रेल्वे गाड्यांमध्ये पुरवल्या जाणार्या जेवणाचा दर्जा योग्य आहे याची खात्री करण्यासाठी तपासणी आणि देखरेखीचा एक भाग म्हणून अन्नाचे नमुने नियमितपणे गोळा केले जात आहेत. गेल्या तीन वर्षांत रेल्वे/आरसीटीसी द्वारे 787 नमुने गोळा केले गेले तर गेल्या तीन वर्षांत (31.10.2022पर्यंत) राजधानी गाड्यांमधील खानपान सेवांबाबत एकूण 6,361 तक्रारी प्राप्त झाल्या, अशी माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नुकतीच राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.
प्रत्येक प्रकरणात दंड, शिस्त आणि अपील नियम (D&AR) कारवाई इत्यादींसह योग्य कारवाई करण्यात आली. प्रवाशांचा अभिप्राय आणि तक्रारींचे निवारण करण्यासाठी Rail Madad, Twitter handle @ IR CATERING, CPGRAMS, ई-मेल आणि एसएमएस यांची एक प्रणाली विकसित केली आहे, असेही ते म्हणाले.
भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (एफएसएसएआय) निश्चित केलेल्या विहित मानदंड आणि मानकांनुसार अधिसूचित प्रमाणानुसार चांगल्या दर्जाचे अन्न पुरवण्याचा भारतीय रेल्वेचा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे. राजधानी गाड्यांसह इतर रेल्वेगाड्यांमधील प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या अन्नाचा दर्जा सुधारण्यासाठी हाती घेतलेले प्रमुख उपक्रम पुढीलप्रमाणे आहेत:
- बेस किचन/स्वयंपाकगृह युनिट्सचे आधुनिकीकरण हाती घेतले.
- बेस किचन/स्वयंपाकगृहामध्ये स्वयंपाक तयार करत असताना प्रत्यक्ष देखरेख करण्याच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.
- राजधानी गाड्यांमध्ये भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळ लिमिटेड (आयआरसीटीसी) पर्यवेक्षकांची नियुक्ती.
- खाद्यपदार्थांच्या पॅकेट्सवर QR कोड लावले आहेत ज्यावर किचनचे नाव, पॅकेजिंगची तारीख, कालबाह्यता तारीख, वजन इत्यादी तपशील दिले आहेत.
- पॅन्ट्री कार आणि किचन युनिटमधील स्वच्छता आणि आरोग्यपूर्ण स्थिती तपासण्यासाठी तृतीय पक्ष लेखापरीक्षण केले जाते. ग्राहक समाधान सर्वेक्षणदेखील केले जाते.
- भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (एफएसएसएआय)च्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन होते आहे की नाही याची खातरजमा करण्यासाठी, प्रत्येक खानपान युनिटसाठी नियुक्त केलेल्या अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांकडून प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आले आहे.
- अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेच्या पद्धतींवर लक्ष ठेवण्यासाठी किचन युनिट्समध्ये अन्नसुरक्षा पर्यवेक्षक नियुक्त करण्यात आले आहेत.
- अन्नसुरक्षा अधिकार्यांसह रेल्वे/आयआरसीटीसी अधिकार्यांकडून नियमित आणि आकस्मिक तपासणी केली जाते.
अशी माहितीही रेल्वे मंत्र्यांनी दिली.

