Homeटॉप स्टोरीपनवेल-इंदापूर सिंगल लेन...

पनवेल-इंदापूर सिंगल लेन १० सप्टेंबरपासून पूर्ण क्षमतेने सुरू होणार

मुंबई-गोवा महामार्गावरील पनवेल ते कासू आणि कासू ते इंदापूर या दोन टप्प्यातील 84 किलोमीटरचा रस्ता पूर्ण क्षमतेने तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. यासाठी नवीन अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा व मशिनरीचा वापर होत आहे. त्यामुळे सिंगल लेनवरील काम पूर्ण होत आहे. १० सप्टे़बरपासून ही लेन वाहतुकीस पूर्ण क्षमतेने सुरू होईल, असा विश्वास राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज व्यक्त केला.

सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज मुंबई ते गोवा या महामार्गाचच्या कामाची पाहणी केली. आजच्या दौऱ्यात त्यांनी पनवेल ते वाकण फाटा, नागोठणेपर्यंतच्या कामाची पाहणी केली. पहिल्या टप्प्यातील पळस्पे फाटा तसेच जिते तर कासू ते इंदापूर या दुसऱ्या टप्प्यातील पांडापूर येथील व नागोठणे येथील कामाची पाहणी केली. यावेळी अत्याधुनिक मशिनरी मागवण्यात आल्या आहेत त्याची सविस्तर माहिती त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांकडून घेतली. मुंबई-गोवा पाहणी दौऱ्याच्या निमित्ताने पांडापूर व नागोठणे येथे संवाद साधताना ते बोलत होते.

राष्ट्रीय महामार्गावरील कासूपासून पुढील कामाची गती वाढविण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे (एनएचएआय) अधिकारी आणि ठेकेदारांना आदेश दिले आहेत. या टप्प्यातील ७ किमीचा रस्ता थोडा किचकट आहे. स्थिती पाहून नवीन तंत्राचा वापर केला जात आहे. खोलवर सिमेंट काँक्रीटचा वापर, अवजड वाहतुकीमुळे रस्ता खराब होऊ नये यासाठी रस्ता बनवताना २० टनी रोलरचा वापर केला जणार आहे. यासोबतच आधुनिक मशीन उपलब्ध करण्यात आले असून पा़ंडापूर येथे त्याची चव्हाण यांनी पाहणी केली.

कासूपासून पुढील ७ किमी व नंतर ३.५ किमी अंतर आर्म टॉपिंग पद्धतीचा वापर होईल. या फेजमध्ये पळस, वाकण फाटा, जि़दल गेट, कोलाड, इंदापूर या भागात विविध अंतरानुसार कामाची विभागणी केली आहे. तर इंदापूरजवळचा टप्पा पूर्ण करताना १६ किमी अंतर व्हाईट टॉपिंग तंत्राचा वापर केला जाईल, असे त्यांनी सा़गितले.

यासाठी नियुक्त अधिकारी व यंत्रणेच्या कामाचा त्यांनी आढावा घेतला. महामार्गाची तातडीने कामे होण्यासाठी वाहतुकीचा अडथळा येऊ नये यासाठी पोलीस विभागांचे सहाय्य घेण्याबाबत सूचना दिल्या. याबाबत त्यांनी पोलीस अधीक्षक सोमनाथ घागरे यांच्याशी चर्चा केली. हा मार्ग लवकरात लवकर पूर्ण होण्याच्या दृष्टीने युद्धपातळीवर प्रयत्न करण्याचे निर्देशही चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना दिले.

कोकणातील जनतेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असणाऱ्या हा महामार्गाची एक लेन गणेशोत्सवापूर्वी वाहतुकीसाठी पूर्ण करण्यात येईल आणि ९ मीटर रुंदीच्या दोन्ही लेन डिसेंबरपर्यंत पूर्ण करणार अशी माहितीही त्यांनी दिली. रत्नागिरी व सिंधुदूर्ग जिल्ह्यातील मुंबई-गोवा महामार्गाचे बहुतांश काम जवळजवळ पूर्ण झाले  यावेळी माजी आमदार धैर्यशील पाटील, एनएचएआयचे मुख्य अभियंता संतोष शेलार, प्रकल्प अभियंता यशवंत घोटेकर, कार्यकारी अभियंता निरज चोरे यासह विविध विभागांचे अधिकारी होते.

वाहतूककोंडी दूर करण्यासाठीही घेतला पुढाकार

मुंबई-गोवा पाहणी दौरा सुरू असतानाच पेणजवळ हॉटेल साई सहाराजवळ एक एसटी बंद पडल्यामुळे या मार्गावर सुमारे दोन ते अडीच तास वाहतूककोंडी झाली होती. वाहतूककोंडी सुटेना. एसटी जागेवरच बंद पडल्यामुळे दोन्ही बाजूच्या मार्गिकेवरील गाड्या तब्बल दोन तास अडकल्या होत्या. त्यामुळे जिते या गावाच्या पूलापासून हॉटेल साई सहारा व तेथून पेणकडे जाणाऱ्या महामार्गाच्या दोन्ही बाजूला वाहना़च्या रा़ंगा वाढून वाहतूककोंडीत भर पडत होती. बंद एसटी बस जागेवरून काढण्याचे प्रयत्न सुरू होते. अखेर सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण स्वतः रस्त्यावर उतरले व ते चालत हॉटेल साई सहारापर्यंत गेले. त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी या वाहतूककोंडीतून मार्ग काढत बंद एसटीला क्रेनच्या साह्याने बाजूला करण्यास मदत केली. सुमारे दोन तासानंतर यात यश आले. त्यानंतर या मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली आणि प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.

Continue reading

६ महिन्यांत जाणार नवी मुंबईतली रेल्वेस्थानके रेल्वेच्या ताब्यात!

नवी मुंबईतील रेल्वे प्रवाशांसाठी एक अत्यंत मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला आणि प्रवाशांच्या गैरसोयीला कारणीभूत ठरणारा स्थानकांच्या देखभालीचा प्रश्न अखेर कायमचा सुटणार आहे. येत्या सहा महिन्यांत नवी मुंबईतील सर्व रेल्वेस्थानके सिडकोकडून मध्य रेल्वेकडे पूर्णपणे हस्तांतरित...

पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीच्या रासायनिक लेपनास स्थगिती!

कोट्यवधी हिंदूंचे आराध्यदैवत असलेल्या पंढरपूरच्या ‘स्वयंभू’ श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीवर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती आणि पुरातत्त्व विभागाकडून २३ आणि २४ जून रोजी प्रस्तावित असलेल्या रासायनिक वज्रलेपनास पंढरपूरच्या दिवाणी न्यायालयाने (कनिष्ठ स्तर) तत्काळ स्थगिती दिली आहे. वारकरी संप्रदाय आणि महाराष्ट्र मंदिर महासंघाने...

हा तर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाच्या विश्वासार्हतेवरच आघात!

शिवसेनेतल्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांचे आज उफाळून आलेले कथित बंड हे केवळ खासदारांचे बंड नाही, तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाच्या विश्वासार्हतेवर झालेला दुसरा मोठा आघात आहे. २०२२मध्ये आमदारांनी दिलेला धक्का आणि आता २०२६मध्ये पुन्हा एकदा खासदारांनी फिरवलेली पाठ, या...
Skip to content