मुंबईच्या चेंबूर येथील भारतीय जनता पक्षाचे माजी मंडळ अध्यक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक आणि भाजपाच्या राष्ट्रीय महिला मोर्चाच्या माजी अध्यक्षा, माजी आमदार डॉ. कांताताई नलावडे यांचे पती जयसिंगराव (अण्णा) तुकाराम नलावडे यांचे चेंबूर येथील एका खाजगी रुग्णालयात अल्पशा आजाराने काल, सोमवारी, २७ डिसेंबर रोजी रात्री निधन झाले.
ते ८३ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी डॉ. कांताताई नलावडे, मुलगा अमोल, सून नैना, मुलगी शिल्पा नलावडे-कुलकर्णी, जावई आर्किटेक्ट अमित कुलकर्णी व नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात मंगळवारी चेंबूरच्या विद्युत दाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
जयसिंगराव नलावडे यांनी १९६२-१९७० यादरम्यान ‘जनसंघा’मध्ये स्वतःला पूर्णवेळ वाहून घेतले होते. त्यांनी १९७२च्या काळात ‘आणीबाणी’ सुरू असताना मुंबईत भूमिगत राहून ‘जनसंघा’च्या चळवळीत महत्त्वाचे योगदान दिले. १९७५पासून ‘जनता पार्टी’च्या निष्ठावान कार्यकर्त्याची भूमिका निभावत पक्षवाढीसाठी बळकटी दिली. १९८०मध्ये भाजपात ते कार्यरत राहिले. १९८५मध्ये त्यांनी पक्षातर्फे महापालिकेची निवडणूक लढवली. पाच दशकांपूर्वी आपली सुविद्य पत्नी कांताताई यांचे राजकारणातील वर्चस्व आणि कार्य पाहून त्यांना प्रोत्साहन, पाठिंबा देण्याची भूमिका त्यांनी अखेरपर्यंत निभावली. सोबत पुस्तक छपाईच्या व्यवसायात विपुल कार्य करून अनेक दर्जेदार पुस्तकांची निर्मिती केली. साहित्य संस्कृती मंडळाच्या पुस्तकांची छपाई करण्यात ते अग्रेसर होते.
त्यांच्या निधनाचे वृत्त ऐकून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय मंत्री खा. प्रकाश जावडेकर, खा. उदयनराजे भोसले, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार, आ. मनिषा चौधरी यांसह भाजपाच्या अनेक नेत्यांनी नलावडे यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.

