HomeArchiveनारायण राणे पुन्हा...

नारायण राणे पुन्हा चर्चेत!

Details
नारायण राणे पुन्हा चर्चेत!

    16-May-2019

| 0

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

विलास मुकादम, ज्येष्ठ पत्रकार

लोकसभा निवडणुकीचा निकाल आठ दिवसांनी लागेल. या निवडणुकीकडे जगाचे लक्ष लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काय होणार हाच खरा लाख मोलाचा प्रश्न आहे. या निकालानंतर चार महिन्यांत राज्यात विधानसभेची निवडणूक लागणार आहे. महाराष्ट्रापुरते बोलायचे तर अनेक राजकीय नेत्यांचे भवितव्य पणास लागणार आहे. निवडणूक निकालाच्या आधीच महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सर्वेसर्वा आणि भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेतील खासदार नारायण राणे त्यांच्या येऊ घातलेल्या आत्मचरित्रावरून भलतेच चर्चेत आले आहेत. लोकसभा निवडणूक निकालाच्या तोंडावर त्याचे प्रकाशनही होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हे प्रकाशन होईल की नाही, हाही वादाचा मुद्दा बनला आहे.

राणेंच्या पुस्तकाचे जोरदार पडसाद उमटणार अशी चिन्हे आहेत. वृत्त वाहिन्यांनी या चरित्राची जोरदार दखल घेतली. त्यामुळे नारायण राणे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांच्या या आत्मचरित्राच्या बातम्या झाल्या. राणेंच्या मुलाखती गाजल्या. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपचे नेते, राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर राणे यांनी व्यक्तीगत टीकाटिप्पणी केली आहे. या आत्मचरित्राचे वर्णन आरोपपत्र असे केले, तर ते वावगे ठरू नये.

नारायण राणे मुरब्बी राजकारणी आहेत. नगरसेवक ते मुख्यमंत्री व्हाया एक उद्योजक, उत्तम प्रशासक असा त्यांचा दांडगा अनुभव आहेच. हा प्रवास साधा-सोपा नाही. राजकारणातील यश मिळविताना राणे यांनी भरपूर संघर्ष केला आहे. सलग ३५ वर्षे राजकारणात टिकून राहणे म्हणजे एक आव्हानच असते. त्यात पुन्हा त्यांचा टोकाचा आक्रमक स्वभाव, प्रचंड जिद्द आणि कोणाचीही भिडभाड न ठेवता बोलण्याची हिंमत, असे सारे गुण राणेंमध्ये पहिल्यापासूनच आहेत. रोखठोक किंवा आक्रमक स्वभावामुळे राजकारणात अनेकांचा टिकाव लागत नाही. पण नारायणराव याला अपवाद आहेत. शिवसेनेत तीन तपं, काँग्रेस पक्षात एक तप असा त्यांचा राजकीय प्रवास झाला. त्यानंतर त्यांनी स्वत:चा राजकीय पक्ष स्थापन केला.

त्याच महाराष्ट्र स्वाभिमान पक्षातर्फे त्यांचे पुत्र नीलेश राणे कोकणातून लोकसभेची निवडणूक लढवित आहेत. त्यांच्यापुढे शिवसेना भाजप युतीच्या विनायक राऊतांचे जबरदस्त आव्हान आहे. स्वत: नारायण राणे आणि पुत्र नीलेश राणे या दोघांनी पराभवाची चव चाखली आहे. यावेळी तर राणेंच्या अस्तिवाचीच ही निवडणूक आहे हे नाकारता येणार नाही. नेमक्या याचवेळी राणेंचे आत्मचरित्र लोकासमोर येत आहे.

राजकीय नेत्यांच्या आत्मचरित्राकडे अनेकांचे लक्ष असते. नेत्याचे, कलावंताचे, लेखकाचे, कामगार नेत्याचे आत्मचरित्र म्हणजे त्याने केलेल्या संघर्षाची एक कहाणी असते. जीवन कसे जगले? कडू-गोड अनुभव कोणते आले? संकटांवर मात कशी केली? कुणाची साथ-सोबत मिळाली, कुणामुळे दगाफटका झाला? मुळात चरित्र लिहावेसेच का वाटले? आत्मचरित्रातून तरूणांना कोणती शिकवण मिळणार आहे? अशा अनेक उलट-सुलट प्रश्नांची उकल आत्मचरित्रांतून होत असते. आत्मचरित्र म्हणजे स्वत:शी प्रामाणिक राहून दिलेला कबुलीजबाब असतो. नारायण राणे यांचे आत्मचरित्र या कसोटीला उतरते काय, हे ते प्रसिद्ध झाल्यावरच समजेल.

बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेच्या माध्यमातून राज्याची सत्ता खेचून आणली. हिंदू नेता, महाराष्ट्राचा वाघ अशी त्यांची प्रतिमा होती. त्यांनीही खडतर संघर्ष केला. त्यांनी आत्मचरित्र लिहिण्याचे नाकारले. नारायण राणे यांनी त्यांचे आत्मचरित्र लिहिले आहे. त्यात काय, काय आहे आणि कसे काय आहे, याबद्दल सर्वत्र उत्सुकता आहेच. राणेंनी त्यांच्या आक्रमक स्वभावास शोभल असेच त्यांनी आत्मचरित्र लिहिले आहे एव्हढं मात्र नक्की.”
 

Continue reading

पंतप्रधान मोदी सेशेल्सच्या सर्वोच्च बहुमानाने सन्मानित

व्हिक्टोरिया (सेशेल्स) येथे एका विशेष सोहळ्यात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज सेशेल्सचे अध्यक्ष डॉ. पॅट्रिक हर्मिनी यांच्या हस्ते ‘गार्डियन ऑफ द ब्लू होरायझन’ हा पहिला सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला. पंतप्रधानांच्या पर्यावरणपूरक नेतृत्त्वासाठी, विकसनशील देशांच्या हितासाठी केलेले प्रयत्न, सागरी...

उद्या घराबाहेर पडा छत्री आणि रेनकोटसह…

उद्या म्हणजेच गुरूवारीही मुंबईत दिवसभर पाऊस राहणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार उद्या मुंबईत हलका ते मध्यम पाऊस पडेल. ढगाळ वातावरण राहील. कमाल तापमान 29° ते 30°C तर किमान तापमान 27° ते 28°C असेल. वास्तविक तापमान दमटपणामुळे 38° ते 40°C...

एकांकिकांच्या सादरीकरणाने साजरी झाली विनय आपटेंची जयंती

"आजही नाटक संपल्यानंतर प्रेक्षकांकडून ज्या टाळ्या मिळतात, त्यातील पहिल्या शंभर टाळ्या, या विनय सरांच्याच असतात," अशा अत्यंत विनम्र भावना सुप्रसिद्ध अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांनी ठाण्यात व्यक्त केल्या. सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक विनय आपटे यांच्या जयंतीनिमित्त 'विनय आपटे...
Skip to content