Details
तुम्ही असं काय करता राव?
26-Dec-2018
| 0
”
नरेंद्र वि. वाबळे, संपादक, शिवनेर
narendrawable@rediffmail.com
अलिकडेच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला पराभव पत्करावा लागला आहे. तेव्हापासून काँग्रेसचा उत्साह वाढला आहे. काँग्रेसचे तरूण अध्यक्ष राहुल गांधी अधिक आक्रमक झाले आहेत. त्यांच्यासोबत असलेले आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू विरोधी पक्षांची एकजूट करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. भाजपाला केंद्रातून उखडून फेकण्याचे स्वप्न काँग्रेससह भाजपाचे सर्व विरोधक पाहत आहेत. पाच राज्यांतील निवडणूक निकालानंतर तर हे स्वप्न साकार होणार असे चित्र निर्माण झाले आहे. पण राजकारण तितके सोपे आणि सरळ नसते.
राजकारणात अनेक छक्के-पंजे खेळले जातात. लुटुपुटूच्या लढाईचे नाटक केले जाते. तसेच नाटक आता तेलंगणाचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव करत आहेत. तेलंगणा विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळल्यानंतर राव यांनी आपला खरा रंग दाखविण्यास सुरूवात केली आहे. 2019च्या लोकसभा निवडणुकीत सर्व विरोधी पक्ष एकत्र आले तर भाजपाचा पराभव निश्चित आहे. पण विरोधकांची मते विभागण्याची ‘सुपारी’ राव यांनी घेतल्याचे त्यांच्या हालचालींवरून स्पष्ट दिसते. विधानसभा निवडणुकीतील यशानंतर चेकाळलेल्या राव यांनी भाजपा आणि काँग्रेसविरहित फेडरल फ्रंट स्थापन करण्याची घोषणा केली आहे. गेल्या रविवारी त्यांनी आपली मोहीम सुरू केली. बिजू जनता दलचे (बिजेडी) नवीन पटनाईक आणि तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) ममता बॅनर्जी यांची भेट घेऊन त्यांच्याशी नियोजित फेडरल फ्रंटबाबत चर्चा केली. आता उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश सिंह यादव (समाजवादी पार्टी) आणि मायावती (बहुजन समाज पार्टी) यांची भेट घेऊन ते पुढील चर्चा करणार आहेत. या पक्षांनी आतापर्यंत चंद्रबाबू नायडू यांच्या प्रयत्नांना प्रतिसाद दिलेला नाही. राव यांना इतर तीन पक्षांकडून कोणतेही आश्वासन मिळालेले नाही.
पण त्यांच्या फुटपाड्या कारस्थानामुळे, विरोधकांची एकजूट करू पाहणार्या, काँग्रेसची मात्र पंचाईत झाली आहे.निवडणुकीच्या राजकारणात मतांचे विभाजन अतिशय महत्त्वाचे असते. अलिकडेच झालेल्या निवडणुकीत शिवसेनेने मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगणा या चार राज्यात उमेदवार उभे केले होते. या उमेदवारांनी भाजपाच्या मतांचे विभाजन केल्यामुळेच भाजपाला धूळ चारण्यात काँग्रेसला यश आले. आता तीच रणनीती भाजपा राष्ट्रीय पातळीवर वापरताना दिसत आहे. राव यांच्या हालचालींमागे अमित शाह यांचे कावेबाज डोके आहे. भाजपाकडे सत्ता आणि संपत्ती आहे. या दोन्हींचा निवडणुकीत कसा वापर करायचा हे नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना चांगले ठाऊक आहे. त्यांनी राव यांना विरोधकांची मते फोडण्याची ‘सुपारी’ दिली आहे, हे सांगायला कोणत्याही शोध पत्रकारितेची गरज नाही. राव यांच्याकडे पाहून आज विरोधक हताशपणे म्हणत आहेत, ‘तुम्ही असं काय करता राव?’”

