Details
हेमंत जोशी..
hemant.offtherecord@gmail.com
जसे दिवाळीत फटाके वाजतील तसे यावर्षी दिवाळीआधीदेखील फटाके वाजतील. युतीच्या घरी दिवाळीआधीच दिवाळी साजरी केली जाईल. कारण उघड आहे. युती सत्तेत येणार आहे ही काळ्या दगडावरची रेघ आहे आणि देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होणार आहेत हेदेखील नक्की घडणार आहे. त्यासाठी एखाद्या भविष्य वर्तविणाऱ्याकडे जाण्याची गरज आहे, असे अजिबात वाटत नाही. असे म्हणतात, असे मानतात की जे उभ्या आयुष्यात कायम सकारात्मक दृष्टिकोन ठेवून वागतात, त्यांची स्वप्ने नेहमी पूर्ण होतात, खरी ठरतात. सांगायची आवश्यकता आहे असे येथे मला वाटत नाही. पण सांगायचे म्हणून सांगतो, फडणवीस कायम सकारात्मक नजरेने प्रत्येकाकडे बघतात. म्हणजे अमुक एखादा विरोधक त्यांना त्रास देत असेल तरीही ते त्याच्याविषयी मनात अजिबात आकस न ठेवता तो समोर आला की त्याच्याशी अत्यंत हसतखेळात बोलून मोकळे होतात. ते असे पॉझेटिव्ह विचारांचे असल्याने त्यांचे विधानसभा निवडणुकीतले यश ही आता फक्त एक औपचारिकता उरलेली आहे. फक्त एक अत्यंत महत्त्वाची जबाबदारी आता तुम्हा मतदारांची की थोड्याशा फरकाने युतीचे उमेदवार निवडून आले आणि फडणवीस मंत्रीमंडळ शपथ घेते झाले असे घडता कामा नये. फडणवीस आणि युतीचे सारे उमेदवार भरघोस मतांनी निवडून आणणे ही सूज्ञ मतदारांची जबाबदारी आहे जी त्यांनी मनापासून निभवावी अशी त्यांना हात जोडून विनंती आहे.
शिवसेना, भाजपा आणि मित्रपक्षांच्या युतीचे उमेदवार हे आपले कुटूंब सदस्य आहेत असेच ध्यानात ठेवावे आणि घरातल्या युतीच्या उमेदवारांना मान खाली घालावी लागणार नाही त्यासाठी तुम्हाला काहीही कारण पुढे न करता मतदान करून मोकळे व्हायचे आहे. मतदानाच्या दिवशी अमुक एखाद्या नवपरिणीत जोडप्याचा जरी हनिमून डे असला तरी त्यांनी एक दिवस कळ सोसावी आणि मतदान करून दुसऱ्या दिवशी मधुचंद्र धुमधडाक्यात साजरा करण्यासाठी रवाना व्हावे. या महिन्यातल्या २१ तारखेच्या विधानसभा निवडणुकीत भरघोस मतदान जर झाले नाही तर युतीच्या निकालावर मोठा वाईट परिणाम होऊ शकतो. म्हणून तुम्हाला पुन्हा एकवार विनंती करतो की मतदानाच्या दिवशी आधी मतदान करून मोकळे व्हा.
मला हे शंभर टक्के माहित आहे कि माझे जे वीस लाख वाचक आहेत त्यांच्यापैकी काही बोटावर मोजण्याएवढ्या मतदारांना युती सरकारविषयी व तेथे जे आजतागायत मंत्री होते त्यांच्याविषयी काही प्रमाणात नाराजी आहे. काहींच्या मनात राग आहे. काहींना शंका आहेत. पण ही ती वेळ नाही राग व्यक्त करण्याची किंवा मन कलुषित करून मतदान टाळण्याची. आपण नक्की असे करूया, एकदा का हे मतदान आटोपले आणि फडणवीस सरकार एकदा सत्तेत आले की तुमच्या मनातले गैरसमज, शंका लेखी स्वरूपात मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवूया. मला नक्की खात्री आहे, फडणवीस तुमच्या असल्याच काही तक्रारी तर त्या प्राप्त झाल्यानंतर आधी सावकाश वाचतील. गरज, आवश्यकता असेल तर ते तुम्हाला प्रत्यक्ष भेटतील. तुमची नाराजी गंभीर स्वरूपाची असेल तर ते त्याची दखल घेतील आणि प्रसंगी स्वतःचादेखील मुलाहिजा न ठेवता ते सुधारणा घडवून आणतील. पुन्हा एकदा हात जोडून विनंती. आपले काम एवढेच. मतदानाला नक्की जायचे आहे. योग्य उमेदवाराला निवडून आणायचे आहे.

