महाराष्ट्रात, आम्ही दोन व्यक्तींना आमच्या पितृस्थानी मानतो. एक बाळासाहेब ठाकरे आणि दुसरे आनंद दिघे. दिवंगत आनंद दिघे यांच्या आयुष्यावर चित्रपट काढण्याची आपली 2013पासूनच इच्छा होती. आपले हे स्वप्न 2022 साली पूर्ण झाले. निर्माता म्हणून हा माझा पहिलाच चित्रपट आहे. ज्या व्यक्तीला अनेक लोक आपले दैवत मानतात, अशा व्यक्तीवर चित्रपट काढणे, हे एक मोठे आव्हान आणि जबाबदारी होती. या चित्रपटाला बॉक्सऑफीसवर मिळालेल्या प्रचंड यश मिळाले. जी व्यक्ती खूप लोकांना जोडून ठेवू शकते, त्यांना आपल्यासोबत घेऊन पुढे जाते, अशा व्यक्तीची व्यक्तिरेखा प्रेक्षकांना खूप आवडते. हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित करावा, असे आपल्याला अनेक जण सांगत असतात. त्यामुळे या चित्रपटाचा सिक्वेल म्हणजे पुढच्या भागाची लवकरच घोषणा केली जाईल, असं ‘धर्मवीर- मुक्काम पोस्ट ठाणे’ चित्रपटाचे निर्माते, मंगेश देसाई यांनी आज जाहीर केलं.
गोव्यात सुरू असलेल्या 53व्या इफ्फी महोत्सवामध्ये आयोजित ‘टेबल टॉक्स’ या संवादात्मक सत्रात ते बोलत होते. चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्या कामाचेही त्यांनी खूप कौतूक केले. प्रवीण तरडे झपाटून काम करतात, असं त्यांनी सांगितलं. चित्रपटात आनंद दिघे यांची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या प्रसाद ओक यांच्या अभिनयाचेही त्यांनी कौतूक केले. प्रसाद नसता तर आम्हाला जे आनंद दिघे साकारायचे होते, ते साकारता आले नसते, असं ते म्हणाले.
हा चरित्रपट ज्यांच्या आयुष्यावर आधारलेला आहे, त्या आनंद दिघे यांचे फोटो, मी लोकांच्या घरोघरी बघितले आहेत, असे या चित्रपटात प्रमुख व्यक्तिरेखा साकारणारे अभिनेता प्रसाद ओक यांनी सांगितलं. अशी व्यक्तिरेखा साकारणे हे कोणत्याही अभिनेत्यासाठी आव्हानात्मक असते. या व्यक्तिरेखेचे अंतरंग कसे गवसत गेले याची माहिती प्रसाद ओक यांनी दिली. आम्ही त्यांचे फोटो पहिले, त्यांचे व्हिडिओ पहिले आणि आनंद दिघे यांना भेटणाऱ्या, बघितलेल्या सुमारे 100 लोकांशी आम्ही त्यांच्याविषयी बोललो. तसेच, या व्यक्तिरेखेसाठी आपल्याला तयार करण्यासाठी अनेकवेळा तालमी करण्यात आल्या, अशी माहितीही त्यांनी दिली.
तब्बल 94 चित्रपट केल्यानंतर, मला पहिल्यांदा प्रमुख व्यक्तिरेखा, तीही धर्मवीर आनंद दिघे यांची व्यक्तिरेखा साकारायला मिळाली आणि पुढे जे काही झाले, तो इतिहास आहे, अशा शब्दांत प्रसाद ओक यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
अनेकदा आपल्या कुटुंबात, आई-मुलांचे नाते ठळकपणे दिसते. त्यावर खूप बोलले जाते. मात्र, मुलांचे वडिलांशी असलेले नाते खूपदा दुर्लक्षितच राहते. खरं तर, वडीलही आपल्या कुटुंबासाठी, मुलांसाठी अपार कष्ट करत असतात. पण केवळ ते आपल्या घराला वेळ देत नाहीत, अशीच तक्रार केली जाते, असं देसाई म्हणाले.
हा चित्रपट आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या महोत्सवात दाखवण्याची संधी 53व्या इफ्फीने दिल्याबद्दल, मंगेश देसाई आणि प्रसाद ओक यांनी आयोजकांचे आभार मानले.

