महाराष्ट्रातल्या दुकानांच्या पाट्या मराठीतच ठेवण्याच्या आदेशाचे श्रेय फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचेच आहे. इतर कुणी त्याचे श्रेय लाटण्याचा आचरटपणा करू नये, अशा शब्दांत आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारला खडसावले.
कालच राज्य सरकारने सर्व दुकानांच्या पाट्या मराठीतही तितक्याच ठळकपणे ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यावर एका पत्राद्वारे राज ठाकरे यांनी हे स्पष्ट केले.
आपल्या पत्रात ठाकरे म्हणतात की, या महाराष्ट्रात दुकानांवर मराठीतच पाट्या असाव्यात यासाठी खरेतर आंदोलन करावे लागूच नये. परंतु, २००८, २००९ साली पाट्या मराठीतच असाव्यात म्हणून मनसेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र जागवला. आंदोलने केली. शेकडोंनी केसेस अंगावर घेतल्या आणि शिक्षा भोगल्या. काल राज्य मंत्रिमंडळाने दुकानांवरील नामफलक मराठीतच असावेत असा निर्णय घेतला तेव्हा त्याचे श्रेय फक्त आणि फक्त माझ्या महाराष्ट्र सैनिकांचे आहे. बाकी कुणी हे श्रेय लाटण्याचा आचरटपणा करू नये. त्यावर अधिकार आहे फक्त महाराष्ट्र सैनिकांचाच. सरकारने आता कच खाऊ नये आणि याची नीट अंमलबजावणी करावी.
यात आणखी एक भानगड सरकारने करून ठेवली आहे. मराठी भाषेशिवाय इतर भाषा नामफलकांवर चालतील म्हणून. याची काय गरज आहे? महाराष्ट्राची भाषा देवनागरीतली मराठी आहे. देवनागरी लिपी सर्वांना समजते. इथे फक्त मराठीच चालणार आणि याची आठवण पुन्हा पुन्हा आम्हाला करायला लावू नका, असेही राज ठाकरे यांनी या पत्राद्वारे बजावले आहे.

