकचरा व्यवस्थापन विभागासोबत समन्वयाने हा तरंगता कचरा नाल्यात येण्यापासून कसा रोखता येईल, यादृष्टीने पर्जन्य जलवाहिन्या विभागाने प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

त्यादृष्टीने समन्वयासाठी बैठक लवकर आयोजित करावी, अशी सूचनाही त्यांनी पर्जन्य जलवाहिन्या विभागाला केली. छोट्या नाल्यांच्या ठिकाणी जाळ्या लावता येतील का अथवा ते नाले बंदिस्त करता येतील का? तसेच मोठ्या नाल्यांच्या ठिकाणी स्क्रिनिंग किंवा नेटचा पर्याय वापरता येईल का? याबाबतची चाचपणी करावी. नाल्यांमध्ये कचरा जाण्यापासून रोखण्यासाठी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने आवश्यकतेनुसार निविदा प्रक्रिया सुरू करावी. नाल्यातून गाळ काढण्याव्यतिरिक्त ही प्रक्रिया पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून राबवावी, असे निर्देशही त्यांनी दिले. आगामी वर्षभरात नाल्यातून नियमित गाळ आणि कचरा बाहेर काढले जाईल, याची कंत्राटदार नेमून जबाबदारी सुनिश्चित करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

मुंबईतील नागरिकांची पावसाळ्यात कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून मुंबई महापालिकेचा पर्जन्य जलवाहिन्या विभाग अव्याहतपणे काम करत असतो. पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून पर्जन्य जलवाहिन्या विभागाकडून महानगरपालिका क्षेत्रात नाल्यांमधील गाळ काढण्याचे काम वेगाने केले जात आहे. पूर्व उपनगरात सुरू असलेल्या गाळ काढण्याच्या नियोजित कामांचे उदिष्ट वेळेत पूर्ण करावे, अशी सूचनाही वेलरासू यांनी केली.

या दौऱ्यात उपायुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले, प्रमुख अभियंता (प्रभारी) (पर्जन्य जलवाहिन्या) प्रकाश सावर्डेकर आणि इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते. दादर, धारावी नाला, ए. टी. आय. नाला, व्ही. एन. पुरव मार्ग, माहूल नाला, वसंतदादा पाटील महाविद्यालय (प्रियदर्शनी), रफी नगर नाला, पीएमजीपी नाला, घाटकोपर मानखुर्द जोड रस्ता, मानखुर्द नाला, लक्ष्मीबाग नाला, पूर्व द्रुतगती महामार्ग (घाटकोपर), जॉली बोर्ड नाला, ९० फीट रोड (कांजूरमार्ग), बाऊंड्री नाला (मुलुंड) या भागातील कामांची पाहणी केली. ३१ मे २०२३पर्यंत नाल्यातून गाळ काढण्याची कामे वेळापत्रकाप्रमाणे पूर्ण करण्याचे निर्देशही वेलरासू यांनी यंत्रणेला दिले.

Continue reading

२४ एप्रिलपर्यंत राज्यात वादळी पाऊस, गारपीट व विजांचा इशारा

भारतीय हवामान खात्याच्या आज जाहीर केलेल्या अंदाजानुसार, राज्यातील विविध भागांत २४ एप्रिलपर्यंत वादळी वारे, विजांचा कडकडाट, गारपीट आणि पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विशेषतः मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकण विभागातल्या जिल्ह्यांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने केले आहे. या पार्श्वभूमीवर...

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्यापासून जर्मनीच्या दौऱ्यावर

इराण आणि अमेरिकेतला संघर्ष तीव्र होत असतानाच तसेच नाटो संघटनेतल्या युरोपीय राष्ट्रांची यावरील भूमिका महत्त्वाची ठरत असतानाच भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्यापासून 23 एप्रिलपर्यंत तीन दिवसांच्या जर्मनीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यादरम्यान, संरक्षण मंत्री त्यांचे जर्मनीतील समकक्ष बोरिस...

समाजमाध्यमांवरच्या 11 हजार संदेशांविरूद्ध निवडणूक आयोगाची कारवाई

देशातली पाच राज्यांमध्ये होत असलेल्या विधानसभेच्या निवडणुका तसेच काही ठिकाणी होत असलेल्या पोटनिवडणुका यासंदर्भात 15 मार्च 2026 रोजी घोषणा झाल्यापासून आतापर्यंत 11 हजारांपेक्षा अधिक समाजमाध्यम संदेश, यूआरएल शोधण्यात आले असून त्यावर केंद्रीय निवडणूक आयोगाने कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये आशय काढून टाकणे, प्रथम माहिती अहवाल नोंदविणे, स्पष्टीकरणे आणि खंडन यांचा समावेश आहे. केंद्रीय...
Skip to content