२६ जानेवारी १९५० रोजी भारताने संविधानाचा स्वीकार केला आणि भारत एक सार्वभौम, प्रजासत्ताक राष्ट्र बनले. दरवर्षी हा दिवस आपण मोठ्या दिमाखात साजरा करतो. संविधानाने आपल्याला प्रगत लोकशाहीतील सर्वश्रेष्ठ ‘अधिकार’ दिले आहेत; मात्र आज ७ दशकांनंतर यावर आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे की, आपण अधिकारांचा उपभोग घेताना आपल्या ‘कर्तव्यांना’ न्याय दिला आहे का? राष्ट्र केवळ कागदी कायद्यांनी नाही, तर नागरिकांच्या कर्तव्यभावनेने समृद्ध होते. अधिकारांचा आग्रह धरणारा नागरिक स्वतःपुरता विचार करतो, पण कर्तव्याचे पालन करणारा नागरिक हा ‘राष्ट्रकेंद्रित’ असतो. म्हणूनच आजच्या जागतिक परिस्थितीत अधिकारांपेक्षा कर्तव्याला प्राधान्य देणे, ही काळाची गरज बनली आहे.
जागतिक संघर्ष आणि भारतापुढील आव्हाने: आज संपूर्ण विश्व तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहे. रशिया-युक्रेन असो वा इस्रायल-हमास संघर्ष, जगातील अस्थिरतेचा परिणाम भारतावरही होत असतो. आजचे युद्ध केवळ सीमेवर बंदुकीने लढले जात नाही, तर ते ‘हायब्रीड वॉर’च्या स्वरूपात आपल्या घरात शिरले आहे. सायबर हल्ले, आर्थिक युद्ध, सांस्कृतिक आक्रमणे, अंमली पदार्थांची तस्करी आणि अर्बन नक्षलवादासारखी अंतर्गत आव्हाने आपल्यासमोर उभी आहेत. या छुप्या आघाड्यांवर लढण्यासाठी केवळ सैन्य पुरेसे नाही, तर प्रत्येक नागरिकाचे सतर्क राहणे आवश्यक आहे. ही सतर्कता म्हणजे दुसरेतिसरे काही नसून आपले ‘राष्ट्रीय कर्तव्य’ आहे.
आत्मनिर्भर भारत आणि आर्थिक कर्तव्य: देशाची अर्थव्यवस्था बळकट करणे हे केवळ सरकारचे काम नसून ते नागरिकांचे कर्तव्य आहे. ‘आत्मनिर्भर भारत’ ही संकल्पना यशस्वी करण्यासाठी स्वदेशी उत्पादनांचा आग्रह धरणे, करप्रणालीचे प्रामाणिक पालन करणे आणि राष्ट्रविरोधी शक्तींच्या आर्थिक नाड्या आवळणे आवश्यक आहे. जेव्हा आपण परदेशी वस्तूंच्या जागी स्वदेशी वस्तू निवडतो, तेव्हा आपण अप्रत्यक्षपणे भारताच्या संरक्षणव्यवस्थेला आणि अर्थव्यवस्थेला बळकट करत असतो. “प्रत्येक नागरिक एक सैनिक” या भावनेतून केलेली प्रत्येक छोटी कृती राष्ट्रनिर्मितीला हातभार लावते.

राष्ट्रध्वजाचा सन्मान: श्रद्धेचा की केवळ सवयीचा?: प्रजासत्ताकदिनाच्या दिवशी आपण तिरंग्याला वंदन करतो; परंतु त्या सन्मानाचे सातत्य किती काळ टिकते? २६ जानेवारीच्या दुपारीच रस्त्यांवर, कचराकुंडीत किंवा नाल्यात प्लास्टिकचे आणि कागदी राष्ट्रध्वज पडलेले दिसतात. हे पाहून कोणत्याही राष्ट्रप्रेमी नागरिकाचे हृदय पिळवटून निघते. अनेकजण उत्साहाच्या भरात राष्ट्रध्वजाच्या रंगाचा केक कापतात किंवा कपड्यांवर, चेहऱ्यावर तिरंगा रंगवतात. हा राष्ट्रध्वजाचा घोर अपमान आहे. भारतीय ध्वजसंहितेचे (Flag Code of India) पालन करणे हे आपले कायदेशीर आणि नैतिक कर्तव्य आहे. तसेच, काही आंतरराष्ट्रीय संकेतस्थळांवर भारताचा नकाशा चुकीचा दाखवला जातो, ज्यात काश्मीर किंवा अरुणाचल प्रदेशचा भाग वगळला जातो. अशावेळी केवळ मूकदर्शक न राहता, संबंधित संस्थेला पत्र लिहून किंवा कायदेशीर मार्गाने निषेध नोंदवून तो नकाशा दुरुस्त करून घेणे, हे आपले जागरूक नागरिक म्हणून पहिले कर्तव्य आहे.
प्रजासत्ताकदिनी नागरिक म्हणून काय करावे?: प्रजासत्ताकदिन म्हणजे केवळ सुट्टीचा दिवस नव्हे, तर तो ‘कर्तव्य संकल्प’ करण्याचा दिवस आहे. त्यासाठी खालील कृती आपण अवश्य कराव्यात-
१. प्लास्टिकच्या ध्वजांचा वापर पूर्णपणे टाळावा आणि राष्ट्रध्वजाचा कुठेही अवमान होत असल्यास तो धैर्याने रोखावा. ध्वजसंहितेचे पालन करावे.
२. केवळ ठराविक नेत्यांचीच नव्हे, तर देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या असंख्य ज्ञात-अज्ञात क्रांतिकारकांचे चरित्र अभ्यासावे आणि त्यांचे मूल्य संस्कार पुढच्या पिढीला द्यावेत. यातून क्रांतिकारकांचे स्मरण करावे.
३. केवळ अधिकार मागण्यासाठी नव्हे, तर शिस्तबद्ध नागरिक म्हणून रहदारीचे नियम पाळणे, परिसर स्वच्छ ठेवणे आणि भ्रष्टाचाराला विरोध करणे हादेखील प्रजासत्ताकदिनाचा सन्मानच आहे. यातून संविधान आणि नियमांचा आदर राखावा.
४. आपली संस्कृती, भाषा आणि राष्ट्रप्रतीकांचा (राष्ट्रगीत, वंदे मातरम्) सन्मान राखणे आणि त्याचा अवमान करणाऱ्यांना प्रबोधन करणे हे आपले कर्तव्य आहे.
ज्या देशाचा नागरिक आपल्या अधिकारांपेक्षा कर्तव्याला श्रेष्ठ मानतो, तो देश जगात अजिंक्य ठरतो. स्वातंत्र्य मिळवून देणे ही क्रांतिकारकांची जबाबदारी होती, पण ते स्वातंत्र्य टिकवणे आणि समृद्ध करणे ही आपली जबाबदारी आहे. या प्रजासत्ताकदिनी आपण संकल्प करूया की, “मी केवळ माझ्या हक्कासाठी लढणारा नागरिक न राहता, राष्ट्राच्या सन्मानासाठी अखंड कार्यरत असणारा ‘सैनिक’ बनेन.”
जय हिंद! जय भारत!
(लेखक संकलक रमेश शिंदे हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते आहेत.)

