Homeपब्लिक फिगरबारसूतल्या उपऱ्यांची सुपारी...

बारसूतल्या उपऱ्यांची सुपारी घेऊन मला विरोध करता?

रत्नागिरी जिल्ह्यातल्या बारसू येथे आपल्याला विरोध करण्यासाठी तुम्ही कोणाची सुपारी घेऊन येत आहात? ज्या उपऱ्यांनी तेथे जमिनी घेऊन भूमिपुत्रांच्या घरादारावर वरवंटा फिरवायचे ठरवले आहे, त्यांची सुपारी घेऊन तुम्ही मला विरोध करत आहात का, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी आज एका पत्रकार परिषदेत केला.

नाणार प्रकल्प रद्द झाल्यानंतर बारसू येथे रिफायनरीचा एक चांगला प्रकल्प येत आहे, असे मला आता मोर्चे काढणाऱ्या लोकांकडून सांगण्यात आले होते. तसा आग्रह झाल्यामुळे मी केंद्र सरकारकडे या रिफायनरीसंदर्भात पत्र दिले होते. पण पत्र दिले होते याचा अर्थ पोलिसी बळ वापरून तो राबवा असा होत नाही. माझे सरकार पाडल्यानंतर सर्व चांगले प्रकल्प गुजरातला गेले. याचा अर्थ राख इकडे आणि रांगोळी तिकडे असे समजायचे का? हा प्रकल्प इतका चांगला असेल तर लोकांसमोर त्याचे सादरीकरण करा आणि त्यांचे गैरसमज दूर करा. नाहीतर हा प्रकल्प तरी दूर करा. डोक्यावर बंदूक ठेवून परवानगी घेण्याचे कारण काय, असा सवालही  त्यांनी केला.

शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या पक्षाध्यक्षपदाच्या राजीनाम्याचा निर्णय अजून अंतिम झालेला नाही. तो निर्णय झाला की मग त्यावर भाष्य करीन. त्यांनी तसा निर्णय घ्यावा की नाही हा त्यांचा अंतर्गत भाग आहे. मी त्यांना सल्ला देणारा कोण? आणि माझा सल्ला उद्या त्यांनी मान्य केला नाही मग काय करणार, असेही ते म्हणाले. शरद पवार यांनी जरी राजीनामा दिला तरीही महाविकास आघाडीवर याचा कोणताही परिणाम होणार नाही. माझ्याकडून महाविकास आघाडीला तडा जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.

कर्नाटकच्या निवडणूक प्रचारात काँग्रेसने बजरंग दलाचा उल्लेख केला तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बजरंग बलीचा उल्लेख केला. मला समजत नाही की काँग्रेस आणि भाजप यांना बजरंगाचे बळ कशाला पाहिजे? त्यांच्या स्वतःमध्ये बळ नाही का असेही उद्धव ठाकरे म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या प्रचारात बजरंग बलीचा उल्लेख करून मतदान करण्याचे आवाहन केले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मताचा अधिकार हिंदुत्वाच्या मुद्द्यावर सहा वर्षांसाठी काढून घेण्यात आला होता. आता मोदी जे शब्दप्रयोग करत आहेत ते पाहता निवडणूक आयोगाच्या कायद्यात काही बदल झाले असावेत, असा टोलाही त्यांनी लगावला.

आपला विरोध पंतप्रधान मोदी या व्यक्तीला नाही तर त्यांच्या हुकूमशाही प्रवृत्तीला आहे आणि भाजपच्या या हुकूमशाही प्रवृत्तीच्या विरोधामध्ये सर्व पक्षांनीच नव्हे तर जनतेनेही एकत्र आले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. शरद पवार यांनी त्यांच्या आत्मचरित्रात उद्धव ठाकरेंबद्दल केलेल्या टिप्पणीवर त्यांनी काही भाष्य करण्यास नकार दिला. मी केलेले काम जनतेसमोर आहे. त्यामुळे मी यावर काही बोलणार नाही, असे ते म्हणाले. पवार यांनी लोक माझे सांगाती, या आत्मचरित्रपर पुस्तकात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून फक्त दोन दिवस मंत्रालयात जाणे हे आम्हाला मान्य नाही, असे म्हटले आहे.

Continue reading

केरळमध्ये डाव्या आघाडीच्या सरकारसाठी मोदी प्रयत्नशील!

केरळमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराने वेग घेतला असून, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मंगळवारी कन्नूर येथील जाहीर सभेत सत्ताधारी डावी लोकशाही आघाडी (एलडीएफ) आणि भारतीय जनता पक्ष यांच्यावर कडाडून टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केरळमध्ये डाव्या आघाडीचे...

नव्या बदलांसह ‘दिवाळखोरी’ लोकसभेत मंजूर!

लोकसभेने काल इन्सॉल्व्हन्सी अँड बँकरप्सी कोड (संशोधन) विधेयक, २०२५ दुरुस्त्यांसह मंजूर केले. वित्त व कॉर्पोरेट अफेअर्स मंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या या विधेयकात १२ महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. हे विधेयक आता राज्यसभेकडे जाणार आहे, पण लोकसभेतील मंजुरीने...

‘बीएमसी’त इतिहास घडविणाऱ्या ‘मेट्रो वुमन’!

बीएमसीच्या म्हणजेच मुंबई महापालिकेच्या १३८ वर्षांच्या प्रदीर्घ इतिहासात आजपर्यंत आयुक्तपदावर कधीही महिला बसली नव्हती. मात्र, ३१ मार्च २०२६ हा दिवस त्या इतिहासाला कलाटणी देणारा ठरला. महाराष्ट्र सरकारने वरिष्ठ आयएएस अधिकारी अश्विनी भिडे यांची बीएमसी आयुक्तपदी नियुक्ती जाहीर केली. या...
Skip to content