हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र विधान भवन मुंबई येथील मध्यवर्ती सभागृहात बसविण्यात येणार आहे. या तैलचित्राचा अनावरण सोहळा ठाकरे यांच्या येत्या जयंतीदिनी म्हणजेच सोमवारी, २३ जानेवारी २०२३ रोजी सायंकाळी ५ वाजता मुंबईत विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.
विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काल ही माहिती दिली. ऑगस्ट २०२२मध्ये झालेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असे तैलचित्र बसविण्याबाबतचे निवेदन केले होते. त्यानुषंगाने याबाबतची कार्यवाही तातडीने करण्यात येईल असे या सभागृहाला आश्वासित केले होते. त्यानुसार बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात समारंभपूर्वक झळकणार आहे.
महापुरूषांचे पुतळे लावण्यासाठी रीतसर परवानगी बंधनकारक
दरम्यान, राज्यातील कोणत्याही गावात किंवा शहरात राष्ट्रपुरूष किंवा थोर व्यक्तींचे पुतळे उभारण्यास रीतसर पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधान परिषदेत स्पष्ट केले.
येवला तालुक्यातल्या राजापूर गावातील चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविल्याबद्दल गुन्हे दाखल केल्याबाबतचा मुद्दा नरेंद्र दराडे यांनी एका लक्षवेधी सूचनेद्वारे उपस्थित केला होता. त्याच्या उत्तरात उपमुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली.
कोणत्याही शहरात किंवा गावात थोर महापुरूषांचे पुतळे स्थापन करण्यास मनाई नाही. मात्र पुतळा बसविण्यासाठी रीतसर पूर्वपरवानगी घ्यावी लागते. याबाबत शासनाने पुतळा बसविण्याविषयी कार्यपद्धती आणि मार्गदर्शक तत्त्वे विहित केली आहेत. राजापूर-ममदापूर चौफुली येथे ग्रामपंचायतीच्या जागेमध्ये काही व्यक्तींनी परवानगी न घेता आणि विहित कार्यपद्धतीचा अवलंब न करता छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पूर्णाकृती पुतळा स्थापन केला होता. यामुळे या तरूणांवर आदेशाचा भंग केल्याने गुन्हे दाखल झाले आहेत. त्यांच्यावरील गुन्हे मागे घेतले जातील. याबाबत उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत, असेही फडणवीस यांनी सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत जयंत पाटील यांनी सहभाग घेतला.

