राज्यात काँग्रेसकडे असलेले विधानसभा अध्यक्षपद रिक्त होताच आता त्या पदावर दावा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या हालचाली सुरू झाल्या असून यामुळे सत्ताधारी महाविकास आघाडीत नव्याने धुसफूस सुरू झाली आहे.
काँग्रेसचे सध्याचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात राज्य मंत्रिमंडळातही आहेत. त्याशिवाय ते काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाचे नेतेही आहेत. तीन-तीन पदांची जबाबदारी सांभाळत असल्यामुळे थोरात काँग्रेसच्या पक्षवाढीला फारसे उपयुक्त ठरणार नाहीत हे लक्षात आल्यानंतर काँग्रेसच्या श्रेष्ठींनी नव्या प्रदेशाध्यक्षपदाचा शोध चालू केला. यासाठी विदर्भातले आक्रमक व बहुजन समाजाचे नेते नाना पटोले यांचे नाव श्रेष्ठींनी निश्चित केल्याचे कळते. त्यानंतर त्यांनी आज विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याकडे सुपूर्द केला. मात्र, यानंतर संसदेच्या अधिवेशनाच्या निमित्ताने राजधानी दिल्लीतल असलेले राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी या पदावर अप्रत्यक्ष दावा केल्यामुळे महाविकास आघाडीत नव्याने धुसफूस निर्माण झाली आहे. विधानसभा अध्यक्षपद तिन्ही पक्षांचे होते. आता ते खुले झाले आहे. आता विधानसभा अध्यक्षपदावर पुन्हा चर्चा होणार आहे, असे शरद पवार म्हणाल्याचे कळते.

काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी आज संध्याकाळी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी त्यांचे नाव चर्चेत असल्यामुळे ते राजीनामा देतील, अशी चर्चा होतीच. त्यानंतर पटोले यांनी माध्यमांशी संवाद साधला. पक्षाने मला आदेश दिला. त्याचे मी पालन केले. पक्षाने सांगितल्याप्रमाणे मी राजीनामा दिला. मी मंत्रीपद किंवा कुठलीही अपेक्षा ठेवलेली नाही. पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाबाबत अजून आपल्याला पक्षाकडून काहीही सांगितलेले नाही. पक्ष आदेश देईल, त्याचे मी पालन करेन, असे ते म्हणाले.
विधानसभा अध्यक्ष म्हणून काम करताना मी त्या खुर्चीला जनतेची खुर्ची बनवली याचा मला अभिमान आहे. तुम्ही राजीनामा दिल्यामुळे विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडेच राहणार का, असे विचारले असता ते म्हणाले की, हा निर्णय तीन पक्षाचे नेते घेतील. तीन पक्षांचे प्रमुख या संदर्भात बैठक करुन निर्णय घेतील. विधानसभा अध्यक्ष निवडण्याची निवडणूकप्रक्रिया अधिवेशनाच्या काळातच होते.
नाना पटोले यांनी काँग्रेसपासून राजकारणाची सुरुवात केली. पण २०१४ मध्ये त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. २०१४ साली भंडारा-गोंदिया मतदारसंघातून त्यांनी भाजपाच्या तिकीटावर लोकसभेची निवडणूक जिंकली. पुन्हा भाजपा नेत्यांवर दुगाण्या झाडत ते काँग्रेसमध्ये परतले. २०१९ साली ते काँग्रेसच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून आले आणि पुढे ते विधानसभेचे अध्यक्षही झाले होते.

