Homeन्यूज ॲट अ ग्लांसआज संध्याकाळी होणार...

आज संध्याकाळी होणार दिल्लीचा मुख्यमंत्री जाहीर!

राजधानी दिल्लीचा मुख्यमंत्री कोण हे आज संध्याकाळी सात वाजल्यानंतर स्पष्ट होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर दिल्लीत मुख्यमंत्र्यांच्या जोडीला उपमुख्यमंत्री असणार की नाही, हेही स्पष्ट होणार आहे. आज संध्याकाळी ७ वाजता भाजपाच्या दिल्ली विधिमंडळ पक्षाची बैठक होत आहे. यात ओपी धनखड तसेच रविशंकर प्रसाद भारतीय जनता पार्टीचे पर्यवेक्षक म्हणून सहभागी होतील. आमदारांच्या या बैठकीतच पक्षाच्या केंद्रीय नेतृत्त्वाकडून आलेल्या नावावर आमदारांकडून शिक्कामोर्तब केले जाईल. उद्या दुपारी १२ वाजता प्रसिद्ध रामलीला मैदानावर दुपारी साधारण साडेबारा वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होईल.

पाच फेब्रुवारीला दिल्लीत विधानसभेसाठी मतदान झाले. आठ फेब्रुवारीला मतमोजणी झाली. तेव्हा ७० जागांच्या विधानसभेत भाजपाला ४८ जागा मिळाल्याचे स्पष्ट झाले. मात्र, तेव्हापासून आजपर्यंत पक्षाच्या केंद्रीय नेत्यांनी दिल्लीतल्या मुख्यमंत्र्यांचे नाव निश्चित केले नव्हते. आज सकाळी पक्षाच्या केंद्रीय संसदीय मंडळाची बैठक झाली. या बैठकीत काही नाव शॉर्टलिस्ट करण्यात आली. याच बैठकीत पक्षाचे केंद्रीय निरीक्षकही निश्चित करण्यात आले. दुपारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी भाजपाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांची त्यांच्याबरोबर चर्चा झाली. या चर्चेत मुख्यमंत्र्यांचे नाव निश्चित करण्यात आल्याचे समजते. संध्याकाळी होणाऱ्या आमदारांच्या बैठकीत या नावाला औपचारिक मान्यता दिली जाईल.

दोन दिवसांपूर्वीच नड्डा यांनी दिल्लीतल्या काही आमदारांशी स्वतंत्रपणे चर्चा केली. भाजपाच्या साधारण दहा आमदारांना त्यांनी या चर्चेसाठी बोलावले गेले होते. यामध्ये भाजपाचे दिल्लीचे माजी प्रदेशाध्यक्ष विजेंद्र गुप्ता, सतीश उपाध्याय, अरविंद सिंग लवली, शिखा राय, अजय महावर, रेखा गुप्ता, अनिल कुमार शर्मा, डॉ. अनिल गोयल यांचा समावेश होता. विजेंद्र गुप्ता रोहिणी मतदारसंघातून सतत तिसऱ्यांदा निवडून आले आहेत. सतीश उपाध्याय यांनी आम आदमीचे पार्टीचे नेते सोमनाथ भारती यांचा पराभव केला आहे. अरविंदर सिंग लवली काँग्रेसच्या शीला दीक्षित मुख्यमंत्री असताना त्यांच्या मंत्रिमंडळात चार वेळा मंत्री राहिलेले आहेत. शिखा राय, दिवंगत भाजपा नेत्या सुषमा स्वराज यांच्या अत्यंत जवळच्या मानल्या जातात. सौरभ भारद्वाज, हे आम आदमी पार्टीचे नेते त्यांच्याकडून पराभूत झाले आहेत. अजय महावर धोंडा मतदारसंघातून दोन वेळा निवडून आले आहेत. रेखा गुप्ता भाजपाच्या महिला विभागाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत. अनिल कुमार शर्मा हेही भाजपाचे दिल्लीचे माजी प्रदेशाध्यक्ष आहेत.

भाजपा अध्यक्षांनी या आमदारांशी जरी स्वतंत्रपणे चर्चा केली असली तरी या नेत्यांपैकी एकाच्याही गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडणार नसल्याचे जाणकारांनी सांगितले. या निवडणुकीत आम आदमी पार्टीचे प्रमुख संयोजक, माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना नई दिल्ली मतदारसंघातून पराभूत करणारे प्रवेश वर्मा ही भाजपाची पहिली पसंत ठरू शकते. प्रवेश वर्मा दिल्लीचे माजी मुख्यमंत्री साहेब सिंग वर्मा यांचे चिरंजीव आहेत. 2013पासून या परिसरातून ते सतत दोन वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. नवी दिल्लीची त्यांना चांगली जाण असून केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीच्या आमदारांना व्यवस्थितपणे तोंड देण्याची क्षमता त्यांच्यात असल्याचे बोलले जाते. जितेंद्र महाजन हे आणखी एक आमदार भाजपाचे आहेत जे रोहतास नगर येथून सतत तिसऱ्यांदा निवडून आले आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ते निकटवर्तीय मानले जातात. जर संघाने त्यांच्या नावाचा आग्रह धरला तर दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदासाठी त्यांचे नावही निश्चित होऊ शकते. भाजपाचे दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष विरेंद्र सचदेवा यांच्या नावाचीही चर्चा दिल्लीत होत आहे. मात्र या निवडणुकीत ते स्वतः निवडणूक लढले नाहीत. त्यांनी फक्त पक्षाचा विजय सुनिश्चित करण्यासाठी मेहनत घेतली. याचे बक्षिस म्हणून त्यांना मुख्यमंत्रीपदाची जागा दिली जाऊ शकते, अशी चर्चा आहे. परंतु सूत्रांच्या मते, त्यांना मुख्यमंत्रीपद देऊन पक्षसंघटनेवरील अंकुश कमी करणे भाजपाला तितकेसे मानवणार नाही. त्यामुळे त्यांना इतर कोणत्यातरी मार्गाने समाधानी केले जाईल.

Continue reading

‘एआय’च्या नादात ‘कोअर’ विषयांकडे नका करू दुर्लक्ष!

सध्या सगळीकडे 'एआय'(आर्टिफिशियल इंटेलिजन्स) म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता आणि 'डेटा सायन्स'ची हवा आहे. पण, तुम्ही जर याच वर्षी इंजिनीअरिंगला ॲडमिशन घेण्याचा विचार करत असाल, तर हा रिपोर्ट तुमच्यासाठी 'गेम चेंजर' ठरू शकतो. प्रसिद्ध करिअर सल्लागार जयप्रकाश गांधी यांनी विद्यार्थ्यांना एक...

‘महिला आरक्षण’ हे जातीनिहाय जनगणनेला बगल देण्याचे षडयंत्र!

पंतप्रधान नरेंद्र मोदी महिला आरक्षणाचा वापर केवळ जातीनिहाय जनगणना लांबणीवर टाकण्यासाठी करत असल्याचा आरोप काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी केला आहे. आरक्षणाच्या नावाखाली सरकार मुख्य मुद्द्यांपासून जनतेचे लक्ष भरकटवत असल्याची टीका त्यांनी केली. सोनिया गांधी यांच्या मते, सरकारला देशातील...

जगातल्या १० सर्वात उष्ण शहरांत अकोला दुसऱ्या क्रमांकावर

महाराष्ट्र सध्या उन्हाच्या भीषण तडाख्याने होरपळून निघत असून, विदर्भातील तापमानाने जागतिक विक्रम मोडायला सुरुवात केली आहे. 'एल डोराडो वेदर' आणि हवामान विभागाच्या ताज्या आकडेवारीनुसार, जगातील १० सर्वात उष्ण शहरांच्या यादीत विदर्भातील तब्बल ४ शहरांचा समावेश झाला आहे. यात अकोला...
Skip to content