मेंदूमधील न्यूरॉन्स मृत होऊ लागल्याने अल्झायमर आणि स्मृतिभ्रंश, भ्रम (Hallucinations) असे आजार होतात. अल्झायमर हा हळूहळू वाढणारा आजार असल्याने आणि खूप प्रभावी औषधे उपलब्ध नसल्याने या रुग्णांचे पुनर्वसन करणे हाच उपाय उरतो, असे डॉ. प्रणव देशमुख म्हणाले.

केंद्रीय संचार ब्युरो क्षेत्रीय कार्यालय कोल्हापूर आणि वसंतरावदादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च यांच्या संयुक्त विद्यमाने अल्झायमर्स आजारावर आधारित एकांकिकेच्या सांगली येथील कार्यक्रमात ते बोलत होते. या रोगात कौटुंबिक, वैद्यकीय, मानसोपचार यासारखी मदत खूप महत्त्वाची असते. मानसिक मदतीमध्ये सामाजिक आणि भावनिक मदत महत्त्वाची असते, असे त्यांनी सांगितले.

यावेळी भार्गवी गोगटे, गायत्री लोहकरे यांनी निखिल पुराणिक यांच्या मार्गदर्शनाखाली अल्झायमरवर आधारित एकांकिका प्रस्तुत केली. यावेळी डॉ. आर. एम. यल्लाटी, डॉ. भगवान पाटील तसेच इतर शिक्षकवृंद आणि विद्यार्थी उपस्थित होते.

