Homeकल्चर +‘काश्मीर फाइल्स’मधले माझे...

‘काश्मीर फाइल्स’मधले माझे अश्रू आणि वेदना खऱ्या!

द काश्मीर फाईल्स, हा त्यांच्यासाठी केवळ एक चित्रपट नाही, तर त्यांनी पडद्यावर चित्रित केलेली एक भावना आहे. ज्या लोकांना त्यांच्या घरातून हाकलून देण्यात आले, त्यांचे मी प्रतिनिधीत्व करत असल्याने, ते शक्य तितक्या चांगल्या पद्धतीने व्यक्त करणे ही माझी मोठी जबाबदारी होती. माझे अश्रू, माझ्या वेदना ज्या तुम्ही या चित्रपटात पाहत आहात ते सगळे खरे आहे, असे चित्रपटातील प्रमुख अभिनेते अनुपम खेर म्हणाले.

गोव्यातील पणजी येथे 53व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवानिमित्त आयोजित इफ्फी टेबल टॉक्समध्ये ते सहभागी झाले होते.

कृष्णा पंडित हा एक तरुण काश्मिरी पंडित निर्वासित असून तो त्याच्या आजोबांसोबत राहतो, ज्यांनी 1990मध्ये काश्मिरी पंडितांचा नरसंहार पाहिला होता आणि त्यांना काश्मीरमधून पळून जावे लागले होते. पुष्करनाथ पंडित यांनी कलम 370 रद्द व्हावे यासाठी आयुष्यभर लढा दिला होता. कृष्णाला वाटत असते की, त्याच्या आई-वडिलांचा काश्मीरमध्ये अपघातात मृत्यू झाला. कृष्णा पंडित हा जेएनयूचा विद्यार्थी असून त्याच्यावर मार्गदर्शक प्राध्यापिका राधिका मेननचा प्रभाव असतो आणि त्यामुळे तो त्या नरसंहाराचे खंडन करतो आणि स्वतंत्र काश्मीरसाठी लढतो. मात्र आजोबांच्या मृत्यूनंतरच त्याला सत्य काय आहे ते कळते. ही या चित्रपटाची रूपरेषा आहे.

‘काश्मीर फाईल्स’मुळे जगभरातील लोकांना 1990च्या दशकात काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचारांची जाणीव होण्यास मदत झाली. हा सत्य घटनांवर आधारित चित्रपट आहे. चित्रपट दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी या चित्रपटासाठी जगभरातल्या सुमारे 500 लोकांच्या मुलाखती घेतल्या. 19 जानेवारी 1990च्या रात्री वाढत्या हिंसाचारामुळे काश्मीर खोऱ्यातील 5 लाख काश्मिरी पंडितांना त्यांची घरे आणि तिथल्या आठवणी मागे सोडून जावे लागले. एक काश्मिरी हिंदू म्हणून मी या दुःखद घटनांसोबत जगलो. मात्र असे काही घडले हे कुणीच मान्य करत नव्हते. जग ही शोकांतिका लपवण्याचा प्रयत्न करत होतं. या चित्रपटाने पडद्यावर ही शोकांतिका दाखवून त्यांच्या वेदनांचे घाव भरण्याची प्रक्रिया सुरू केली, असे ते म्हणाले.

या चित्रपटात आपल्या कलेचा अभिनेता म्हणून वापर करण्याऐवजी, वास्तविक जीवनातील घटनांमागील सत्याला अभिव्यक्ती देण्यासाठी त्यांनी आपल्या आत्म्याचा वापर केला. कधीही हार मानू नका ही या चित्रपटामागील मुख्य संकल्पना असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

कोविड महामारी आणि त्यानंतरच्या लॉकडाऊनचा चित्रपट पाहण्याच्या लोकांच्या पद्धतीवर परिणाम झाला आहे. ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे प्रेक्षकांना जागतिक चित्रपट आणि बहुभाषिक चित्रपट पाहण्याची सवय लागली आहे. प्रेक्षकांना वास्तववादी चित्रपट आवडू लागले. ज्या चित्रपटांमध्ये वास्तवाचा घटक आहे ते नक्कीच प्रेक्षकांच्या मनाला भिडतील. काश्मीर फाईल्ससारख्या चित्रपटांचे यश हे त्याचेच द्योतक आहे. कुठलीही गाणी, विनोद नसलेला हा चित्रपट अजूनही सरस ठरत आहे. हाच खरे तर सिनेमाचा विजय आहे, असे त्यांनी सांगितले.

उदयोन्मुख चित्रपट निर्मात्यांना सल्ला देताना ते म्हणाले की, आपण एका विशिष्ट भाषिक चित्रपट उद्योगातले आहोत, हा समज आपल्या मनातून काढून टाकायला पाहिजे. त्याऐवजी, चित्रपट निर्मात्यांनी स्वतःला भारतीय चित्रपट उद्योगातले चित्रपट निर्माते म्हणून ओळखले पाहिजे. हा एक लार्जर दॅन लाइफ चित्रपट उद्योग आहे.

इफ्फीसोबतच्या प्रवासाची आठवण सांगताना अनुपम खेर म्हणाले की, 1985मध्ये 28 वर्षांचा असताना ‘सारांश’ या चित्रपटासाठी ते पहिल्यांदा इफ्फीमध्ये सहभागी झाले होते. त्या चित्रपटात मी 65 वर्षांची व्यक्तिरेखा साकारली होती. त्यामुळे तेव्हा मला इफ्फीमध्ये कोणीही ओळखले नाही. त्यानंतर  37 वर्षांत 532हून अधिक चित्रपट केल्यानंतर इफ्फीसाठी पुन्हा गोव्यात येणं हा माझ्यासाठी खूप आनंदाचा क्षण आहे. हा महोत्सव एक प्रतिष्ठित महोत्सव आणि जगातील सर्वोत्कृष्ट चित्रपट महोत्सवांपैकी एक बनला आहे.

या संवादादरम्यान अनुपम खेर यांनी जाहीर केले की ते प्रतिक्षा, या उरिया चित्रपटाची निर्मिती करतील. यात बेरोजगारी एक प्रमुख विषय असून वडील आणि मुलाची कथा आहे. हिंदीमध्ये, त्यांनी एक प्रमुख भूमिका केली आहे. ‘प्रतीक्षा’चे दिग्दर्शक अनुपम पटनायक हेदेखील महोत्सवाच्या ठिकाणी संवादात सहभागी झाले होते. काश्मीर फाईल्सचे निर्माते अभिषेक अग्रवाल हेदेखील या संवादात सहभागी झाले होते.

Continue reading

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे तबला वादन स्पर्धा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे रविवार, ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता केंद्राच्या सभागृहात तबला वादन स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा दोन वयोगटात घेतली जाईल. (छोटा वयोगट १० ते १५ वर्षे आणि मोठा वयोगट १६ ते २५...

दिनकर पाटील, शकुंतला खटावकर यांना ‘जीवन गौरव’ तर, मंगेश वरवडेकर यांना ज्येष्ठ क्रीडा पत्रकार पुरस्कार

कबड्डीच्या मैदानावर आपल्या कार्यकर्तृत्त्वाने खेळाला समृद्ध करणाऱ्या दिनकर पाटील (सांगली) आणि शकुंतला खटावकर (पुणे) यांना महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचा प्रतिष्ठेचा ‘कबड्डी महर्षी शंकरराव (बुवा) साळवी कबड्डी जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्याचबरोबर मैदानावरील घडामोडींचे निर्भीड वृत्तांकन करताना खेळाडूंच्या न्यायासाठी...

आता कुर्ला-साकी नाका भागात रस्त्यावर दिसणार ‘मॅनहोल रेलगार्ड’!

मुंबईत मॅनहोल्सवर काम करताना सार्वजनिक सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी तसेच देखभाल-दुरुस्तीची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी 'मॅनहोल रेलगार्ड' ही चौकोनी आकारातील प्रतिकृती एका संस्थेकडून विकसित करण्यात आली आहे. या प्रतिकृतीची प्रत्यक्ष पाहणी आज मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि अतिरिक्त महापालिका...
Skip to content