लसीकरणासाठी जय्यत तयारीचा दावा करत आम्हाला लसीचा पुरेसा साठा उपलब्ध करून दिला जात नाही म्हणून केंद्र सरकारवर दुगाण्या झाडणाऱ्या राज्यातल्या आघाडी सरकारने आतापर्यंत फक्त नऊ लाख लोकांनाच लस देण्यात यश मिळविल्याचे आज अखेर स्पष्ट झाले. समाजमाध्यमाद्वारे जनतेला संबोधित करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतःच ही कबुली दिली.
या लसीमुळे आपल्याला काही साईडइफेक्ट होतील या भीतीने लसीकरण कमी झाल्याची कबुली देताना ही भीती दूर करण्यात सरकार कमी पडले हेही त्यांनी अप्रत्यक्षपणे मान्य केले. त्याचबरोबर कोणतीही भीती न बाळगता बेधडकपणे लस टोचून घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्र सरकारकडून आम्हाला कमी लसपुरवठा केला जात असल्याचे सांगत ५० लाख लोकांना लस देण्याची तयारी आम्ही केल्याचे म्हटले होते.
अभावानेच प्रत्यक्ष स्थळावर जात कार्यक्रमांना हजर राहणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी उद्यानंतर आपण सर्व शासकीय कार्यक्रम दूरदृष्य प्रणालीमार्फत करणार असल्याचे जाहीर केले. सर्व राजकीय, सामाजिक, धार्मिक कार्यक्रम तसेच यात्रांवर काही काळासाठी बंदी घालण्यात येत असल्याचेही त्यांनी जाहीर केले. जनतेला मास्क लावणे, सुरक्षित अंतर ठेवणे तसेच वारंवार हात धुण्याचे आवाहन करून राज्यात पुन्हा लॉकडाऊन जाहीर करण्याबाबतचा निर्णय आपण एका आठवड्यानंतर घेऊ, असेही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.
आपल्या संबोधनात पुन्हा मुख्यमंत्र्यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे नाव न घेता त्यांच्यावर तसेच केंद्र सरकारवर वाढत्या कोरोनाचे खापर फोडण्याचा प्रयत्न केला. अलीकडे काही जण कोरोना योद्ध्यांचा सत्कार करत फिरत आहेत. कोरोना योद्ध्यांचा सत्कार व्हायलाच हवा. पण यानिमित्ताने तुम्ही कोरोना दूत होऊ नका. कोरोना पसरवण्यासाठी कारणीभूत ठरणारे हे सुरू करा, ते उघडा असे सांगू नका, असे ते म्हणाले.
काही जण आरटीपीसीआर चाचण्या वाढविण्यास सांगत आहेत. चाचण्या जरूर वाढवू, पण नियमांचे पालन करण्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल त्यांनी केला. माझे कुटूंब, माझी जबाबदारी, या मोहिमेप्रमाणे आता मी जबाबदार, अशी मोहीम आपण सुरू करूया, असे ठाकरे म्हणाले.

