Details
22 पक्ष की ‘जनता पक्ष’?
22-Jan-2019
| 1
”
नरेंद्र वि. वाबळे, संपादक, शिवनेर
narendrawable@rediffmail.com
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता 2014 मध्ये गगनाला जाऊन भिडली होती. भारताच्या इतिहासात प्रथमच भारतीय जनता पक्षाला लोकसभेत निर्विवाद बहुमत मिळाले होते. मोदी यांचे वक्तृत्त्व आणि आधीच्या सरकारचे ‘कर्तृत्त्व’ यांच्या बळावरच मोदींनी भारत जिंकला होता. ‘अच्छे दिन’ येणार असे गाजर दाखवित तळागाळातील लोकांवर मोहिनी घातली होती. प्रत्येक भारतीयाला पंधरा लाख रुपयांचे आमिष दाखवून मते उकळली होती. तरुणांना रोजगार निर्मितीची आश्वासने दिली होती. पण साडेचार वर्षांत लोकांचा भ्रमनिरास झाला. मोदी यांच्या मंत्रिमंडळातील वजनदार मंत्री नितीन गडकरी यांनी पहिला बाँम्ब टाकला. पाच राज्यात भाजपाचा दारुण पराभव होताच मोदींचा उलटा प्रवास सुरु झाला. या पराभवाची जबाबदारी पक्षाच्या नेतृत्त्वाने घेतली पाहिजे, हे गडकरींचे विधान म्हणजे नरेंद्र मोदी-अमित शाह या जोडगोळीला दिले गेलेले आव्हान होते. गडकरी यांनी हे आव्हान देत मराठी बाणा दाखविला होता. तेव्हा याच स्तंभाखाली आम्ही गडकरी यांची तारीफदेखील केली होती. अशाप्रकारे मोदींना पक्षातून आव्हान मिळाले असतानाच आता त्यांच्यापुढे विरोधकांचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
गेल्या शनिवारी कोलकाता येथे 22 विरोधी पक्षातील 25 प्रमुख नेते एकत्र आले. त्यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या तर रणरागिणी म्हणून प्रख्यात आहेत. त्यांच्याच पुढाकाराने हा मेळावा झाला. प्रत्येक नेत्याने मोदी यांच्या पापांचा पाढा वाचत त्यांचे सिंहासन गदगदा हलविले. या मेळाव्याला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी उपस्थित नव्हते. पण त्यांनी काँग्रेसचा प्रतिनिधी पाठवून आपला पाठींबा मात्र दर्शविला होता. जशा एका म्यानेत दोन तलवारी राहू शकत नाहीत तसेच अनेक विरोधी पक्ष एकत्र नांदू शकत नाहीत हा स्वतंत्र भारताचा इतिहास आहे. आणिबाणीनंतर देशातील सर्व पक्ष एकत्र आले. त्यांचे जनता पक्षात विलीनीकरण झाले. मोरारजी देसाई पंतप्रधान झाले. पण दोन वर्षेदेखील हे सरकार टिकले नाही. इंदिरा गांधी पुन्हा प्रचंड बहुमताने विजयी झाल्या. आज परिस्थिती वेगळी नाही. त्यावेळी इंदिराजींनी निदान घटनेच्या चौकटीत राहून आणिबाणी जाहीर केली होती. नंतर ती शिथील करुन निर्भिडपणे लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका घेतल्या होत्या. आणिबाणीचा गैरफायदा काही मुठभर लोकांनी उठविल्यामुळेच इंदिराजी बदनाम झाल्या. परिणामी, त्यांना सत्ता गमवावी लागली.
आता तर देशात अघोषित आणिबाणी सुरु आहे. सुप्रिम कोर्टाच्या न्यायाधीशांपासून ते सीबीआयच्या सर्वोच्च अधिकार्यांपर्यंत जो तो दबावाखाली आहे. रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नरदेखील त्यातून सुटलेला नाही. नोटबंदीनंतर सुरु झालेले दुष्परिणाम आजही जाणवत आहेत. जीएसटीने छोटे उद्योग बंद पडले आहेत. या पार्श्वभूमीवर देशातील 22 विरोधी पक्ष एकत्र येणे ही महत्त्वपूर्ण घटना आहे. ‘पंतप्रधान नंतर ठरवू, आधी मोदींना हरवू’ हा या नेत्यांचा निर्धार भविष्याबद्दल बरेच काही सांगून जाणारा आहे. देशाला आज सुजाण नेतृत्त्वाची गरज आहे. विरोधी पक्षांनी ती गरज पूर्ण करावी. हे करत असताना आपला ‘जनता पक्ष’ होणार नाही याची काळजी घ्यावी हीच अपेक्षा!”

