Homeटॉप स्टोरीउद्धव ठाकरेंच्या दिल्लीवारीनंतरच...

उद्धव ठाकरेंच्या दिल्लीवारीनंतरच राहुल गांधी ‘मातोश्री’वर!

उद्धव ठाकरे यांनी आधी दिल्ली गाठावी. त्यानंतरच राहुल गांधी मुंबईत येतील, असे काल काँग्रेसचे महासचिव के. सी. वेणूगोपाल यांनी स्पष्ट केल्यामुळे गेल्या १० दिवसांपासून काँग्रेसचे नेते राहुल गांधी उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी ‘मातोश्री’वर येणार असल्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला.

स्वा. सावरकर यांच्याबद्दल राहुल गांधी यांनी केलेली वक्तव्ये, पक्षाच्या इतर नेत्यांकडून होणारे त्याचे समर्थन, सावरकरांबद्दल उद्धव ठाकरे गटाची भूमिका, अशा विविध परस्परविरोधी भूमिकांचा महाविकास आघाडीवर होणारा विपरीत परिणाम टाळण्यासाठी काल रात्री वेणूगोपाल यांनी उद्धव ठाकरेंची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, खासदार संजय राऊत आदी यावेळी उपस्थित होते. दोन्ही बाजूंच्या नेत्यांनी चर्चा केल्यानंतर वेणूगोपाल तसेच उद्धव ठाकरे यांनी संयुक्तपणे एका पत्रकार परिषदेला संबोधित केले.

यावेळी वेणूगोपाल यांना राहुल गांधी यांच्या मातोश्री भेटीबाबत विचारले असता त्यांनी इतक्यात ही भेट होण्याची शक्यताच नसल्याचे सूचित केले. आम्ही उद्धव ठाकरे यांना दिल्लीत पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या भेटीसाठी यावे. तसे निमंत्रण आम्ही त्यांना दिले आहे. त्यांची दिल्लीवारी झाल्यावर राहुल गांधी निश्चितच मुंबई गाठतील, अशा आशयाचे विधानही वेणूगोपाल यांनी केले. 

मीकरणाविरोधातील समीकरण – उद्धव ठाकरे

यानंतर उद्धव ठाकरे म्हणाले की, आजचा भेटीचा उद्देश वेणूगोपाल यांनी स्पष्ट केला. देशात मीकरणाच्या विरोधात एक समीकरण म्हणून सर्व पक्ष एकत्र आले आहेत. प्रत्येक पक्षाची स्वतःची विचारधारा आहेच. त्यालाच लोकशाही म्हणतात. म्हणून आम्ही एकत्र आलोय. निवडणुका समोरच उभ्या आहेत. लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत.

मागे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष नड्डा बोललेले फक्त भाजप राहील इतर सगळे पक्ष संपतील. शिवसेना संपवावी यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. भाजपला सत्तेचा हव्यास आहे. ते सत्ताभक्षक झाले आहेत. लोकशाही वाचवण्यासाठी शिवसेना संपूर्ण ताकदीने उतरली आहे. आम्ही मैत्री करतो तर पूर्ण मनापासून निभवतो. एक नाते निर्माण होते. भाजपसोबत २५-३० वर्षं होतो. पण होतो… त्यांना किंमत नव्हती. ठिक आहे. त्यांना मित्र आणि शत्रू समजले नाहीत. लोकांच्या मनात प्रश्न आहेत. ते आम्हाला साथ देतील, असेही ठाकरे म्हणाले.

Continue reading

शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य डॉ. सुनिता कामटे सेवानिवृत्त

मुंबईतल्या बोरीवली पूर्व येथील सुविद्या प्रसारक संघाच्या श्री मंगुभाई दत्ताणी विद्यालय आणि योजना कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या शिक्षणतज्ज्ञ डॉ. सुनिता कामटे आपल्या ३३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर नुकत्याच सेवानिवृत्त झाल्या. याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सुविद्या प्रसारक संघाचे अध्यक्ष शिक्षणतज्ज्ञ महादेव रानडे...

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा पुरंदरे यांचे देहावसान

मुंबईतल्या दादर माटुंगा कल्चरल सेंटरच्या सल्लागार सदस्या तसेच दादर वनिता समाज, या प्रतिष्ठित संस्थेच्या ज्येष्ठ सदस्या सुरेखा पुरंदरे यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. त्या ९१ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. शास्त्रीय संगीतात...

प्राध्यापक डॉक्टर भ्रष्टाचारी? जे. जे. रुग्णालयात खळबळ!

मुंबईतील प्रसिद्ध जे. जे. रुग्णालयाच्या अस्थिरोगशास्त्र (आर्थॉपेडिक्स) विभागात एका वरिष्ठ प्राध्यापकाविरुद्ध अत्यंत गंभीर आणि धक्कादायक आरोप झाल्यामुळे वैद्यकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. प्रा. डॉ. नितीन महाजन यांच्यावर निवासी डॉक्टरांचा मानसिक व आर्थिक छळ करणे, बनावट सह्या करणे आणि...
Skip to content