Homeमुंबई स्पेशलकागदपत्रे, पुरावे देऊनही...

कागदपत्रे, पुरावे देऊनही १४२ झोपडीधारक अपात्र!

मुंबईतल्या कांदिवली पूर्व श्री समर्थनगर गृहनिर्माण संस्थेच्या एसआरए प्रकल्पातील झोपडीधारकांना विकासक व प्रशासनाने गेल्या पंधरा वर्षांपासून बेघर करून अपात्र केल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. झोपडीधारकांनी सर्व कागदपत्रांची पूर्तता करूनही ५९८ घरापैकी १४२ घरे अजूनही अपात्र आहेत. याविरोधात संस्थेचे  शिष्टमंडळ म्हाडाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांना नुकतेच भेटले. त्यांनी  अधिकाऱ्यांना पंधरा दिवसाच्या आत पुरावे पाहून सर्व झोपडीधारकांना पात्र करण्याचे निर्देश  दिले. त्यामुळे अपात्र झोपडीधारकांना दिलासा मिळाला आहे.

विकासक दिनेश बन्सल यांच्या हुकूमशाही वृत्तीमुळे झोपडीधारकांना घरापासून वंचित ठेवण्यात आले असल्याचा आरोप रहिवाशांचा आहे. संस्थेने या झोपडीधारकांना न्याय देण्यासाठी अनेक वेळा निवेदने देऊन पाठपुरावा केला. पुरावे सादर केले. परंतु त्यांना अद्याप न्याय मिळालेला नाही. ते घरापासून वंचित तर आहेतच, परंतु त्यांना एसआरए योजनेअंतर्गत विकासकाकडून भाडेसुद्धा मिळालेले नाही. यामधील काही लोक श्रमजीवी आहेत तर काही महिला धुणीभांडी करून उपजीविका करणाऱ्या आहेत. त्या सर्व सभासदांना त्रास होत आहे. त्यामुळे ते  हतबल झालेले आहेत.

या संदर्भात त्यांनी संस्थेशी आणि लोकप्रतिनिधींशी संपर्क करून न्यायाची मागणी केलेली आहे. त्यामुळे संस्थेने म्हाडा कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. मात्र तत्पूर्वीच मनसेचे बाळकृष्ण पालकर, आरपीआयचे हरीश मुत्तराज , राष्ट्रवादीचे विष्णू पवार, दिव्या विचारे, प्रकाश चव्हाण, व्यापारी असो.चे अध्यक्ष ओमप्रकाश जोशी, प्यारेलाल यादव, उमेश सिंग ठाकूर, मनोज आवटे, विजया रेड्डी नाथन, पुष्पा रेड्डी, अर्चना पोसवाल, सावित्री दुबे, या शिष्टमंडळाने मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.

बोरीकर यांनी तातडीने म्हाडा अधिकाऱ्यांना पाचारण करून अपात्र झोपडीधारकांचे कागदपत्रे तपासून योग्य असल्यास पंधरा दिवसाच्या आत पात्र करा असे निर्देश दिले. यामध्ये कुठल्याही प्रकारची हयगय मी खपवून घेणार नाही आणि माझ्याकडे पुन्हा अशा तक्रारी नकोत असे म्हणून त्यांनी अधिकाऱ्यांची कानउघडणी केली. झोपडीधारकांनी आपले पुरावे सादर करताना फोटो काढून ते आपल्याकडे ठेवावेत. जर त्यावर कार्यवाही झाली नाही तर पुन्हा आपण माझ्याकडे या असे सांगून त्यांनी शिष्टमंडळाचे समाधान केले. आता अधिकारी कशाप्रकारे कार्यवाही करतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Continue reading

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे तबला वादन स्पर्धा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे रविवार, ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता केंद्राच्या सभागृहात तबला वादन स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा दोन वयोगटात घेतली जाईल. (छोटा वयोगट १० ते १५ वर्षे आणि मोठा वयोगट १६ ते २५...

दिनकर पाटील, शकुंतला खटावकर यांना ‘जीवन गौरव’ तर, मंगेश वरवडेकर यांना ज्येष्ठ क्रीडा पत्रकार पुरस्कार

कबड्डीच्या मैदानावर आपल्या कार्यकर्तृत्त्वाने खेळाला समृद्ध करणाऱ्या दिनकर पाटील (सांगली) आणि शकुंतला खटावकर (पुणे) यांना महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचा प्रतिष्ठेचा ‘कबड्डी महर्षी शंकरराव (बुवा) साळवी कबड्डी जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्याचबरोबर मैदानावरील घडामोडींचे निर्भीड वृत्तांकन करताना खेळाडूंच्या न्यायासाठी...

आता कुर्ला-साकी नाका भागात रस्त्यावर दिसणार ‘मॅनहोल रेलगार्ड’!

मुंबईत मॅनहोल्सवर काम करताना सार्वजनिक सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी तसेच देखभाल-दुरुस्तीची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी 'मॅनहोल रेलगार्ड' ही चौकोनी आकारातील प्रतिकृती एका संस्थेकडून विकसित करण्यात आली आहे. या प्रतिकृतीची प्रत्यक्ष पाहणी आज मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि अतिरिक्त महापालिका...
Skip to content