Homeकल्चर +कथ्थक नृत्याविष्कारातून कुसुमाग्रजांना...

कथ्थक नृत्याविष्कारातून कुसुमाग्रजांना अभिवादन!

कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या कवितांचा अर्थ उलगडणारा पदन्यास आणि प्रभावी रूपबंधाने नटलेला नृत्याविष्कार सादर करीत पुण्यातील नृत्यांगना नेहा मुथियान यांनी ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रजांच्या ‘अहि-नकुल’ आणि ‘आगगाडी व जमीन’ या कविता नृत्यभाषेतून सादर करून अभिवादन केले आहे.

नवी दिल्लीतल्या महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने ‘मराठी भाषा गौरव दिना’चे औचित्य साधून राबविण्यात आलेल्या कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या कवितावाचन उपक्रमांतर्गत कथ्थक नृत्यांगना नेहा मुथियान आणि त्यांच्या शिष्यांनी कुसुमाग्रजांच्या कवितांवर आधारीत कथ्थक नृत्याविष्कार सादर केला. महाराष्ट्रासह देश-विदेशातील मराठी साहित्य रसिकांसाठी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ही अनोखी भेटही ठरली आहे.

नेहा मुथियान यांचे कथ्थक नृत्य खालील लिंकवर

वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रजांनी मराठी साहित्यात दिलेल्या भरीव योगदानाचा कृतज्ञभाव व्यक्त करण्यासाठी मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधत परिचय केंद्राने त्यांच्या कविता वाचन उपक्रमाचे आयोजन केले. १३ फेब्रुवारी २०२१पासून सुरू झालेल्या या उपक्रमांतर्गत मलेशिया, ऑस्ट्रेलिया या देशांसह कर्नाटक, मध्य प्रदेश, गुजरात, छत्तीसगड, तेलंगणा, दिल्ली या राज्यांतून आणि महाराष्ट्रातून गडचिरोली ते सिंधुदूर्ग अशा विविध भागांतून सहभागी ५० साहित्य रसिकांनी कविता वाचन केले. कार्यालयाच्या ट्विटर, फेसबुक, युटयूब, इंस्टाग्राम आदीं समाज माध्यमांद्वारे यास प्रसिध्दी देण्यात आली.

गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा येथील साडेतीन वर्षांची विनंती झाडे हिच्यासह लहान मुलांनी या उपक्रमात सहभाग घेतला. कला, साहित्य, नाट्य, शिक्षण आदी क्षेत्रातील ८५ वर्षांच्या साहित्य रसिक या उपक्रमात सहभागी झाले. या उपक्रमांतर्गत कुसुमाग्रजांच्या जयंती दिनाच्या पूर्वसंध्येला कथ्थक नृत्यांगना नेहा मुथियान आणि त्यांच्या शिष्यांनी कुसुमाग्रजांच्या कवितांवर आधारीत अप्रतिम नृत्याविष्कार सादर केला.

नृत्यांगना नेहा मुथियान आणि त्यांच्या शिष्यांनी कुसुमाग्रजांच्या बहुप्रसिध्द ‘विशाखा’ काव्य संग्रहातील ‘अहि-नकुल’ आणि ‘आगगाडी व जमीन’ या कवितांवर आधारीत कथ्थक नृत्याविष्कार सादर केला. कधी नागाने घातलेला विळखा तर कधी नकुलाने अर्थात मुंगुसाने त्याच्यावर केलेला प्रहार आणि आगगाडीच्या गर्वाला अचानक मातीने दाखविलेले सामर्थ्य या दृष्यातून जन्मलेली नृत्यभाषा महाराष्ट्र परिचय केंद्राच्या सोशल मीडियावर अवतरली आहे.

कथ्थकच्या माध्यमातून रंगला संग्राम

कुसुमाग्रजांनी ‘अहि नकुल’ या कवितेतून ब्रिटिश राजसत्ता आणि भारतीय जनता असा संघर्ष नाग आणि मुंगुसाचे प्रतिक वापरून मांडले आहे. कुसुमाग्रजांच्या भारदस्त शब्दांनी मनामनांमध्ये निर्माण केलेल्या या संग्रामाचे चित्र या कलाकारांनी नृत्याविष्काराच्या माध्यमातून दृष्य स्वरूपात समर्थपणे मांडले आहे. अन्यायाची सीमा गाठली जाते तेव्हा हतबलताही बलवान ठरते आणि मदांध सत्तेविरूध्द विद्रोह करते हा भाव कलाकारांनी उत्तम पदन्यासातून दर्शविला आहे.

ओतीव विखारी वातावरणी आग!

हा वळसे घालीत आला मंथर नाग.. या ओळींतून प्रतीत होणारी नागाची प्रक्षोभक वृत्ती नृत्याविष्कारातून उत्तमरित्या मांडली आहे. कुसुमाग्रजांनी या कवितेत वज्र, गर्भरेशमी पोत, मादक वस्त्र, अग्नीचा ओघळ, कनकाची कटयार, मल्हारतान अशा एकापेक्षा एक सकस कल्पना योजल्या आहेत व कथ्थक नृत्याच्या माध्यमातून कलाकारांनी या कल्पना हुबेहूब साकारल्या आहेत.

आगगाडी व जमीनच्या माध्यमातून अन्यायाविरुध्दचे बंड

जीवन लहरी छंदात बांधलेल्या ‘आगगाडी व जमीन’ या कवितेतून कुसुमाग्रजांच्या विशिष्ट शैलीचा प्रत्यय येतो आणि याच शब्दछटा नृत्याविष्कारात प्रतिबिंबीत झाल्या आहेत. ही कविता रूपकात्मक आहे. समाजात उच्चवर्गाकडून होणारे शोषण आणि या शोषणाविरूध्द निम्नवर्गीयांनी उभारलेले बंड ही या कवितेतील मध्यवर्ती कल्पना पदन्यास व रूपबंधातून नृत्याविष्कारात अवतरली आहे. या दोन्ही नृत्याची मूळ संरचना नेहा मुथियान यांच्या गुरू शांभवी दांडेकर यांची आहे.

Continue reading

आयडियल मोफत कबड्डी स्पर्धात्मक शिबिरात ४० खेळाडू

मुंबईच्या आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे यंग स्पोर्ट्स क्लब-घाटकोपर यांच्या सहकार्याने शालेय मुलांसाठी मोफत कबड्डी स्पर्धात्मक मार्गदर्शन शिबीर येत्या २७ एप्रिलपासून माणिकलाल मैदान, घाटकोपर येथे सुरु होत असून त्यात शालेय ४० खेळाडू सहभागी झाले आहेत. नवोदित खेळाडूंना तंत्रशुद्ध कबड्डी खेळाची प्राथमिक...

उत्तर प्रदेशातले शेखा झील पक्षी अभयारण्य झाले ‘रामसर स्थळ’!

केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी मंगळवारी उत्तर प्रदेशातल्या अलिगढमधल्या शेखा झील पक्षी अभयारण्याला ‘रामसर स्थळ’ म्हणून मान्यता मिळाल्याचे घोषित केले. यामुळे भारतातल्या रामसर स्थळांची एकूण संख्या 99 झाली आहे. उत्तर प्रदेशात ही संख्या 12पर्यंत पोहोचली आहे. “उत्तर प्रदेशने हा...

‘वंदे मातरम’वर आधारित चित्रपट निर्मिती स्पर्धेचे आयोजन

वंदे मातरम, या राष्ट्रीय गीताला 150 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांचा एक भाग म्हणून, केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने "व्हीएम फ्रेम्स" या राष्ट्रीय चित्रपट निर्मिती स्पर्धेची घोषणा केली आहे. या स्पर्धेद्वारे नागरिकांना दृश्यात्मक कथाकथनाच्या माध्यमातून राष्ट्रगीताचा भाव सर्जनशीलतेने...
Skip to content