Homeन्यूज अँड व्ह्यूजश्री महालक्ष्मी देवीच्या...

श्री महालक्ष्मी देवीच्या मूर्तीची जबाबदारी निश्चित करा!

महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपिठापैकी एक असलेल्या कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी देवीच्या मूर्तीवर अनेकदा रासायिक संवर्धन करण्यात आले आहे. या सर्व संवर्धनामुळे मूर्तीची स्थिती गंभीर होत असल्याचे अहवालातून समोर आले आहे. असे असताना आता पुन्हा एकदा १४ आणि १५ एप्रिलला भारतीय पुरातत्व विभागाकडून श्री महालक्ष्मी देवीच्या मूर्तीचे संवर्धन केले जाणार आहे. तेव्हा सर्प्रवथम या रासायनिक संवर्धनामुळे पुन्हा श्री महालक्ष्मी देवीच्या मूर्तीची हानी झाली अथवा काही गडबड झाली, तर त्याची पूर्ण जबाबदारी निश्‍चित करावी, अशी मागणी महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने कोल्हापूरचे जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी तक्रारीद्वारे करण्यात आली आहे.

या मागणीचे निवेदन महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी तथा पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष अमोल येडगे यांना देण्यात आले. याप्रसंगी श्री एकमुखी दत्त मंदिराचे मठाधिपती संतोष गोसावी, अखिल भारत हिंदू महासभेचे जिल्हाध्यक्ष संदीप सासणे, अंबाबाई भक्त समितीचे प्रमोद सावंत, हिंदु जनजागृती समितीचे किरण दुसे आणि शिवानंद स्वामी हे उपस्थित होते.

यापूर्वी २०१५पासून अनेकदा करण्यात आलेल्या संवर्धनातून काहीही साध्य होत नसताना आता पुन्हा मूर्तीचे संवर्धन केले जाणार आहे. २०१५मध्ये झालेल्या संवर्धनामुळे मूर्तीवर गंभीर परिणाम झाले आहेत, असा स्पष्ट अहवाल आहे. त्यामुळे आता जे संवर्धन होणार आहे त्या संवर्धानामुळे मूर्तीची हानी झाली, तर त्याची नेमकी जबाबदारी निश्‍चित करणे आवश्यक आहे. ही जबाबदारी निश्‍चित होत नाही, तोपर्यंत संवर्धनास स्थगिती देण्यात यावी. याअगोदर ज्यांच्यामुळे मूर्तीची हानी झाली त्या सर्व संबंधितांवर गुन्हे नोंद करावेत तसेच मूर्तीचा मुद्दा धार्मिक असल्याने त्यासंदर्भात संत, धर्माचार्य, शंकराचार्यांचे विविध पीठ आदींचे मार्गदर्शन घ्यावे, असे या पत्रात म्हटले आहे.

हिंदु जनजागृती समितीने मोठ्या प्रमाणात विरोध केल्यानंतरही २०१५मध्ये श्री महालक्ष्मी देवीच्या मूर्तीचे रासायिक संवर्धन करण्यात आले. पुरातत्व विभागाने केलेल्या रासायनिक प्रक्रियेतील फोलपणा २०१७मध्येच दिसण्यास प्रारंभ झाला आणि मूर्तीवर पांढरे डाग दिसू लागले. त्यावेळीही परत एकदा रासायनिक प्रक्रिया करण्यात आली. नुकतेच पुरातत्त्व खात्याचे निवृत्त अधिकारी आर. एस. त्र्यंबके आणि विलास मांगीराज यांनी मूर्तीच्या संदर्भात न्यायालयात सादर केलेल्या अहवालात श्री महालक्ष्मी देवीच्या मूर्तीची गळ्याखालच्या भागाची झीज झाली असून ती झीज २०१५मध्ये झालेल्या रासायनिक संवर्धनातील अवशेषांची आहे, असे नमूद केले आहे. २०१५मध्ये जेव्हा रासायनिक संवर्धन करण्यात आले तेव्हा मूर्तीच्या रासायनिक संवर्धनानंतर मूर्तीच्या स्थितीस प्रक्रिया करणारे पुरातत्त्व खाते सर्वस्वी जबाबदार असेल, असे जिल्हाधिकार्‍यांनी त्यावेळी सांगितले. असे असताना ९ वर्षानंतरही मूर्तीच्या स्थितीस जे जबाबदार आहेत त्यांच्यावर अद्याप कारवाई का करण्यात आली नाही, असा सवालही मंदिर महासंघाने या पत्रात केला आहे.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content