Homeटॉप स्टोरीविधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून...

विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून थोपटे?

राज्य विधिमंडळाचे संपूर्ण अधिवेशन विधानसभेच्या अध्यक्षाविनाच संपण्याच्या उंबरठ्यावर असताना काँग्रेसकडून आता अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आग्रह धरला जात असून यासाठी त्यांच्याकडून संग्राम थोपटे यांचे नाव निश्चित झाल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्याला आता एका महिन्यापेक्षा जास्त काळ लोटला आहे. विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक अधिवेशनातच घेतली जाते. त्यामुळेच पटोलेंनंतर या पदावर कोण जाणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. पटोले यांच्या राजीनाम्यानंतर तेव्हा  दिल्लीत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी, हे पद आता रिक्त झाले आहे. त्यामुळे या पदासाठी नव्याने चर्चा केली जाईल, असे सांगत राष्ट्रवादी यावर दावा करू शकते, असे सूचित केले होते. शिवसेनेला अध्यक्षपद देऊन त्याच्या मोबदल्यात उपमुख्यमंत्रीपद घ्यावे, असा प्रयत्न काँग्रेस करेल, अशी शक्यताही राजकीय क्षेत्रात व्यक्त होत होती. मात्र त्यात पुढे फारसे काही झाले नाही.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तोंडावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्य सरकारला एक पत्र पाठवून अध्यक्षपदाच्या निवडणुकीची तारीख विचारली होती. परंतु या पत्रावर सरकारने मौन बाळगले. उपाध्यक्षांच्याच अध्यक्षपदाखाली सध्या हे अधिवेशन सुरू असून उद्या त्याची समाप्ती होणार आहे. विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही, सरकार अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी घाबरते आहे का, असा सवाल करत सत्ताधारी महाविकास आघाडीचे आमदार फुटण्याचा दावा केला होता. सुधीर मुनगंटीवार यांनी महाराष्ट्राच्या अलीकडच्या इतिहासाचा दाखला देत यापूर्वी जास्तीतजास्त आठवडाभर हे पद रिक्त राहिल्याचे विधानसभेत दाखवून दिले होते.

काल अचानक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले तसेच माजी प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या निवासस्थानी काँगेसच्या नेत्यांच्या हालचाली वाढल्या. या खलबतांमध्ये अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याच्या दृष्टीने तयारी करण्यात आली. भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांशी ‘बोलून’ ही निवडणूक बिनविरोध करायची. बिनविरोध होत नसल्यास सध्या असलेल्या काठावरच्या बहुमताच्या जोरावर आवाजी मतदानाने ही निवडणूक पार पाडायची, अशी व्यूहरचना काँग्रेसकडून आखण्यात आली असल्याचे कळते. या पदासाठी काँग्रेसने आपल्या उमेदवाराची चाचपणीही केली असून पुण्यातील भोर मतदारसंघाचे आमदार संग्राम थोपटे यांचे नाव जवळजवळ निश्चित झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

आज सकाळी विधानभवनातल्या काँग्रेसच्या विधिमंडळ कार्यालयात काँग्रेसच्या आमदारांची तसेच काही निमंत्रित नेत्यांच्या बैठकीत अध्यक्षपदाच्या निवडणुकीवर औपचारिक निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. यात निवडणुकीची तारीख तसेच उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब केले जाऊ शकते. आजच महाविकास आघाडीच्या समन्वय समितीची बैठकही होण्याची शक्यता आहे. त्यात यावर राष्ट्रवादी तसेच शिवसेनेची नेमकी भूमिका काय, हे जाणून घेऊन त्यांच्या गळी अध्यक्षपदाची निवडणूक उतरविण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून केला जाण्याची शक्यता आहे.

उद्या निवडणूक घ्यायची ठरल्यास आज त्याची घोषणा विधानसभेत केली जाईल. उमेदवारी अर्ज भरण्याची, अर्जाची छाननी, अर्ज मागे घेण्याची मुदत आदी तांत्रिक बाबींची पूर्तता करून उद्या निवडणूक घेतली जाईल.

Continue reading

‘वंदे मातरम’वर आधारित चित्रपट निर्मिती स्पर्धेचे आयोजन

वंदे मातरम, या राष्ट्रीय गीताला 150 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांचा एक भाग म्हणून, केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने "व्हीएम फ्रेम्स" या राष्ट्रीय चित्रपट निर्मिती स्पर्धेची घोषणा केली आहे. या स्पर्धेद्वारे नागरिकांना दृश्यात्मक कथाकथनाच्या माध्यमातून राष्ट्रगीताचा भाव सर्जनशीलतेने...

आता पंतप्रधान प्रशिक्षणार्थी योजनेसाठी अंतिम वर्षाचे विद्यार्थीही पात्र

युवकांची रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढवण्यासाठी केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने, पंतप्रधान प्रशिक्षणार्थी योजनेच्या प्रायोगिक टप्प्यावर, पात्रता निकषात बदल केले आहेत. त्यानुसार, आता पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाचे विद्यार्थीही याकरीता पात्र होतील. यामुळे, विद्यार्थ्यांना देशातल्या आघाडीच्या कंपन्यांमध्ये संरचनात्मक, प्रशिक्षणार्थी कार्यक्रमाच्या...

मुंबईच्या शहरी भागात आज पाणीपुरवठा विस्कळीत

मुंबई महापालिकेतर्फे शिवडी येथील टनल भंडारवाडा टेकडी जलाशय वाहिनीवर १५०० मिलीमीटर व्यासाचे दोन बटरफ्लाय व्हॉल्व बसविण्याचे काम हाती घेतले जात आहे. हे काम भंडारवाडा टेकडी जलाशय, फॉसबेरी टेकडी जलाशय आणि गोलंजी टेकडी जलाशय यांचा पाणीपुरवठा सुव्यवस्थित करण्यासाठी केले जाणार...
Skip to content