आता पळून, पळवून वा संमतीने होणाऱ्या आंतरधर्मीय विवाहांवर राज्य सरकारची म्हणजेच शिंदे-फडणवीस सरकारची नजर असणार आहे. नोंदणीकृत अथवा अनोंदणीकृत विवाह, धार्मिक स्थळी करण्यात आलेले विवाह, पळून जाऊन केलेले विवाह अशाप्रकारे आंतरधर्मीय विवाह केलेल्या व्यक्तींची माहिती प्राप्त करणे. नवविवाहीत मुली अथवा महिला तसेच त्यांच्या कुटुंबियांशी संपर्क करुन सद्य:स्थितीत ते एकमेकांच्या संपर्कात आहेत किंवा कसे? याबाबत माहिती घेणे. स्वतःच्या कुटुंबियांच्या संपर्कात नसलेल्या मुली अथवा महिला यांची त्यांच्या आई-वडिलांच्या सहाय्याने माहिती घेणे. आई-वडिल इच्छुक नसल्यास तज्ज्ञ समुपदेशकाद्वारे त्यांचे समुपदेशन करणे तसेच त्यांच्यामधील वाद-विवादाचे निराकरण करणे, याकरीता व्यासपीठ उपलब्ध करुन याबाबतच्या कार्यवाहीचा आढावा घेण्याकरीता राज्याच्या महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय तसेच अशासकीय सदस्यांची “आंतरधर्मीय विवाह परिवार समन्वय समिती” गठीत केली आहे.
समितीमध्ये एकूण तेरा सदस्य
समितीचे अध्यक्ष मंत्री, महिला व बालविकास आहेत. प्रधान सचिव, महिला व बालविकास विभाग, मंत्रालय, मुंबई, आयुक्त, महिला व बालविकास, पुणे, सहसचिव, महिला व बालविकास विभाग, मंत्रालय, मुंबई, संभाजीनगरचे संजीव जैन, नाशिकच्या सुजाता संतोष जोशी, मुंबईचे ॲड. प्रकाश साळसिगिकर, नागपूरचे यदु गौडीया यांचा समितीत समावेश आहे. अकोलाच्या मीराताई कडबे, पुण्याच्या शुभदा कामत, मुंबईच्या योगिता साळवी, मुंबईचे इरफान अली पिरजादे हे सदस्य म्हणून काम पाहणार आहेत. महिला व बालविकास उपायुक्त सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत.

समिती घेणार विभागीय तसेच जिल्हा स्तरावरील आढावा
ही समिती खालील विषयाशी संबंधीत विभागीय तसेच जिल्हा स्तरावरील अधिकारी यांची आवश्यकतेनुसार बैठका घेऊन आढावा घेईल. नोंदणीकृत विवाह, अनोंदणीकृत आंतरधर्मीय विवाह, धार्मिक स्थळी करण्यात आलेले आंतरधर्मीय विवाह, पळून जाऊन केलेले आंतरधर्मीय विवाह, विवाह केलेल्या नवविवाहीत मुली अथवा महिला तसेच त्यांच्या कुटुंबियांशी संपर्क साधून सद्य:स्थितीत ते एकमेकांच्या संपर्कात आहेत किंवा कसे याबाबत माहिती संकलीत करणे, आंतरधर्मीय विवाह केलेल्या तथापि, कुटुंबियाच्या संपर्कात नसलेल्या महिलांकडून त्यांच्या आई-वडिलांचा पत्ता घेऊन त्यांना माहिती देणे. आई-वडिल इच्छुक नसल्यास तज्ज्ञ समुपदेशकाद्वारे त्यांचे समुपदेशन करणे हे या समितीचे मुख्य काम राहणार आहे.
समन्वय समिती करणार अभ्यास आणि शिफारसी
महिला व बालविकास विभागामार्फत समाजातील आंतरधर्मीय विवाहाबाबतचे प्रश्न, धोरण, कायदे, कल्याणकारी उपक्रमाबाबत केंद्र शासन व राज्य शासनाच्या योजनांचा अभ्यास करणे त्यामध्ये आवश्यक ते बदल सुचविणे तसेच या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत उपाययोजनांची शिफारस करणे, हे या समितीचे काम असेल. या समितीची बैठक आवश्यकतेनुसार करण्यात येईल. या समितीने राज्यातील आंतरधर्मीय विवाह, त्यामधील समस्या व त्यावरील उपाययोजना व इतर अनुषंगिक बाबींच्या अनुषंगाने सविस्तर शिफारशी करणे, समितीने केलेल्या शिफारशीनंतर शासनस्तरावरुन योग्य तो निर्णय घेण्यात येईल व त्यानंतर समितीचे कार्य संपुष्टात येईल.
महिलांना मदतीसाठी उपलब्ध होणार हेल्पलाइन क्रमांक
आंतरधर्मीय विवाह केलेल्या मुली अथवा महिलांना काही तक्रार उद्भवल्यास त्यांच्यासाठी हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करुन देण्यात येईल. सदर समिती हेल्पलाईन क्रमांकावर प्राप्त झालेल्या तक्रारींची तपासणी करुन त्यानुसार योग्य ती कार्यवाही करेल. याबाबत शासनाने नुकताच शासन निर्णय निर्गमित केला आहे.

