नुकत्याच झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई भेटीत आपण राजकीय जबाबदारीतून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन व चिंतनात व्यतित करू इच्छितो, अशी इच्छा त्यांच्याकडे व्यक्त केली असल्याची माहिती राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज जाहीर केली.
या संदर्भात राजभवनाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकातून राज्यपाल कोश्यारी यांनी ही माहिती दिली.
महाराष्ट्रासारख्या संत, समाजसुधारक आणि शूरवीरांच्या महान भूमीचा राज्यसेवक, राज्यपाल होण्याचा बहुमान मिळणे हे माझ्याकरिता अहोभाग्य होते. गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ राज्यातील जनसामान्यांकडून मिळालेले प्रेम आणि आपुलकी कधीही विसरता येणार नाही. माननीय पंतप्रधानांच्या नुकत्याच झालेल्या मुंबई दौऱ्यात आपण राजकीय जबाबदाऱ्यांमधून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन व चिंतनात व्यतित करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. माननीय पंतप्रधानांचा विशेष स्नेह आपणास नेहमीच लाभत आला आहे आणि आशा आहे की या संदर्भातदेखील मला त्यांचा आशिर्वाद मिळत राहील, असे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या मनोगतामध्ये म्हटले असल्याचे राजभवनाने स्पष्ट केले आहे. राज्यपालपद हे घटनात्मक पद मानले जाते. त्यामुळे ते राजकीय पद असल्याचे संबोधून राज्यपाल कोश्यारी यांनी विरोधकांना पुन्हा टीकेची संधी दिल्याचे बोलले जाते. त्याचप्रमाणे राज्यपालांची नेमणूक राष्ट्रपतींकडून राज्यातले प्रतिनिधी म्हणून केली जाते. त्यामुळे या पदावरून पायऊतार होण्याची इच्छा व्यक्त करताना ती राष्ट्रपतींकडे करायला हवी. पण राज्यपाल कोश्यारी यांनी पदावरून दूर होण्याची इच्छा राष्ट्रपतींऐवजी पंतप्रधानांकडे व्यक्त करण्यामागे कोश्यारी यांना नेमका कोणता संदेश द्यायचा आहे, अशी विचारणाही राजकीय क्षेत्रात होत आहे.

