Homeन्यूज अँड व्ह्यूजराष्ट्रीय महामार्गांचे जाळे...

राष्ट्रीय महामार्गांचे जाळे उभारण्यात अमेरिकेनंतर भारत!

गेल्या नऊ वर्षांत देशातील राष्ट्रीय महामार्गांची एकूण लांबी सुमारे 59% वाढली आहे. या वाढीमुळे भारताकडे आता अमेरिकेनंतर दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रस्ते जाळे आहे, असे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. “2013-14 मध्ये राष्ट्रीय महामार्गांची एकूण लांबी 91,287 किमी होती, जी 2022-23 मध्ये 1,45,240 किमीपर्यंत वाढली असून या कालावधीत ही लांबी 59% पेक्षा अधिक वाढली आहे.”, असे ते म्हणाले.

गेल्या नऊ वर्षांत चौपदरी राष्ट्रीय महामार्गांमध्ये सुमारे दुप्पट वाढ झाली आहे. 2013-14 मध्ये चौपदरी राष्ट्रीय महामार्गांची लांबी 18,371 किमी होती जी गेल्या नऊ वर्षात 44,654 किमी झाली आहे, असे त्यांनी सांगितले. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचे सचिव अनुराग जैन आणि भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अध्यक्ष संतोष कुमार यादव हे देखील पत्रकार परिषदेला उपस्थित होते. फास्टॅग (FASTag) लागू झाल्यामुळे पथकर संकलनात लक्षणीय वाढ झाली आहे. पथकारामधून मिळणारा महसूल 2013-14 मधील  4,770 कोटी रुपयांवरून 2022-23 मध्ये 41,342 कोटी रुपयांवर पोहोचला आहे, अशी माहिती गडकरी यांनी दिली. 2030 पर्यंत पथकर महसूल 1,30,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे, असेही त्यांनी सांगितले.

फास्टॅगमुळे पथकर नाक्यांवर होणारा खोळंबा  कमी झाली आहे. “2014 मध्ये पथकर नाक्यांवरचा प्रतीक्षा कालावधी 734 सेकंदांचा होता, तर 2023 मध्ये तो 47 सेकंदांवर आला आहे. आम्हाला आशा आहे की, आम्ही हा कालावधी लवकरच 30 सेकंदांपर्यंत खाली आणू”, असे नितीन गडकरी म्हणाले. भारतातील प्रवासाच्या अनुभवांमध्ये फास्टॅगमुळे (FASTag) पडलेल्या परिवर्तनीय प्रभावाबद्दल सांगताना, फास्टॅगने पथकर भरण्याच्या संकल्पनेत क्रांती घडवून आणली आहे आणि रोख व्यवहारांची गरज संपुष्टात आणली आहे, असे केंद्रीय मंत्री म्हणाले. एका संशोधनानुसार, या महत्वाच्या उपक्रमामुळे पथकर नाक्यांवर वाहने थांबल्यामुळे वाया जाणार्‍या इंधन खर्चात अंदाजे 70,000 कोटी रुपयांची बचत झाली आहे, असे त्यांनी सांगितले.

ईशान्य भागात महामार्गाच्या जाळ्याच्या विस्तारावर विशेष भर दिला जात आहे, असे गडकरी यांनी सांगितले. या प्रदेशात 2 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे प्रकल्प राबवले जात आहेत असे ते म्हणाले. प्रवासाचा सुखद अनुभव मिळावा यासाठी राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूने 670 सुविधा विकसित केल्या जात आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (एनएचएआय) इनव्हिट (इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट) मॉडेल अंतर्गत रोखे (बॉन्ड) जारी करण्यात आले आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला, असेही त्यांनी सांगितले. मुंबई शेअर बाजारात रोखे उपलब्ध झाल्यानंतर पहिल्या दिवशीच बाँडचे सात वेळा ओव्हरसबस्क्रिप्शन झाले. इनव्हिट पारंपरिक बँक दरांना मागे टाकून 8.05 टक्के आकर्षक व्याजदर देते. त्यामुळे गुंतवणूकदारांनी त्यात गुंतवणुकीचा विचार करण्याचे आवाहन गडकरी यांनी केले. एनएचएआयने सात जागतिक विक्रम केले आहेत, त्यावरून तंत्रज्ञान प्रगतीसाठी एनएचएआयची वचनबद्धता आणि भारतात अमेरिकेनंतरचे जगातील दुस-या क्रमांकाचे रस्ते जाळे तयार करण्याची महत्त्वाकांक्षा दिसून येते असे गडकरी यांनी सांगितले.

हरित उपक्रमांच्या मुद्द्यावर गडकरी म्हणाले की, एनएचएआयने ने गेल्या नऊ वर्षांत 68,000 हून अधिक वृक्षांचे पुनर्रोपण केले, तर 3.86 कोटी वृक्षांची लागवड केली. एनएचएआयने देशभरातील राष्ट्रीय महामार्गांवर 15,000 हून अधिक अमृत सरोवरे विकसित केली आहेत, अशी माहिती त्यांनी जल पुनरुज्जीवन उपक्रमांबद्दल बोलताना दिली. मंत्रालयाने दिल्ली रिंगरोड प्रकल्पासाठी रस्ते बांधणीत 30 लाख टन कचरा वापरला आहे. हे कचरा व्यवस्थापन आणि शाश्वत पायाभूत सुविधांच्या विकासाविषयीच्या सक्रिय दृष्टीकोनाचे द्योतक आहे, असे ते म्हणाले. त्यांनी बांबू क्रॅश बॅरिअर्सविषयी माहिती दिली.  हे बांबू बॅरिअर्स रोजगाराच्या संधी निर्माण करण्याबरोबरच पर्यावरणीय शाश्वततेला चालना देत रस्ते अधिक टिकाऊ बनवतात असे ते म्हणाले. शाश्वत भविष्यासाठी सरकारच्या वचनबद्धतेला अनुसरून गडकरी यांनी पुढील पाच वर्षांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवणे, स्वच्छ ऊर्जेला चालना देणे आणि कार्बन उत्सर्जन कमी करणे हा दृष्टीकोन मांडला.

Continue reading

संपात उतरणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई!

विविध प्रलंबित मागण्यांसाठी उद्या म्हणजेच २१ एप्रिलपासून बेमुदत संप पुकारण्याबाबत राज्य सरकारी, निमशासकीय कर्मचाऱ्यांनी शासनास नोटीस दिली असून, या पार्श्वभूमीवर या संपामध्ये सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा शासनाने दिला आहे. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, राज्य सरकारी गट‑ड (चतुर्थ श्रेणी)...

२४ एप्रिलपर्यंत राज्यात वादळी पाऊस, गारपीट व विजांचा इशारा

भारतीय हवामान खात्याच्या आज जाहीर केलेल्या अंदाजानुसार, राज्यातील विविध भागांत २४ एप्रिलपर्यंत वादळी वारे, विजांचा कडकडाट, गारपीट आणि पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विशेषतः मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकण विभागातल्या जिल्ह्यांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने केले आहे. या पार्श्वभूमीवर...

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्यापासून जर्मनीच्या दौऱ्यावर

इराण आणि अमेरिकेतला संघर्ष तीव्र होत असतानाच तसेच नाटो संघटनेतल्या युरोपीय राष्ट्रांची यावरील भूमिका महत्त्वाची ठरत असतानाच भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्यापासून 23 एप्रिलपर्यंत तीन दिवसांच्या जर्मनीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यादरम्यान, संरक्षण मंत्री त्यांचे जर्मनीतील समकक्ष बोरिस...
Skip to content