“आजही नाटक संपल्यानंतर प्रेक्षकांकडून ज्या टाळ्या मिळतात, त्यातील पहिल्या शंभर टाळ्या, या विनय सरांच्याच असतात,” अशा अत्यंत विनम्र भावना सुप्रसिद्ध अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांनी ठाण्यात व्यक्त केल्या. सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक विनय आपटे यांच्या जयंतीनिमित्त ‘विनय आपटे प्रतिष्ठान’तर्फे आयोजित एकांकिका सादरीकरणाच्या कार्यक्रमात ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते. ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे हा सोहळा प्रेक्षकांच्या प्रचंड प्रतिसादात संपन्न झाला. या कार्यक्रमाला विनय आपटे यांचे शिष्य अभिनेते संकर्षण कऱ्हाडे, सुप्रसिद्ध अॅडगुरू भरत दाभोळकर आणि ज्येष्ठ पत्रकार डॉ. उदय निरगुडकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.

याप्रसंगी बोलताना डॉ. उदय निरगुडकर यांनी विनय आपटे यांच्यासोबतच्या वैयक्तिक आठवणींना उजाळा दिला. “एकदा आवाजाच्या कार्यशाळेसाठी विनयजी ठाण्यात स्कूटरवरून भिजत भिजत आले. पाऊस वाढल्याने सगळीकडे पाणी साचले आणि आता परत जाता येणार नाही, हे लक्षात येताच त्यांनी ‘आपण रात्रीपर्यंत कार्यशाळा घेऊ’ असे म्हणत थेट रात्री १२ वाजेपर्यंत कार्यशाळा घेतली.” हा त्यांच्यातील कामाप्रती असलेला विलक्षण गुण निरगुडकर यांनी आवर्जून सांगितला.

संस्थेच्या विश्वस्त वैजयंती आपटे यांनी प्रास्ताविकात सांगितले की, विनय आपटे स्वतःच्या वाढदिवसाला कधीही सुट्टी न घेता नियमित काम करायचे. त्यामुळेच त्यांचा वाढदिवस हा नाट्यक्षेत्रात पहिलं पाऊल टाकणाऱ्या तरुण मुलांच्या सादरीकरणाने साजरा करणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली आहे. विनय आपटे यांनी मालिका, चित्रपट, नाटक, जाहिरात अशा सर्व माध्यमांत मुक्त संचार केला, तरी त्यांचे खरे प्रेम ‘नाटक’ हेच राहिले. त्यांच्या अभिनय, दिग्दर्शन आणि लेखनाचा प्रवास उलगडणारी एक विशेष ध्वनी-चित्रफितही (AV) यावेळी दाखवण्यात आली.

पुरस्कारप्राप्त एकांकिकांचे दमदार सादरीकरण: या सोहळ्यात विविध स्पर्धांमध्ये पुरस्कार मिळालेल्या विजेत्या एकांकिका सादर करण्यात आल्या.
प्रथम एकांकिका: ४०पेक्षा जास्त कलाकार असलेली आणि अनेक स्पर्धा गाजवणारी जोशी-बेडेकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची ‘मढं निघालं अनुदानाला’ ही एकांकिका यावेळी सादर झाली. याचे लेखन प्रतीक चौधरी यांनी केले असून दिग्दर्शन महेश कापरेकर आणि सागर चव्हाण यांचे आहे.
द्वितीय एकांकिका : मध्यंतरानंतर पार्ल्याच्या म. ल. डहाणूकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी BYP संस्थेची, सर्वेश देसाई लिखित आणि पराग ओझा दिग्दर्शित ‘जब वी मेट’ ही एकांकिका सादर केली.

उत्तम विषय, कलाकारांचे कसदार सादरीकरण आणि नेटके आयोजन यामुळे ठाणेकर रसिक प्रेक्षकांनी नाट्यगृहात शेवटपर्यंत लक्षणीय गर्दी केली होती.

