HomeUncategorizedअखेर चौथ्या प्रयत्नात...

अखेर चौथ्या प्रयत्नात बेंगळुरूची बाजी!

यंदाच्या १८व्या प्रतिष्ठेच्या आय. पी. एल. चषक क्रिकेट स्पर्धेत अखेर आपल्या चौथ्या प्रयत्नात बेंगळुरू संघाने बाजी मारली. याअगोदर तीन वेळा या स्पर्धेची अंतिम फेरी गाठणाऱ्या बेंगळुरू संघाला जेतेपदाने हुलकावणी दिली होती. परंतु यंदा मात्र सुरुवातीपासूनच शानदार कामगिरी करणाऱ्या बेंगळुरूने अखेर आयपीएलचा हा मानाचा चषक आपल्याकडे खेचून आणला आणि आपल्याच संघातील माजी कर्णधार विराट कोहलीच्या स्वप्नाची पूर्तता करण्यात यश मिळवले. ही स्पर्धा सुरू झाल्यापासून तब्बल १८ वर्षे विराट बेंगळुरू संघाचे आयपीएलमध्ये प्रतिनिधित्व करत होता. १८ वर्षांत त्याने दुसऱ्या नव्या संघाकडे जाण्याचा कधी विचार केला नाही. ही स्पर्धा जिंकण्याचे तो स्वप्न बाळगून होता. भारताचे प्रतिनिधित्व करताना विराट वन-डे विश्वचषक स्पर्धा विजेत्या, टी-२० विश्वचषक स्पर्धा विजेत्या आणि चॅम्पियन चषक स्पर्धा विजेत्या भारतीय संघात होता. परंतु आयपीएल चषक त्याला हुलकावणी देत होता. सुरुवातीच्या काळात बरीच वर्षे त्यांनी बेंगळुरू संघाचे कर्णधारपद भूषविले. परंतु कर्णधारपदाचे दडपण येऊ लागल्यामुळे त्याचा परिणाम फलंदाजीवर होऊ लागला आणि अखेर त्याने कर्णधारपद सोडले.

याच संघातून राहुल द्रविड, ए बी डिव्हिलियर्स, ख्रिस गेल यांच्यासारखे दिग्गज खेळाडू खेळले. परंतु ते असतानादेखील आयपीएलचे जेतेपद बेंगळुरूसाठी दूरच राहिले. योगायोग म्हणजे यंदाची ही १८वी स्पर्धा होती. विराट जी जर्सी घालून या स्पर्धेत खेळायचा तीदेखील १८ क्रमांकाची होती. बेंगळुरूच्या विजयात विराटने आपले बहुमूल्य योगदान दिले असे म्हटले तर वावगे ठरू नये. तो जरी संघाचे नेतृत्त्व करत नसला तरी त्याची मैदानातील उपस्थितीच सहकार्यासाठी महत्त्वाची असायची. नवीन कर्णधार रजत पाटीदारच्या पाठीमागे विराट ठामपणे उभा राहिला. यंदाच्या स्पर्धेत बेंगळुरूने जोमात सुरुवात केली, तेव्हाच क्रिकेटप्रेमींना वाटू लागले होते की, यंदा हा संघच जेतेपद मिळवणार. दुसऱ्यांदा या स्पर्धेची अंतिम फेरी गाठणाऱ्या श्रेयस अय्यरच्या पंजाब संघाला निर्णायक अटीतटीच्या लढतीत अवघ्या ६ धावांनी पराभूत करून बेंगळुरूने आपल्या चाहत्यांना अखेर आयपीएल चषकाची आगळी भेट दिली.

प्रथम फलंदाजी करणाऱ्या बेंगळुरूने पंजाबसमोर १९१ धावांचे विजयी लक्ष्य ठेवले होते. परंतु ते आव्हान पंजाबला पेलवले नाही. त्यांनी २० षटकात ७ बाद १८४ धावांची मजल मारली. बेंगळुरूतर्फे विराट ४३, अगरवाल २४, पाटीदार २६. लिव्हिंगस्टोन २५, शर्मा २४ यांच्या सुरेख फलंदाजीमुळे बेंगळुरूला ९ बाद १९० धावांची मजल मारता आली. पंजाबतर्फे अर्शदीप सिंग आणि जेमीसनने अप्रतिम मारा करताना प्रत्येकी ३ बळी टिपले. मुंबईविरूद्ध क्वॉलिफायर टूच्या लढतीत पंजाबने २००पेक्षा जास्त धावांचा यशस्वी पाठलाग करून अंतिम फेरी गाठली होती. त्यामुळे हे लक्ष्यदेखील त्यांच्यासाठी फारसे कठीण नव्हते. परंतु त्यांच्या प्रमुख फलंदाजांनी कारण नसताना हाराकीरी केल्यामुळे त्यांच्या पहिल्या जेतेपदाचे स्वप्न भंग पावले. या स्पर्धेत सातत्याने दमदार फलंदाजी करणाऱ्या कर्णधार श्रेयस अय्यरवर पंजाबची मोठी मदार होती. परंतु या महत्त्वपूर्ण लढतीत अवघी १ धाव काढून तो बाद झाला आणि तिथेच बेंगळुरूचे विजेतेपद पक्के झाले असेच म्हणावे लागेल. सलामीवीर प्रभसिंहने २६ धावा करण्यासाठी तब्बल २२ चेंडूचा मुकाबला केला. मुंबईविरुद्धच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या नेहल वडेराने १५ धावांसाठी १८ चेंडू घेतले तर जम बसलेल्या जोशने आणखी थोडा संयम दाखवला असता तर तो पंजाबच्या विजयाचा शिल्पकार ठरला असता. स्टोनिसनने पहिल्या चेंडूवर षटकार खेचल्यावर लगेच दुसऱ्या चेंडूवर षटकार मारण्याची चूक केली आणि त्यामध्ये तो नाहक आपली विकेट गमवून बसला. एस. सिंगने नाबाद ६१ धावांची झुंजार खेळी केली. परंतु तो आपल्या संघाला मात्र विजय मिळवून देऊ शकला नाही. त्याने सामन्यातील शेवटच्या हेजलवुडच्या षटकात तब्बल २२ धावा चोपल्या. परंतु त्याचा काहीच फायदा झाला नाही.

बेंगळुरूच्या गोलंदाजांनी सुरेख मारा करून सामन्यावर नियंत्रण ठेवले. खास करून मधल्या षटकांत पंजाबच्या फलंदाजांच्या धावांना वेसण घालण्यात बेंगळुरू गोलंदाज यशस्वी ठरले. त्यामुळेच मधल्या फळीतील पंजाबच्या फलंदाजांवर कमालीचे दडपण आले. त्या दडपणाचे ते बळी ठरले. सामनावीर पुरस्कार मिळवलेल्या फिरकी गोलंदाज कृणाल पंड्याने अचूक गोलंदाजी करताना अवघ्या चार षटकांत १७ धावा देऊन सलामीवीर पी. सिंग आणि धोकादायक जोशचे महत्त्वाचे बळी टिपले. शेफर्डने कर्णधार अय्यरचा आपल्या संघाच्या विजयातील महत्त्वाचा अडथळा दूर केला. अहमदाबाद येथील ऐतिहासिक मोदी स्टेडियममध्ये झालेली ही निर्णायक लढत सामन्यातील शेवटच्या षटकापर्यंत चांगलीच रंगली. त्यात अखेर बेंगळुरूची सरशी इाली. याच दोन संघात झालेल्या क्वॉलिफायर वनच्या पहिल्या लढतीत बेंगळुरूने पंजाबला नमवून आपले अंतिम फेरीचे तिकिट चौथ्यांदा निश्चित केले होते.

एलिमिनेटरच्या सामन्यात विक्रमी ५ वेळा ही स्पर्धा जिंकणाऱ्या मुंबईने माजी विजेत्या गुजरात संघावर विजय मिळवून क्वॉलिफापर टूमध्ये प्रवेश केला. मुंबईने गुजरातसमोर २२९ धावांचे मोठे लक्ष्य ठेवले होते. परंतु ते आव्हान गुजरातला पेलवले नाही. त्यांना २० षटकांत ६ बाद २०८ धावांचीच मजल मारता आली. मुंबईतर्फे माजी कर्णधार रोहित शर्माने तब्बल ७ डावांनंतर प्रथमच या स्पर्धेत अर्धशतक फटकावले. ते त्याचे या स्पर्धेतील एकूण ४७वे अर्धशतक होते. याच सामन्यात कर्णधार हार्दिक पंड्याने शेवटच्या षटकात तब्बल ३ षटकार लगावून मुंबईला महत्त्वाच्या १८ धावा मिळवून दिल्या. त्याच शेवटी सामन्यात निर्णायक ठरल्या. मुंबईने २० धावांनी ही लढत जिंकली. गुजरातच्या सलामीवीर साई सुदर्शनची ८० धावांची झुंजार खेळी व्यर्थ ठरली. क्वॉलिफायर दोनच्या लढतीत ५ वेळा विक्रमी ही स्पर्धा जिंकणाऱ्या मुंबईने पंजाबसमोर विजयासाठी २०४ धावांचे मोठे लक्ष्य ठेवले. पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरने शानदार खेळी करून आपल्या संघाला धरारक विजय मिळवून दिला. त्याने वढेरासोबत चौथ्या विकेटसाठी केलेली ८४ धावांची भागिदारी निर्णायक ठरली. वढेराला १३ धावांवर बोल्टने पंड्याच्या गोलंदाजीवर जीवदान दिले. हे जीवदान मुंबईला चांगलेच महागात पडले. त्यामुळे मुंबईचे ६व्या विजेतेपदाचे स्वप्न तेथेच विरले.

अहमदाबादचे मैदान मुंबईसाठी लकी ठरत नाही हेच पुन्हा बघायला मिळाले. येथे झालेल्या आतापर्यंतच्या सहाही आयपीएल लढतीत मुंबईला पराभवाचा धक्का बसला आहे. या स्पर्धेच्या १८ वर्षांच्या इतिहासात २०० धावा करूनदेखील मुंबईला प्रथमच पराभवाला सामोरे जावे लागले. या स्पर्धेत मुंबईची सुरुवात काहीशी खराबच झाली. पहिल्या ५पैकी ४ लढतीत त्यांना हार खावी लागली होती. त्यामुळे मुंबई संघ यंदा प्लेऑफमध्ये प्रवेश करणार की नाही याबाबत मोठेच प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. परंतु नंतर या स्पर्धेत जोरदार कमबॅक करून मुंबईने अखेर प्लेऑफमध्ये मजल मारली. पंजाबने याअगोदर २०१४मध्ये अंतिम फेरी गाठली होती. परंतु कोलकाताकडून ते पराभूत झाले होते. तब्बल ९ वर्षांनी बेंगळुरूने चौथ्यांदा या स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्याचा पराक्रम केला. २००९, २०११, २०१६मध्ये बेंगळुरू संघ या स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळला होता. गतविजेत्या कोलकाता संघाला यंदा प्लेऑफमध्येदेखील प्रवेश करता आला नाही. या स्पर्धेतील बलाढ्य संघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चेन्नईची शेवटच्या क्रमांकावर घसरण झाली. राहुल द्रविड मुख्य प्रशिक्षक असलेल्या राजस्थानने स्पर्धेत चांगली सुरुवात केली. परंतु नंतर मात्र त्यांची कामगिरी ढेपाळली. काही हातातोंडाशी आलेले विजय त्यांनी हाराकीरी करून घालवले. तेथेच त्यांच्या प्लेऑफच्या आशा मावळल्या. त्यांचा स्टार युवा फलंदाज चौदा वर्षीय वैभव सक्सेनाने आपल्या फलंदाजीची जादू या स्पर्धेत पेश किली. स्पर्धेत शतक ठोकणारा तो सर्वात तरुण फलंदाज ठरला. त्यामुळे भविष्यात त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा बाळगायला हरकत नाही.

लखनऊ संघाने भारताचा फटकेबाज फलंदाज, यष्टिरक्षक पंतसाठी विक्रमी २७ कोटी रुपये मोजले. पण पंत त्याचे चीज करू शकला नाही. त्याला १४ लढतीत २५० धावांदेखील करता आल्या नाहीत. अवघे एक शतक आणि एक अर्धशतक त्याने या स्पर्धेत काढले. गुणतालिकेतदेखील त्यांचा ७ क्रमांक लागला. अवघे ६ सामने लखनऊ संघाला जिंकता आले. त्यामुळे पुढील हंगामात पंतला कायम ठेवायचे का नाही हा मोठा पेच संघमालक गोयंका यांच्यासमोर निर्माण झाला आहे. यंदाच्या या स्पर्धेत सर्वाधिक धावा गुजरातच्या साईसुदर्शनने (७५९) केल्या तर त्यांचाच वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाने सर्वाधिक २५ बळी घेतले. एकाच संघातील २ खेळाडूंनी अशी कामगिरी करण्याची या स्पर्धेतील ही चौथी वेळ आहे. याअगोदर चेन्नई, हैद्राबाद, राजस्थानच्या खेळाडूंनी अशी दुहेरी कामगिरी केली होती. बेंगळुरूच्या विजयामुळे या स्पर्धेला यंदा नवा विजेता मिळाला. गेल्या १७ वर्षांत याअगोदर मुंबई, चेन्नई, कोलकाता, राजस्थान, गुजरात आणि हैद्राबादने ही स्पर्धा जिंकली होती. जम्मू-काश्मिरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यामुळे ही स्पर्धा पुढे होणार की नाही याबाबत काहीसे प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. त्यामुळे ही स्पर्धा एक आठवडा मध्येच स्थगित करण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला. परंतु परिस्थिती निवळल्यानंतर पुन्हा या स्पर्धेला जोमात प्रारंभ झाला. योगायोग म्हणजे स्पर्धेतील पहिल्या टप्यात गुणतालिकेत पंजाब, बेंगळुरू हे दोन संघ पहिल्या व दुसऱ्या क्रमांकावर होते. त्यांच्यातच अखेर फायनल मुकाबला रंगला. तीन संघांचे नेतृत्त्व करत असताना त्या संघांना अंतिम फेरीत घेऊन जाणारा श्रेयस अय्यर या स्पर्धेतील एकमेव कर्णधार ठरला. याअगोदर तो कोलकाता, दिल्ली संघाचा कर्णधार असताना ते दोन संघदेखील या स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळले होते. आता पुढील वर्षी आपले जेतेपद राखण्यात बेंगळुरू संघ यशस्वी ठरतो का, ते बघायचे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

आय.पी.एल. स्पर्धेत पंतचा ‘फ्लॉप शो’!

यंदाच्या आय.पी.एल. चषक क्रिकेट स्पर्धेची जेव्हा बोली लागली, तेव्हा नवख्या लखनऊ सुपर जायंट्स संघाने भारताचा युवा यष्टीरक्षक ऋषभ पंतला तब्बल २७ कोटी रुपये बोली लावून आपल्या ताफ्यात दाखल करुन घेतले. आय.पी.एल.च्या इतिहासात पंत आजवरचा सर्वात महागडा खेळाडू ठरला. तेव्हाच...

नावाप्रमाणेच ‘समर्थ’चे देखणे, शिस्तबद्ध शिबीर संपन्न

यंदा आपल्या शताब्दी वर्षात पदार्पण करणाऱ्या मुंबईतल्या दादर, शिवाजीपार्क येथील प्रख्यात श्री समर्थ व्यायाम मंदिराचे सलग ५१वे '१० दिवसांचे वासंतिक क्रीडा प्रशिक्षण शिबिर' उत्साही वातावरणात नुकतेच संपन्न झाले. "समर्थ" या नावाला साजेसे असेच शिस्तबद्ध आणि देखणे आयोजन या शिबिराचे...

यशस्वी संघनायक रोहित शर्माची निवृत्ती!

बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर गतवर्षी अमेरिकेत झालेली टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धा मुंबईकर रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली भारताने जिंकली होती. या जेतेपदानंतर लगेचच रोहित शर्माने टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांना विराम द्यायचा निर्णय घेतला होता. त्यानंतर झालेली मानाची चॅम्पियन्स चषक क्रिकेट स्पर्धादेखील रोहितच्या नेतृत्त्वाखाली...
Skip to content