Homeटॉप स्टोरीफडणवीस, महाजनानांना अटक...

फडणवीस, महाजनानांना अटक करण्याच्या कटाचा मी साक्षीदार!

राज्यात महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात तेव्हाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तसेच भारतीय जनता पार्टीचे नेते गिरीश महाजन यांना अटक करून भाजपाला बॅकफूटवर नेण्याचा कट आखला जात होता आणि त्याचा मी साक्षीदार आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज एका पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. पुढे हे सरकारच राहिले नाही त्यामुळे तो विषय संपला, असेही ते म्हणाले.

राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून मुंबईत सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर सह्याद्री अतिथीगृहात आयोजित करण्यात आलेल्या चहापान कार्यक्रमानंतर एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आपल्याकडे रोज हजारो फाईली येतात आणि त्या निकालात काढण्यासाठी लागणाऱ्या सह्या मी घरी, कार्यालयात, गाडीत, कुठे कार्यक्रमात असलो तर तिथे, सगळीकडे करतो. फाईली बघण्यापलीकडे मला दुसरा कोणताही छंद नाही, असेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

गेल्या सात महिन्यांत वर्षा निवासस्थानी झालेल्या चहापानाच्या खर्चावरून विरोधकांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले की, वर्षावर येणाऱ्या लोकांना चहापाणी देणे ही आमची संस्कृती आहे. त्यांना बिर्याणी तर खायला घालत नाही ना, असा सवालही त्यांनी केला. मागच्या काळात ऑनलाईन काम करण्यासाठी दर महिन्याला 35 लाखांहून जास्त खर्च येत होता. याचा हिशेब कोण देणार, असे ते म्हणाले.

विरोधकांवर पोलिसांकडून होत असलेल्या कथित अत्याचारावर बोलताना अजित पवार यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले होते. त्यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, आमच्या सरकारच्या काळात विरोधकांना अशा पद्धतीने कधीच त्रास दिला गेलेला नाही. याउलट मागच्या सरकारच्या काळात यांनी नारायण राणे यांना भरल्या ताटावरून उठवून अटक केली.  राणे हे केंद्रीय मंत्री होते. खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा यांना अटक झाली. कंगना राणावत यांचे घर तोडले. केतकी चितळे यांना अटक करण्यात आली. गिरीश महाजन यांना तर मकोका लावण्याची तयारी झाली होती. हे सर्व कसले द्योतक होते, असा सवाल येईल मुख्यमंत्र्यांनी केला.

आम्ही मुंबई बाहेर गेलेल्या मुंबईकरांना पुन्हा मुंबईत आणण्यासाठी प्रयत्न करत आहोत. मुंबई आंतरराष्ट्रीय नगरी आहे, आर्थिक राजधानी आहे. येथील लोकांना चांगल्या सोयीसुविधा देणे आमचे कर्तव्य आहे. आम्ही लोकांचे पैसे लोकांसाठी वापरणार. ते डिपॉझिट करून ठेवणार नाही, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी आवर्जून सांगितले.

आमचे सरकार घटनाबाह्य सरकार नसून ते बहुमताचे सरकार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह आम्हाला दिले आहे. सर्वोच्च न्यायालयानेही त्याला स्थगिती दिलेली नाही. तुमच्या बाजूने निर्णय झाला तर तो चांगला आणि विरोधात निर्णय झाला तर लोकांमध्ये रोष आहे, ही भूमिका आता सोडून द्या, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना फैलावर घेतले.

Continue reading

शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य डॉ. सुनिता कामटे सेवानिवृत्त

मुंबईतल्या बोरीवली पूर्व येथील सुविद्या प्रसारक संघाच्या श्री मंगुभाई दत्ताणी विद्यालय आणि योजना कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या शिक्षणतज्ज्ञ डॉ. सुनिता कामटे आपल्या ३३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर नुकत्याच सेवानिवृत्त झाल्या. याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सुविद्या प्रसारक संघाचे अध्यक्ष शिक्षणतज्ज्ञ महादेव रानडे...

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा पुरंदरे यांचे देहावसान

मुंबईतल्या दादर माटुंगा कल्चरल सेंटरच्या सल्लागार सदस्या तसेच दादर वनिता समाज, या प्रतिष्ठित संस्थेच्या ज्येष्ठ सदस्या सुरेखा पुरंदरे यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. त्या ९१ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. शास्त्रीय संगीतात...

प्राध्यापक डॉक्टर भ्रष्टाचारी? जे. जे. रुग्णालयात खळबळ!

मुंबईतील प्रसिद्ध जे. जे. रुग्णालयाच्या अस्थिरोगशास्त्र (आर्थॉपेडिक्स) विभागात एका वरिष्ठ प्राध्यापकाविरुद्ध अत्यंत गंभीर आणि धक्कादायक आरोप झाल्यामुळे वैद्यकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. प्रा. डॉ. नितीन महाजन यांच्यावर निवासी डॉक्टरांचा मानसिक व आर्थिक छळ करणे, बनावट सह्या करणे आणि...
Skip to content