मुंबईच्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात केंद्रीय माहिती आयुक्त उदय माहुरकर आणि चिरायू पंडित यांनी लिहिलेल्या VEER SAVARKAR THE MAN WHO COULD HAVE PREVENTED PARTITION, या पुस्तकाचे काल झाले.
भारताने जेव्हा जेव्हा बोटचेपी भूमिका ठेवली तेव्हा तेव्हा आपला आत्मविश्वास गमावला आणि भूभागही गमावला. स्वातंत्र्याच्यावेळी पाकिस्तानला भूभाग दिला आणि नंतर चीनलाही भूभाग दिला. मात्र, पहिल्यांदा भारताने डोकलाममध्ये आपले धोरण बदलले. प्रथमच भारताने आपले परराष्ट्र धोरण सावरकरांना अभिप्रेत असणारे धोरण अवलंबिले. ती कृती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून तेथे पाहता आली, असे प्रतिपादन महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले.
सावरकर स्मारकाच्या वास्तुत हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले. त्यावेळी स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर, ज्येष्ठ पत्रकार डॉ. उदय निरगुडकर, भाजपा नेते आणि माजी मंत्री आशिष शेलार, अतुल भातखळकर, उपस्थित होते.
भारताने चीनला रोखण्याचे काम केले त्याचा परिणाम म्हणजे ज्या चीनला आपण घाबरत होतो, त्याठिकाणी आता चीनला घाबरावे लागले. तेथून चीनला परत जावे लागले. हिंदी-चिनी भाई भाई, हीच नीती ठेवली असती किंवा आम्हाला काय करायचे असे म्हटले असते तर त्याठिकाणी धोरणात्मक रस्ता चीनने कायम केला असता आणि त्यानंतर चीनला कधी थांबवू शकलो नसतो, असे फडणवीस म्हणाले.
काँग्रेसच्या बोटचेप्या धोरणामुळे, लांगुलचालनामुळे आणि कधीही प्रश्नाला थेट सामोरे न जाण्याच्या वृत्तीमुळे त्यांचा द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत प्रथम सांगण्यात आला. मग तो रुजविण्यात आला आणि मग १९४७ला तो प्रत्यक्ष अंमलात आणण्यात आला. सावरकर हे सर्व लोकांपुढे मांडत होते आणि ते सत्य लोकांपुढे जाऊ नये म्हणून सतत विविध आरोपाने सावरकरांना आरोपित ठेवायचे असे धोरण पहिल्या दिवसापासून काँग्रेसने ठेवले ते आजपर्यंत.. त्याच धोरणावर काँग्रेस चालत आहे. पण सावरकरांचे विचार इतके तेज:पुंज आहेत, की ते झाकता येण्यासारखे नाहीत. त्यामुळे सातत्याने कोणी ना कोणी विचाराने प्रेरित होऊन समाजापुढे ते आणत राहील. ते काम या पुस्तकाच्या माध्यमातून झाले आहे. हे पुस्तक कल्पित नाही तर त्या-त्या काळातील विचार, माहिती, घटना यांच्या उदाहरणातून ते दाखवण्याचा प्रयत्न यात केला गेला आहे, असेही त्यांनी सांगितले.

त्यापूर्वी पुस्तकाचे लेखक आणि केंद्रीय माहिती आयुक्त उदय माहुरकर पुस्तक लेखनामधील विविध ऐतिहासिक बाजू, घटना यांची माहिती दिली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे योगदान नेमके काय आहे, हे सांगताना त्यांनी राष्ट्रीय सुरक्षेसंबंधातील त्यांचे दृष्टिकोन अधिक महत्त्वाचे असल्यावर अधिक भर दिला. ते राष्ट्रीय सुरक्षेचे पितामह आहेत, हा महत्त्वाचा भाग या पुस्तकातून मांडला आहे. त्याचप्रमाणे भारताची फाळणी रोखण्याचे प्रयत्न सावरकरांनी सर्वतोपरी केले, ते कोणाला माहिती नसल्याचे त्यांनी या पुस्तकात स्पष्ट केले.
पुन्हा फाळणी टाळायची असेल तर या पुस्तकात दिसलेले सावरकर लोकांपुढे समोर आणावे लागतील. या अर्थाने ते खरे राष्ट्रनायक आहे. आजपर्यंत राष्ट्रपिता आपण पाहिला. यानंतरचे दिवस हे राष्ट्रनायकाचे असतील, हे सांगणारा आजचा क्षण आहे, असे उद्गार डॉ. उदय निरगुडकर यांनी प्रास्ताविकात काढले.
चिरायू पंडित म्हणाले की, स्वातंत्र्याचा आणि विभाजनाचीही ७५ वर्षे होत आहेत. स्वा. सावरकर यांनी स्वातंत्र्यानंतर दंग्यांच्यावेळी सांगितले होते की, ही लढाई हिंदू-मुसलमानांमध्ये नाही, ही लढाई हिंदुस्थान आणि पाकिस्तानमधीलही नाही तर ही लढाई अखंड हिंदुस्थान आणि अखंड पाकिस्तामधील आहे. याच संदर्भामध्ये आज पूर्ण विचार करावा लागेल. नवीन पिढीपुढे असणारे धोके लक्षात घेऊन हे पुस्तक आम्ही म्हणूनच तयार केले आहे.
स्वा. सावरकर स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी सांगितले की, या पुस्तकाचे नाव वीर सावरकर द मॅन हू कुड हॅव प्रीव्हेंन्टेड पार्टिशन, असे आहे. जी फाळणी मागे झाली ती सावरकर टाळू शकले नाहीत. ती पुन्हा होऊ नये. तशी स्थिती येऊ नये यासाठी हे पुस्तक वाचून इतिहास अभ्यासण्याची गरज आहे. याचे कारण तुमचे तारणहार तुम्हीच असाल, हे हिंदू समाज लक्षात घेईल, तो दिवश भाग्याचा असेल.
प्रकाशन समारंभाच्या सुरवातीला पुस्तकाबद्दलची माहिती देणारी ध्वनिचित्रफित प्रदर्शित करण्यात आली. मुग्धा वैशंपायन यांनी ‘ने मजसी ने परत मातृभूमीला’ हे स्वा. सावरकरांचे गीत सादर केले. कार्यक्रमाच्या अखेरीस श्रोत्यांच्या प्रश्नांना चिरायू पंडित यांनी उत्तरे दिली.

