Homeमुंबई स्पेशलमुंबईत फेरीवाल्यांकडून होत...

मुंबईत फेरीवाल्यांकडून होत असलेली वीजचोरी उजेडात

बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून मुंबई महानगरातील अनधिकृत फेरीवाल्यांविरूद्ध चाललेल्या कारवाईदरम्यान अनेक ठिकाणी फेरीवाल्यांनी केलेली वीजचोरी उजेडात आली आहे. विजेच्या खांबांवरून वीजचोरी करणाऱ्या दादर रेल्वेस्थानक परिसर, भायखळा, चेंबूर, बोरिवली, मुलुंड आणि अंधेरी परिसरातल्या फेरीवाल्यांवर कारवाई करताना काल पालिकेने अनेक अनधिकृत वीजजोडण्या खंडित केल्या. या कारवाईदरम्यान फेरीवाल्यांकडून मोठ्या प्रमाणात साधनसामुग्रीही जप्त करण्यात आली. 

उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, अनधिकृत फेरीवाले, बेवारस वाहने, पदपथावरील अतिक्रमणे यावर अधिक कठोर करावी, असे निर्देश बृहन्मुंबई महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले आहेत. त्यानुसार अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई अधिक तीव्र करण्यात आली आहे.

मुंबईकरांची सोय व्हावी म्हणून पालिका प्रशासनाने पदपथ आणि रस्त्यांचा वापर करताना अडथळा ठरणारे फेरीवाले तसेच आरोग्यासाठी अपायकारक अशा पद्धतीने उघड्यावर अन्नपदार्थांची विक्री करणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. पालिकेच्या नियमानुसार सार्वजनिक रस्त्यावर दिवाबत्तीची व्यवस्था करणे, सुस्थितीत ठेवणे हे पालिकेचे कर्तव्य आहे. यानुसार सार्वजनिक रस्त्यावर दिवाबत्ती करण्यात आली आहे. मात्र याच वीज खांब्यांवरून अनधिकृत फेरीवाल्यांनी अनधिकृतरित्या वीजजोडणी घेतल्याचे समोर आले आहे. या जोडणीवर हे विक्रेते मोठमोठे दिवे, प्रखर झोताचे दिवे लावत असल्याचे समोर आले आहे.

शहर विभागात बेस्टकडून तर उपनगरांमध्ये अदानी एनर्जी लिमिटेड या वीज कंपनीकडून वीज पुरविली जाते. अनधिकृत फेरीवाल्यांनी जेथे अतिक्रमण करून व्यवसाय थाटला होता, तेथून जवळच असलेल्या वीज खांब्यांवरून, जोडणी पेटीतून (कनेक्शन बॉक्स) अनधिकृतरित्या जोडणी घेतल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत पालिका आणि अदानी एनर्जीच्या पथकाने संयुक्तरित्या या फेरीवाल्यांवर कारवाई केली. तसेच त्यांच्या अनधिकृत वीजजोडण्याही काढून टाकल्या. या धडक कारवाईत बृहन्मुंबई महानगरपालिका, बेस्ट आणि वीज कंपनीच्या पथकांनी सहभाग घेतला. यापुढेही अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात तसेच अनधिकृतरित्या वीजजोडणी घेणाऱ्यांविरोधात कारवाई सुरू राहणार आहे.

अनधिकृतपणे वीजचोरी करणाऱ्या व्यावसायिकांविरोधात कठोर कारवाई करण्याबाबत पालिका प्रशासनाने बेस्ट उपक्रमाला पत्राद्वारे कळविले आहे. असे प्रकार रोखण्यासाठी बेस्टने मोहीम हाती घ्यावी तसेच अशा फेरीवाल्यांवर पोलिसांत गुन्हे नोंदविण्याबाबतही पालिकेकडून कळविण्यात येणार आहे. पालिकेतील सर्व विभाग कार्यालयांतही विशेष पथकाची नेमणूक करण्यात येणार आहे. या पथकात सहायक अभियंत्यांचा समोवश असणार आहे. हे पथक विभाग कार्यालयाच्या हद्दीतील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात, वीजचोरांविरोधात कठोर कारवाई करणार आहे.

Continue reading

विलेपार्ल्यात साकारतोय मुंबईतील पहिला शहरी शेतीप्रकल्प

मुंबईतल्या विलेपार्ले विधानसभा क्षेत्राचे भाजपा आमदार पराग अळवणी यांच्या संकल्पनेतून मुंबईतील पहिल्या शहरी शेती प्रकल्पाचे उद्घाटन महापौर रितू तावडे यांच्या उपस्थितीत होणार असून उपमहापौर संजय घडी आणि महापालिका आयुक्त अश्विनी भिडे तसेच महापालिकेतील विविध समिती अध्यक्ष व अधिकारी यावेळी...

नारीवंदन राहिले! सीमांकन जिंकले!! मोदी आणि गांधी आता मैदानात आमनेसामने!!!

महिलांना लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत ३३ टक्के आरक्षण देणारे त्याचप्रमाणे यादृष्टीने मतदारसंघाची पुनरर्चना (सीमांकन) करणारी घटनादुरूस्ती विरोधकांच्या प्रबळ एकजुटीमुळे आज संध्याकाळी फेटाळली गेली. याकरीता झालेल्या मतदानात घटनादुरूस्तीसाठी लागणारे दोनतृतियांश बहुमत मिळवण्यात सरकार अपयशी ठरले. लोकसभेत उपस्थित असलेल्या एकूण ५२८...

युद्धविरामापर्यंत होर्मूझ पूर्णपणे खुले, इराणकडून घोषणा!

जगाच्या तेलवाहतूक तसेच इतर व्यापारात महत्त्वाची भूमिका बजावणारी होर्मूझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली करण्याची घोषणा इराण सरकारने केली आहे. इराणचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्बास अरागची यांनी नुकतीच ही घोषणा केली. लेबनान आणि इस्त्रायलमध्ये झालेल्या युद्धविरामानंतर इराण सरकारने हा निर्णय घेतल्याचे...
Skip to content