Homeब्लॅक अँड व्हाईटशरद पवारांना महाग...

शरद पवारांना महाग पडणार घाईघाईतले विलिनीकरण!

अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी त्यांच्या सुविद्य पत्नी सुनेत्रा पवार यांच्यावर आली आहे. त्या ही जबाबदारी यशस्वीपणे पार पडतील याबद्दल तीळमात्र शंका नाही. त्यांचाही जन्म धाराशिवमधील राजकीय घराण्यातच झाला आहे. महाराष्ट्राचे माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या त्या कनिष्ठ भगिनी. डॉ. पद्मसिंह पाटील हे शरद पवारांचे विश्वासू साथीदार. शरद पवार दिल्लीत संरक्षणमंत्रीपदी गेल्यानंतर सुधाकरराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात डॉ. पाटील कॅबिनेट मंत्री होते. 1992च्या मुंबईतील जातीय दंगलीनंतर सुधाकरराव नाईक मुख्यमंत्रीपदावरून पायऊतार होणार हे निश्चित होते. त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी डॉ. पाटील यांचे नाव आघाडीवर होते. जवळजवळ तेच मुख्यमंत्री होणार हे निश्चित झाले होते. परंतु दिल्लीतील पवारविरोधकांनी आणि तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी डॉ. पाटील यांच्या नावाला विरोध केला. दिल्लीतील पवारविरोधकांनी एक वेगळी खेळी करून शरद पवार यांना पुन्हा महाराष्ट्रात पाठवले. जातीय दंगलींनंतर पवारच महाराष्ट्र सावरू शकतात असे सांगून पवारांना पुन्हा महाराष्ट्रात धाडण्यात आले. त्यावेळी डॉ. पद्मसिंह पाटील यांना गृहमंत्रीपद देण्यात आले.

पवार

1998 साली काँग्रेसच्या फुटीनंतर डॉ. पाटील राष्ट्रवादी काँग्रेससोबत राहिले. त्यानंतर ते 2004पर्यंत कॅबिनेट मंत्री होते. 2009 साली त्यांनी तेव्हाच्या उस्मानाबाद म्हणजेच आताच्या धाराशिव मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली आणि ते खासदार झाले. तेरणा साखर कारखाना घोटाळा आणि आपले चुलतबंधू पवनराजे निंबाळकर यांच्या हत्त्येचा आरोप डॉ. पाटील यांच्यावर झाला. या आरोपानंतर कोर्टाच्या लढाईत डॉ. पाटील हतबल झाले. त्यापूर्वी राज्याच्या राजकारणात त्यांचे पुत्र राणा जगजीत पाटील यांचा प्रवेश झाला. पुढे ते राज्याच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादीच्या कोट्यातून कृषी राज्यमंत्री होते. राजकीय परिस्थितीमुळे त्यांना भाजपमध्ये प्रवेश करावा लागला. राणा पाटील सध्या तुळजापूर मतदारसंघातून भाजपचे आमदार आहेत. त्यांच्या पत्नी अर्चना पाटील सुनेत्रा पवार यांच्या निकटवर्तीय समजल्या जातात. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर आता अर्चना पाटील धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीत विजयी झाल्या आहेत.

पवार

नियतीचा फेरा काही वेगळच असतो. बारामती मतदारसंघातून पराभूत झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर संधी देण्यात आली. सुप्रिया सुळे यांच्या तुलनेत त्या एक नवख्या खासदार होत्या. परंतु अजितदादांच्या दुर्दैवी अपघातानंतर त्यांच्यावर थेट उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी आली आहे. त्यांनी अजितदादांच्या निधनानंतर चौथ्याच दिवशी घेतलेल्या उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथेमुळे वाद-प्रतिवाद खूप झाले. परंतु त्यावर त्यांनी भाष्य न करता आपण एक मुरब्बी राजकारणी आहोत हे दाखवून दिले आहे. भविष्यात ते, त्या आपल्या कामातून दाखवून देतील याबद्दल शंका नाही. 2004 साली राष्ट्रवादी काँग्रेसचे ७१ आमदार तर काँग्रेसचे ६९ आमदार निवडून आले होते. त्यावेळी खरंतर अजितदादांना मुख्यमंत्री करण्याची संधी होती. परंतु पवारांनी राज्यात तीन मंत्रीपदे वाढवून घेतली आणि केंद्रात प्रफुल्ल पटेल यांना नागरी विभाग वाहतूक खात्याचा स्वतंत्र कार्यभार दिला. आज तेच प्रफुल पटेल कुठे आहेत? याचा विचार पवार करत असतील.

पवार

आपल्या राजकीय वारसदार सुप्रिया सुळे असतील हे पवारांनी वारंवार दाखवून दिले आहे. त्यामुळेच जुलै 2023मध्ये अजित पवार यांना टोकाचा निर्णय घ्यावा लागला. जिल्हा परिषद निवडणुकीत काही जिल्ह्यांत अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची युती झाली. त्यामुळे या दोन्ही पक्षांच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू झाली. जिल्हा परिषद निवडणुकीनंतर यावर शिक्कामोर्तब होणार होते. परंतु त्यापूर्वीच अजितदादांचे अपघाती निधन झाल्याने या विलिनीकरणाच्या चर्चेला वेगळेच वळण लागले. दादा हयात असते तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणानंतर शरद पवार यांच्या मर्जीनुसार निर्णय झाले असते. या पक्षात सुप्रिया सुळे यांना महत्त्वाचे स्थान मिळाले असते. परंतु आता विलिनीकरण झाले तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या मर्जीनुसार निर्णय होणार आहेत. त्यामुळे थोरल्या पवारांची थोडीशी पंचाईत झाली आहे. थोडक्यात, भाजपच्या मनासारखे होणार आहे. आपला पक्ष मोठा करताना उद्धव ठाकरे, शरद पवार, राज ठाकरे आदी नेत्यांची सद्दी भाजपला संपवायची आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना भाजपने निवडणुकीत हरवले असेल परंतु राज्यातील या दोन बंधूंची सद्दी संपलेली नाही. आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने घाईघाईत आपल्या पक्षाचे विलिनीकरण अजितदादांच्या पक्षात केले तर त्यांची सद्दी संपण्यास वेळ लागणार नाही.

(लेखक नितीन सावंत ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक आहेत. संपर्क- 9892514124)

1 COMMENT

  1. भाजपचा कावेबाज पणा व संधीसाधू पणा नेहमीच उघडकीस आलेला आहे. सांप्रत काळात तर त्यांचा वारू मोकाटच सुटला आहे. या सर्व प्रकारात प्रधान मंत्री आणि ग्रूहमंत्री यांचे काहीच योगदान नाही असेही म्हणता येणार नाही. मुंबई न मिळाल्याने कदाचित असा पवित्रा असावा. तसे असेल तर मुंबईचे आर्थिक, राजकीय आणि सामाजिक खच्चीकरणासाठी प्रयत्न सुरूच आहेत. काही काळाने “मुंबई तुमची, भांडी घासा आमची” असे पुन्हा ऐकावयास आले तर आश्चर्य वाटायला नको.

Comments are closed.

Continue reading

राज्यसभेची सातवी जागा आणि महाविकास आघाडीतली बेकी!

राज्यसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. 16 मार्चला या निवडणुका होत असून राज्यातून सात खासदार नव्याने राज्यसभेवर जाणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार, केंद्रीय समाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, रायगडमधील पेणचे धैर्यशील पाटील, शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदी, रजनी पाटील आणि...

जिल्हा परिषदेतही महाविकास आघाडीचे पानीपत!

नगरपरिषदेप्रमाणे जिल्हा परिषद निवडणुका महाविकास आघाडीने पराभूत मनोवृत्तीत लढवल्याने अपेक्षेप्रमाणे या निवडणुकीत भाजपप्रणित महायुतीला यश मिळाले. महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यांच्या जिल्हा परिषद निवडणुकांचे निकाल सोमवारी, ९ फेब्रुवारी २०२६ रोजी जाहीर झाले, ज्यात महायुतीने (भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस) स्पष्ट विजय मिळवला....

एकनाथ शिंदेंनी उपसले उपद्रवमूल्याचे अस्त्र!

राजकारणात तुम्हाला वारंवार तुमची उपयुक्तता सिद्ध करावी लागते. ज्यावेळी तुमची उपयुक्तता संपते त्यावेळी तुम्हाला संपवण्यासाठी तुमचे विरोधक आणि मित्र म्हणून वागवणारे तुम्हाला संपवतात. उपयुक्तता संपली की उपद्रवमूल्य, हे हत्यार बाहेर काढावे लागते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गत अशीच झाली...
Skip to content