शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी, शेतमालाला हमी भाव, दुष्काळग्रस्त भागात निधीवाटप आदी विविध प्रश्न व मागण्यांवर आज राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. गळ्यात सुपारी, संत्र्यांची माळ घालून हे आंदोलन करण्यात आले.
सुपारी, संत्र्यांची माळ गळ्यात घालून आज महाविकास आघाडीच्या आमदारांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विधानभवन परिसरात आगळेवेगळे आंदोलन करून विधिमंडळ परिसर दणाणून सोडला. शासन दरबारी मोठया प्रमाणात झगमगाट करत सरकार आपल्या दारी.. हा कार्यक्रम केला जातो. शेतकऱ्यांची दयनीय अवस्था असताना सरकार खोटी भूमिका घेत आहे. राज्यात मोठया प्रमाणात शेतमजूर व शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या होत असताना हे सरकार संवेदनाहीन झालं असल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी यावेळी केली.