संत्रानगरीत तुमचे स्वागत आहे, हा बॅनर पुन्हा नागपूरमध्ये लावू नका, अशी मागणी आमदार देवेन्द्र भुयार यांनी केली. संत्र्यांच्या ज्यूसशिवाय त्यांचा काही उपयोग नाही आणि खाऊन खाऊन खाणार किती? कारण बांग्ला देशने आपली संत्री घेतलेली नाहीत. त्यामुळे, या संत्र्यांचं करायचं काय, हा प्रश्न संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना पडला आहे, असे भुयार यांनी विचारले.
आमदार अनिल देशमुख यांनी संत्र्याच्या सीझन संपल्यावर सरकारने निर्णय घेतल्याचा आरोप करतानाच इतके दिवस सरकार झोपले होते का, असा प्रश्न विचारला. त्यावर मंत्री सत्तार यांनी सांगितले की, मी स्वतः मतदारसंघात जाताना नागपूरमधून संत्री विकत घेऊन गेलो असल्याने संत्र्याचा सीझन किंवा हंगाम संपला, असे कसे म्हणता येईल…
आमदार रोहित पवार यांनी विचारले की, तुम्ही निर्णय उशिरा घेतला म्हणून हेक्टरी मदत जाहीर करून सहाशे कोटी रुपयांचे पॅकेज संत्रा उत्पादकांना देणार का… पणनमंत्री अब्दुल सत्तार यांनी रोहित पवार यांच्या मागणीचा विचार करू आणि त्यावर संत्रा उत्पादकांचे नुकसान झाले असल्यास मंत्रिमंडळासमोर जाऊन मदतीचा विचार करू, असे सांगितले.

शेतमाल निर्यातीचे प्रोटोकॉल असतात. पण केंद्र सरकारच्या त्याबद्दलच्या निर्णयामध्ये संत्र्याचा उल्लेख नाही. संत्र्यासह विविध लिंबूवर्गीय फळांच्या निर्यातीसंदर्भात सामंजस्य करार झालेला आहे. त्यार प्रभावी काम झालेले नाही, याकडे आमदार यशोमती ठाकूर यांनी लक्ष वेधले. मंत्री सत्तार यांनी उत्तर दिले की, आपण एक बैठक घेऊन केंद्र सरकारकडे जाऊ. केंद्राचा करार आहे आणि राज्य सरकारला भूमिका नाही. पण राज्यातील शेतकऱ्यांचे नुकसान होत असेल तर केंद्राकडे जाऊ, असेही सत्तार यांनी स्पष्ट केले.
आजही विरोधक पायऱ्यांवर
नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे आज, अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्याच्या पहिल्या दिवशीही नागपूरमध्ये कामकाज सुरू होण्यापूर्वी विरोधी पक्षांच्या सदस्यांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर निदर्शने केली. ललित पाटील ड्रग्ज प्रकरणाचा विषय उपस्थित करत ही निदर्शने करण्यात आली.