राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्वतंत्र आंदोलनात कुठे होता? संघाची टोपी काळी का? असा सवाल संघाला विचारता आणि पीएफआयवरील बंदीचे समर्थन करण्यास तयार नाही? संघाला विरोध आणि पीएफआयला इलूइलू? असा खडा सवाल मुंबई भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आमदार ॲड. आशिष शेलार यांनी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला केला.
जागर मुंबईचा अभियानांतर्गत २२वी जाहीर सभा अंधेरी पश्चिम विधानसभेत प्रगती मैदान येथे शनिवारी पार पडली. या सभेला मुंबई भाजपा प्रभारी आ. अतुल भातखळकर, आ. अमित साटम, संतोष मेढेकर, दीपक कोतेकर, सुधा सिंग, सुनिता मेहता, रेणू हंसराज, अनिश मकवाणी आदी पदाधिकारी उपस्थित होते.
सप्टेंबरमध्ये पीएफआयवर बंदी आणली. पीएफआय, ज्यांनी देशाच्या सार्वभौमत्वाला धोका दिला. सीरिया, अफगाणिस्तान, पाकिस्तानशी ज्यांचे लागेबांधे आहेत त्या पीएफआयवर अमित शाह नावाच्या धाडसी गृहमंत्र्यांनी छापे टाकले. १०६ लोक पहिल्या दिवशी आणि २२७ लोकांना दुसऱ्या दिवशी अटक करून त्यांच्यावर ५ वर्षांची बंदी घातली. पीएफआयवरच्या बंदीचेही स्वागत करायला उद्धव ठाकरे तयार नाहीत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची गोष्ट आली की, संघाची टोपी काळी का? संघाने स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला होता का? संघाने संयुक्त महाराष्ट्रमध्ये फूट का टाकली? संघ भारतमुक्त का होऊ नये, ही भाषणे उद्धव ठाकरे यांची आहेत. संघावर बंदी उपस्थित करता मग पीएफआय राष्ट्रभक्त आहे का? पीएफआयने देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला होता का? मग त्या पीएफआयच्या विरोधात तुम्ही का नाही बोललात? असा सवाल त्यांनी केला.
मतांसाठी मराठी – मुस्लिम तुष्टीकरण
असुरांचा नाश करण्यासाठी हा जागर आहे. हा जागर सत्तेसाठी नाही. समाजात तेढ निर्माण होणार असेल तर आम्ही गप्प बसणार नाही. आम्ही एक भारत, श्रेष्ठ भारत… मानणारे आहोत. आम्ही कुठल्याही धर्माच्या, जातीच्या विरोधात नाही. आम्ही ‘सबका साथ सबका विकास’ आहोत. तुष्टीकरणाच्या आणि लांगुलचालनाच्या विरोधात आम्ही आहोत. मुस्लिम, मराठी अशी मांडणी केली जात आहे. मराठी गुजरातीला विरोध का? मराठी जैनच्या विरोधात उभे का राहता? मराठी उत्तर भारतीय तुम्हाला का चालत नाहीत? मराठी हिंदू या शब्दांशी तुमचे वैर का आहे? असा सवाल ॲड. आशिष शेलार यांनी केला.
उद्धव ठाकरे यांनी प्रत्येक टेंडरमध्ये पैसे खाण्याचे काम केले. प्रत्येक वार्डात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून मराठी आणि मुस्लिम मतांचं गणित जुळवलं जात आहे. सलग २५ वर्षं राज्य करून तुमच्यावर जाती-धर्माच्या आधारावर मतं मागण्याची वेळ का आली? केलेल्या कामाच्या आधारावर मतं मागा? सांगा तुम्ही किती प्रकल्प केले, रस्ते बांधले, किती शाळा बांधल्या? यातील काहीही त्यांना सांगता येत नाही. मुंबई महापालिकेची सत्ता हातातून जात असल्याने शेवटचा डाव, हा रडीचा म्हणजेच कलीचा डाव खेळला जात आहे, असा आरोपही त्यांनी केला.
जाती आणि धर्माच्या आधारावर मतं मागण्याचा हा अजेंडा उद्धव यांच्या शिवसेनेचा आहे. मराठी आणि मुस्लिमांना फसवण्याचे काम सुरू आहे. आम्ही तुष्टीकरण्याच्या आणि लांगुलचालनाच्या विरोधात आहोत. हिंदुत फूट पाडण्याचे काम सुरू आहे. आम्ही ते कधीही यशस्वी होऊ देणार नाही असेही शेलार म्हणाले.
२ लाख करोड रुपयांचा घोटाळा
पैसा खाण्याची स्पर्धा ठेवली तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला पहिला नंबर मिळेल. मुंबई महापालिकेत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने कचऱ्यात खाल्ले, नाल्यात खाल्ले. पालिकेत उंदीर मारण्यात घोटाळा झाला. पाच वॉर्डात उंदीर मारले खर्च झाला एक कोटी. किती मारले? कुठे पुरले? नोंद कुठे केली? फाईल दाखवा तर म्हणतात पुरात वाहून गेली? वाघ म्हणता उंदरात पण खाता? यांनी २५ वर्षांत २ लाख करोड रुपयांचा घोटाळा केला, अशी टीका त्यांनी केली.
ज्यांनी २५ वर्षे सत्तेत राहून मुंबईकरांना लुटण्याचे काम केले, त्यांच्या पैश्यांचे बंगले पडायला आले आहेत. म्हणून त्यांनी मुंबईच्या जनतेच्या मनात फूट पाडण्याचे काम केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा वापर करून शिवसेना राजकारण करत आहे. ज्या काँग्रेसने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला त्यांच्या मांडीला मांडी लावून उद्धव ठाकरे बसतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांकडे संजय राऊत यांनी पुरावे मागितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मार्गावर चालण्याचे काम केले आहे. येणाऱ्या काळात महाविकास आघाडीचे खरे रूप उघडे पाडू, असे आमदार अतुल भातखळकर म्हणाले.

