Homeब्लॅक अँड व्हाईटगोवा-मुंबई वंदे भारत...

गोवा-मुंबई वंदे भारत पावसात धावणार आठवड्यातून तीनदा!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून गोवा (मडगाव) – मुंबई या वंदे भारत एक्सप्रेसह पाच वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेंना हिरवा झेंडा दाखवून आरंभ केला. गोव्यात मडगाव रेल्वेस्थानकावर झालेल्या कार्यक्रमात राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लई, मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत, केंद्रीय पर्यटन आणि बंदरे, नौवहन आणि जलमार्ग राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांची उपस्थिती होती. नव्याने सुरू झालेली ट्रेन पावसाळ्यात आठवड्यातून तीन वेळा आणि पावसाळ्यात नसलेल्या काळात आठवड्यातून सहा वेळा धावेल, असे कोकण रेल्वेकडून कळवण्यात आले आहे.

गोव्याला मिळालेली ही पहिली वंदे भारत एक्स्प्रेस आहे. कालच्या पाच वंदे भारतच्या आरंभापूर्वी, 18 वंदे भारत एक्स्प्रेस विविध राज्यांमध्ये सेवारत आहेत. संपूर्ण वातानुकूलित असलेली वंदे भारत ही 18 डब्ब्यांची विजेवर धावणारी रेल्वे आहे. यात प्रवाशांसाठी चांगल्या सुविधा आहेत. आगामी तीन वर्षात देशभर 400 वंदे भारत एक्सप्रेस धावताना दिसतील. लवकरच सर्वसामान्य प्रवाशांसाठी वंदे भारत एक्सप्रेसला स्लीपर कोच जोडण्यात येतील, असे श्रीपाद नाईक यांनी सांगितले.

याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी सांगितले की, गोव्यातही राष्ट्रीय महामार्गाचे जाळे विस्तारले जात आहे. गोव्यात लवकरच मुरगाव बंदर आणि रस्ते जोडणी सुरु होईल. मोपा विमानतळावरुन गोव्यासाठी 20 नव्या शहरांना जोडणी मिळाली आहे. याचा मोठा लाभ गोव्याला होईल. डबल ट्रॅक झाल्यास वंदे भारत एक्सप्रेस पाच तासांत गोव्याहून मुंबईला पोहोचता येईल. रेल्वेमंत्र्यांकडे मडगाव रेल्वेस्थानक पंचतारांकित करण्याची मागणी यापूर्वीच केली आहे. मडगाव रेल्वेस्थानकाचे लवकरच आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. 

गोवा (मडगाव)- मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकावरून सुटेल आणि दादर, ठाणे, पनवेल, खेड, रत्नागिरी, कणकवली आणि थिवी रेल्वे स्थानकांवर थांबे घेऊन त्याचदिवशी मडगाव स्थानकात पोहोचेल.

ट्रेन खालील वेळापत्रकानुसार धावणे अपेक्षित आहे. गाडी क्र. 22229 / 22230 मुंबई सीएसएमटी – मडगाव जंक्शन – मुंबई सीएसएमटी वंदे भारत एक्सप्रेस:

पावसाळ्यातील वेळापत्रक : (आठवड्यातून तीन वेळा)

रेल्वे क्रमांक 22229 मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – मडगाव जंक्शन वंदे भारत एक्सप्रेस 28/06/2023 ते 30/10/2023 पर्यंत दर सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 05:25 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी 15:30 वाजता मडगाव स्थानकावर पोहोचेल. 

रेल्वे क्रमांक 22230 मडगाव जंक्शन – मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वंदे भारत एक्सप्रेस मडगाव जंक्शन येथून 29/06/2023 ते 31/10/2023 पर्यंत दर मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी 12:20 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 22:25 वाजता मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचेल. 

नियमित वेळापत्रक : (शुक्रवार वगळता आठवड्यातून सहा दिवस) :

रेल्वे क्रमांक 2229 मुंबई सीएसएमटी – मडगाव जं. वंदे भारत एक्सप्रेस 01/11/2023 पासून दर सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शनिवार आणि रविवार (आठवड्यातील सहा दिवस) मुंबई सीएसएमटी येथून 05:25 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 13:10 वाजता मडगाव स्थानकावर पोहोचेल.

रेल्वे क्रमांक 22230 मडगाव जंक्शन – मुंबई सीएसएमटी वंदे भारत एक्सप्रेस मडगाव जंक्शन येथून 01/11/2023 पासून दर सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शनिवार आणि रविवार (आठवड्यातील सहा दिवस) 14:40 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 22:25 वाजता मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचेल.

मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसमुळे विस्तीर्ण समुद्र किनारा, आंबा, नारळी, पोफळीच्या बागा आणि डोंगर – दऱ्यांनी नटलेल्या कोकणातील पर्यटनाला चालना मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे व्यक्त केला.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी मडगाव ते मुंबईदरम्यान धावणाऱ्या वंदेभारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखविला. त्यानंतर आज सायंकाळी वंदेभारत एक्स्प्रेसचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आगमन झाले. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी वंदे भारत एक्स्प्रेसचे लोको पायलट व प्रवाशांशी संवाद साधत त्यांचे मिठाई आणि गुलाबपुष्प देवून स्वागत केले. यावेळी शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा, खासदार राहुल शेवाळे, खासदार कृपाल तुमाने, आमदार यामिनी जाधव, मध्य रेल्वेचे महाप्रबंधक नरेश लालवाणी, मुंबई विभागाचे महाप्रबंधक रजनीश गोयल आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई आणि पर्यटनात अग्रेसर असलेल्या गोवा दरम्यान सुरू झालेल्या रेल्वेमुळे पर्यटनाचा शाश्वत विकास होण्यास आणखी मदत होईल. या गाडीत विविध आधुनिक सोयीसुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे कोकणवासीयांचा प्रवास सुलभ होईल. वंदे भारत एक्स्प्रेस देशात निर्मित असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकारण्यास मदत करणारी आहे. राज्यात रेल्वेच्या पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी केंद्र सरकारने १३ हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससह १२३ रेल्वे स्थानकांचा विकास करण्यात येणार आहे. राज्यातील बुलेट ट्रेनसह अन्य रेल्वे प्रकल्पांच्या पूर्णत्वासाठी केंद्र सरकारच्या सहाय्याने प्रयत्न सुरू आहेत. बुलेट ट्रेनकरिता भूसंपादनाचे काम सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले.

मंत्री केसरकर म्हणाले की, कोकणातून येणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसचे आगमन होत आहे ही आनंदाची बाब आहे. या रेल्वेत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध आहेत. या माध्यमातून भारत आंतरराष्ट्रीयस्तरावर पोहोचला आहे. कोकण रेल्वेसाठी कोकणवासीयांनी जमीन उपलब्ध करून दिली आहे, असेही त्यांनी सांगितले. खासदार शेवाळे म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राज्यासाठी पाचवी वंदे भारत एक्स्प्रेस सुरू केली. गोवा आणि कोकणातील पर्यटनाला यामुळे चालना मिळेल, असेही त्यांनी सांगितले.

Continue reading

संपात उतरणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई!

विविध प्रलंबित मागण्यांसाठी उद्या म्हणजेच २१ एप्रिलपासून बेमुदत संप पुकारण्याबाबत राज्य सरकारी, निमशासकीय कर्मचाऱ्यांनी शासनास नोटीस दिली असून, या पार्श्वभूमीवर या संपामध्ये सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा शासनाने दिला आहे. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, राज्य सरकारी गट‑ड (चतुर्थ श्रेणी)...

२४ एप्रिलपर्यंत राज्यात वादळी पाऊस, गारपीट व विजांचा इशारा

भारतीय हवामान खात्याच्या आज जाहीर केलेल्या अंदाजानुसार, राज्यातील विविध भागांत २४ एप्रिलपर्यंत वादळी वारे, विजांचा कडकडाट, गारपीट आणि पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विशेषतः मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकण विभागातल्या जिल्ह्यांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने केले आहे. या पार्श्वभूमीवर...

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्यापासून जर्मनीच्या दौऱ्यावर

इराण आणि अमेरिकेतला संघर्ष तीव्र होत असतानाच तसेच नाटो संघटनेतल्या युरोपीय राष्ट्रांची यावरील भूमिका महत्त्वाची ठरत असतानाच भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्यापासून 23 एप्रिलपर्यंत तीन दिवसांच्या जर्मनीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यादरम्यान, संरक्षण मंत्री त्यांचे जर्मनीतील समकक्ष बोरिस...
Skip to content